ऐका गणेशदेवा, तुमची कहाणी

डॉ. अनुजा जोशी




लहानपणापासून मला बालगणेश खूप आवडतो. त्याचा गोंडस बाळसेदारपणा व कोवळ्या अंकुरासारखी टुकटुकीत त्याची इवलीशी ‘सोंडुली’- मला खूपच भावते. पण तेव्हा एखाद्या कॅलेंडरशिवाय तो फारसा कुठे दिसत नसे. गणेशचतुर्थीतही कुठेतरी क्वचित एखाद-दुसरा नवसाचा बालगणेश बसवलेला दिसायचा.
पण अलीकडे टीव्ही-जाहिरातींच्या आक्रमणामुळे तो स्टीकर्स, टॅटू, टिफीन, बॅगा, कपडे, वह्या, पुस्तके कुठेही दिसू लागलाय. पौराणिक मालिका व कार्टून सिरीयल्समध्ये त्याचं अनेकदा ‘लाईव्ह’ दर्शनही घडलं. बालगणपती अनेक खोड्या करताना, लढाया-पराक्रम करतानाही बघायला मिळाला. ‘ओ माय फ्रेंड गणेशा’ने तर धमालच उडवून दिली. आणि आता तर सार्वजनिक गणेशोत्सवाचे पेव फुटल्यापासून बालगणपतीच काय, तरुण-वयस्कर कोणत्याही वयाचा, कोणत्याही ‘व्हरायटी’चा गणपती दिसू लागलाय! सैनिक, शेतकरी, कुंभार, इंजिनिअर, डॉक्टर असे सगळे व्यवसाय करणारा, साधू-बाबा-संत-महंत सर्वांच्या रूपातला, सगळ्या देव-देवतांच्या आकारातला, प्राणी-पक्षी, फुलं-फळं यांपासून तयार झालेला, काडेपेटीच्या आकारापासून ते माडाच्या उंचीपर्यंत- सगळ्या गणपतींचा सुकाळ झाला! गणेशोत्सवाचा ‘गनेश फेस्टिव्हल’ झाला!
या बदललेल्या दिवसातला एक गमतीशीर प्रसंग येथे आवर्जून आता सांगावासा वाटतोय-
टीव्हीवर गणपतीचीच एक पौराणिक मालिका सुरू होती. बच्चेकंपनी बघायला बसलेली. मालिकेत ‘पार्वती आपल्या अंगाचा मळ काढून त्याची मूर्ती तयार करते आहे’ असा सीन होता. आता थोड्याच वेळात माझा आवडता बालगणपती बघायला मिळणार या आशेने मीही तिथे थांबले. पार्वती अंगाचा ‘मळ’ काढत होती. तो मळ चकचक चमकताना वगैरेही दाखवला होता. लेप उतरवावा तसा ‘मळ’ उतरवून पार्वतीने त्याची एक मूर्ती तयार केली. अर्थात मूर्तीही चमकू लागली. त्यापासून एक छान गुटगुटीत बाळ तयार झालं. अंगाच्या मळाचं असं बाळ तयार झालेलं बघून सिरीयल बघणार्‍या बच्चेकंपनीकडून- ‘‘श्श्शीऽऽऽ इतका मळ तिच्या अंगावर साठला होता की काय?’’ अशी जबरदस्त प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. मुले अगदी उत्स्फूर्तपणे व बेधडकपणे हे बोलली व एखादी मनोरंजक फँटसी बघावी तशी पुन्हा मजेत सिरीयल बघू लागली...
-मुलांची शंका व प्रतिक्रिया अतिशय रास्त होती. ‘पार्वतीच्या अंगाच्या मळाची मूर्ती’ हा किंतु माझ्याही मनात लहानपणापासून होता. खरं तर, आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात हे कधी ना कधी येऊन गेलंही असेल. पण असं म्हणण्याचं, कुणाला विचारण्याचं धाडस आपण कधी केलं नाही. सणवार- धार्मिक श्रद्धा व सगळ्याची व्यर्थ भीती यांमुळे अशा अनेक प्रश्‍नांच्या स्प्रिंग्ज् दाबून ठेवण्याएवढे बावळट आपण नक्की होतो. आपले एक वेळ चालून गेले. पण असं लक्षात घ्यायला हवं की, आजची ही बालगणेशांची पिढी खूप स्मार्ट बनली आहे. बुद्धिमान आहे. त्यांना खूप प्रश्‍न पडतात. त्यांची समर्पक उत्तरेही त्यांना हवी असतात. त्यांच्या पौगंडावस्थेत तर ‘त्यांना सगळं काही कळतं आणि काहीच कळत नाही’ अशा दोन्हींचं मिश्रण झालेलं असतं. धार्मिक गोष्टींकडे केवळ अवडंबर आणि हौस म्हणून न बघता त्यातलं ‘ज्ञान’ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या आयुष्याच्या इमारती मुलभूत ज्ञानाच्या या पायावर भक्कम उभ्या राहू शकतात. म्हणून अशा गोष्टी आपणच जिज्ञासूपणे समजून घेऊन त्यांच्यापर्यंत योग्यप्रकारे पोचवल्या पाहिजेत असं या प्रसंगानंतर वारंवार माझ्या मनात येऊ लागलं.
शास्त्रे-पुराणे-लोकवेदातल्या अशा गोष्टींमागे असलेले वैज्ञानिक आधार पार्वतीच्या या गोष्टीपासूनच मी शोधायचे ठरवले. आज मुलांचं जगही बदललं आहे. डोरेमॉन, निंजा हतोडी, त्यांची भारी भारी गॅजेटस्, त्यांचे पराक्रम, पोकेमॉन, पिकाचू, शिशिमानो, कियो, सुनियो, टॉम ऍण्ड जेरी, ऑग्गी ऍण्ड कॉक्रोचेस् वगैरे वगैरेंच्या अवघ्या लीला समरसून बघणार्‍या मुलांनी ‘पार्वतीने अंगाच्या मळाची मूर्ती तयार करणे’ हा चमत्कारही तेवढाच मजेदारपणे बघितला होता. प्रचंड ज्ञानाचे भांडार असलेली ‘श्रीगणेश’ ही संकल्पना मुलांनी फक्त कार्टून म्हणून बघावी, याचा मला मनोमन खूप खेद वाटत होता...
**********
पुरुषबीज व स्त्रीबीज संयोगातून गर्भाशयामध्ये गर्भधारणा होते. स्त्रीचा मासिक रजःस्राव बंद होतो व पुढे त्यावरच नऊ महिने गर्भाचे पोषण सुरू राहते. जो स्त्राव दरमहा शरीरातून ‘मल’ रूपात बाहेर पडणार असतो, त्यावरच गर्भाची वाढ होते. म्हणजेच आपला जन्म हा असा ‘मळामधूनच’ होतो. चिखल, दलदलीतून ज्याप्रमाणे सुरेख कमळ फुलून येते, तसेच रजःस्रावाच्या पोषणामुळे ‘सजीव देह’ जन्माला येतो. नवनिर्मिती ही अशी दोषांना पचवूनच होत असते असेही म्हटले तरी चालेल. या नवनिर्मितीच्या- सर्जनाच्या प्रक्रियेत दोष पोसले जात नाहीत तर दोष पचवले जातात! दोघांमधलेही गुण शोषून घेऊन अस्सल नवी कलाकृती निर्माण होते. दोषांना संपूर्ण पचनी पाडून तयार होणारी ही कलाकृती संपूर्ण निर्दोष, निर्व्यंगी व आनंददायी असते. पार्वतीच्या ‘अंगाचा मळ’ या संकल्पनेत ‘मळा’मधून निर्माण होणार्‍या आपल्या सुंदर अशा जन्माचे एवढे मोठे शास्त्र समावले आहे! ‘पार्वती’ या शब्दाचा लाक्षणिक अर्थ लक्षात घेतल्यास पार्वती म्हणजे पर्वतापासून बनलेली- पर्वताची लेक- तिच्या अंगाचा मळ म्हणजे साक्षात मळ नसून तीही फक्त मातीच व या मातीपासून तयार केलेली मूर्ती म्हणजे गणपती असाही खूप समर्पक अन्वयार्थ लावता येतोच. फक्त सर्वसामान्यांना समजून घेत, मौखिक परंपरेने, रंजक व कथात्म पद्धतीने असे काही सांगितल्यामुळे ते चमत्कृतीपूर्ण वाटते. वास्तविक पाहता हे सारे जगण्याचे शास्त्र आहे, हे मात्र खरे!
सर्जनाची किंवा नवनिर्मितीची साक्षात मूर्ती म्हणजे माती! माती हीच धारणा! रुजायचं, वाढायचं, लोप पावायचं, नाळ पुरायची, नाळ जोडायची- सगळा संबंध मातीशीच! गणपतीची मूर्ती मातीची असण्यामागे हाच सर्जनशील विचार आहे. गणपतीच्या पूजेमध्ये प्राणप्रतिष्ठा करताना मूर्तीच्या हृदयाच्या ठिकाणी दूर्वेने तूप लावून त्याठिकाणी हाताने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचा मंत्र म्हटला जातो. मूर्तीत प्राण प्रविष्ट झाले आहेत अशी श्रद्धापूर्वक कल्पना करून पुढचे विधी केले जातात. मला ‘प्राणप्रतिष्ठा करणे’ ही संकल्पना खूपच भावते. वाटतं की, आपलं शरीर हीसुद्धा एक मातीचीच मूर्ती आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा पाच महाभूतांपासून तयार झालेला हा देह शेवटी मातीस्वरूपच होणार आहे. रोज वेगवेगळे ताणे-बाणे निभावणारं हे शरीर आपण रात्री झोपेच्या स्वाधीन करतो. या जगापासून वेगळे होतो. एक प्रकारची शून्यावस्था झोपेत आपल्याला येते. सकाळी उठल्यावर या शून्यातून पुन्हा विश्‍व उभारायचं असतं. या धकाधकीच्या काळात जगताना गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेचं हे सुंदर कर्म प्रतिकात्म रूपात आपणही रोज सकाळी करावं...
पहाटे जाग यावी. उठावं. अंथरुणावर डोळे मिटून शांत बसावं. हृदयाच्या ठिकाणी हात ठेवावा. हृदयाला सांगावं की, ‘‘तू जिवंत आहेस. मला जिवंत ठेव. बधीर, बोथट होऊ नको. सभोवतीचं जग संवेदनशीलतेने टिपून घे. मी ‘माणूस’ म्हणून जिवंत आहे- हे सिद्ध कर!’’
‘माणूस’ म्हणून जगताना मानवी मनाची संवेदनशीलता या देहामध्ये रोज अशी प्रतिष्ठित करायला हवी. केवळ खाणं, पिणं, चालणं, फिरणं इ. पद्धतीने सगळेच चराचर इथे जगतात. अशा रूढार्थाने सगळेच तसे जिवंत असतात. पण आपण ‘माणूस’ म्हणून काही वेगळ्या प्रकारे जिवंत असायला हवे. वेगळे ‘जीववंत‘ असायला हवे. वेगळे जगायला हवे. आपल्या ठिकाणी असणार्‍या हृदयाला विविध बर्‍यावाईट संवेदनांची उत्कट जाणीव असायला हवी. सुख-दुःखांचे नानाविध पैलू त्याला कळायला हवेत. दुसर्‍याच्या सुखाने सुख व दुःखाने दुःख व्हायला हवे. दुसर्‍याला दुःख देऊन सुखी व दुसर्‍याला सुखी बघून हे हृदय दुःखी होता उपयोगी नाही. सुख-दुःखांची, आशा-निराशेची सह-अनुभूती या हृदयाला यायला हवी! रोज सकाळी हृदयाच्या ठिकाणी अशी प्राणप्रतिष्ठा करून ‘स्वतः’ला असे जिवंत ठेवायला हवे. माणुसकीच्या धर्माने याच उदात्त उद्देशाने ‘मूर्तीपूजा’ सांगितली आहे का? मातीच्या मूर्तीत केलेल्या प्राणप्रतिष्ठेने आपले हृदय, सर्व संवेदना व आत्मिक शक्ती जागृत झाली तरच ती पारदर्शक व डोळस श्रद्धा म्हणता येईल; अन्यथा संवेदनांचे डोळे बंद करून केलेली भक्ती व ठेवलेली श्रद्धा दोघीही अंध होऊन नुसत्याच चाचपडत राहतात. स्वतःचेच अस्तित्व उत्सवाच्या बाजारात शोधत राहतात. आज जिथे-तिथे याची प्रचिती येतेच आहे...
अर्थात संवेदनशील मन हवं, तसा बुद्धिमान मेंदूही हवा. आयुष्याचं हे तारू तरंगत जायचं तर खाली पाणी हवं आणि वर वाराही हवा! पण माणसाचा बुद्धिमान मेंदू जणू शाप मिळाल्यासारखा षड्‌रिपूंनी सहज ग्रासू शकतो. काम, क्रोध, लोभ, मद, मोह व मत्सर या सहा शत्रूंनी तो ग्रासला जातो व तिथेच सगळे अनर्थ ओढवतात. सर्व कला, संवेदना, भावना यांचे अधिपती असणार्‍या हृदयाला संयमी, विवेकी व स्थिर बुद्धीची (मेंदूची) जोड असायला हवी. कल्याणकारी सांबशिवाने याचसाठी माणसाचं हे विकारी व विषारी मस्तक उडवून त्याजागी हत्तीचं मस्तक आणून जोडलं आहे! हत्ती हा खूप बलाढ्य असूनही संपूर्ण शाकाहारी व प्रचंड बुद्धिमान प्राणी. त्याची बुद्धी षड्‌रिपूंनी ग्रासली जात नाही. भुकेने व्याकूळ झाला तरी तो एखाद्या प्राण्याला तुडवून मारून खात नाही. त्याची केलेली फसवणूक तो कधीच खपवून घेत नाही. तो लाचार होत नाही. तो मदांधही होत नाही. तो अन्याय करत नाही आणि अन्याय सहनही करत नाही! अशा प्रकारे साक्षात आदिमातेने स्वतःचे आयुष्य झिजवून घडवलेले बळकट शरीर, तिचेच कनवाळू संवेदनाक्षम मन आणि साक्षात जगद्पित्याने बहाल केलेले विवेकाचे मस्तक व कल्याणकारी बुद्धी अशा सुरेख संगमाने आदिदेव ठरलेला हा शिवपार्वतीचा पुत्र गणपती म्हणूनच सुखकर्ता व दुःखहर्ता ठरतो.
- गणपतीची सिरीयल बघणार्‍या मुलांच्या प्रतिक्रियेच्या निमित्ताने हा खूप सुंदर अन्वयार्थ उलगडला याचा आनंद झाला खरा, पण दुर्दैवाने आज अशी विचित्र परिस्थिती आहे की, या विघ्नहर्त्या गजाननाची ओळख मुलांना ‘एलीफंट गॉड’ अशी करून दिली जाते. फनी कार्टूनच्या रूपात पौराणिक सिरीयल्स दाखवल्या जातात. आणि मग ‘पार्वतीच्या अंगावर इतका मळ साठला होता की काय?’ अशी प्रतिक्रिया हे बालगणेश उत्स्फूर्तपणे व्यक्त करताना दिसतात. मुळातले उद्देश, खरे ज्ञान मागे पडते.
खरे तर हा माय-लेकराच्या मायेचा गौरी-गणपतीचा सण. पण आज परस्परविरोधी चित्रे अवतीभवती दिसताहेत. माता वैरीण, पुत्र शत्रू बनतो आहे आणि पिता अत्याचार करत सुटला आहे. प्रचंड विरोधाभासाच्या या चित्रात कुटुंबव्यवस्थाच डळमळीत होऊन कोलमडताना दिसते आहे. नाती दुरावताहेत. सांस्कृतिक चंगळवाद फोफावतो आहे. साहजिकच नात्यांची वीण घट्ट करणारे सांस्कृतिक सोहळे, रीतीरिवाज, सणवार झपाट्याने बदलताना दिसताहेत.
संपूर्ण बदललेला आजचा गणेशोत्सव हे या बदललेल्या विचित्र परिस्थितीचेच एक प्रतिबिंब आहे, हे कटू सत्य आहे. आपण आपल्या धारणांपासून दूर चाललो आहोत. या मातीशी असणारी नाळ तोडत चाललो आहोत. फार दूर कशाला, आता आपण अगदी जवळचेच उदाहरण घेऊ. खरं तर ‘मातास्वरूप मातीची मूर्ती’ तयार करून तिचा गौरव करून पुजण्याचा हा सण. तर आपण या धारणेलाच फाटा देत आहोत. माती सोडून अन्य कोणत्याही पदार्थांपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती हे कसले प्रतीक आहे? प्लॅस्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल, सिमेंट, वाळू, दगड, खडी कमी पडते म्हणून की काय बाटल्या, काचा, मणी, नाणी, लाकूड-फाटा, दाणा-गोटा इथपासून ते धागेदोरे, सुंभ, सुतळी, वायरी, तारांपर्यंत आणि सोडावॉटरच्या बुचांपर्यंत कसलीही गणेशमूर्ती आपण बनवतो. रबर, प्लॅस्टिक, कचकडी सामानाची खैरात करतो. ‘इको फ्रेंडली गणेश’ करण्यासाठी कापूस, काथ्या, चिंध्या, कागदाचा लगदा, पुठ्ठे, पेपर, गोणपाटं, बारदानं, बांबू, पिडे, सोडणं, चुडतं, बोंडं, केसरं नि तुरे... काही म्हणता काही आपण शिल्लक ठेवत नाही. वरून इलेक्ट्रिक दिव्यांचा झगमगाट, कर्कश संगीत व फटाक्यांचा धुमाकूळही सुरू असतो. स्पर्धा, खाणे, कपडे खरेदी, मौजमजेची जत्रा असते. सोडती, लॉटर्‍या, वर्गण्या नि खंडण्या लुटल्या जातात. रस्त्यावर तर रस्त्यावर, गटारावर तर गटारावर, घाणीच्या नाल्यावर तर नाल्यावर, साचलेल्या पाण्यात, टाकीत, नदीत, ओढ्याकाठी, बाजारात, चौकात, स्टँडवर, तिस्कावर, गल्लीबोळात, धुळीत, वाळूत वाट्टेल तिथे गणेशमूर्ती पूजली जाते. होय. हीच वस्तुस्थिती आहे....!!!
‘‘या सर्वामधून कलेची जोपासना होते. समत्व, प्रेम, श्रद्धा, बंधुभाव वाढतो. एक निखळ आनंद मिळतो. दुःख झेलायची ताकद येते. जगण्यातलं सौंदर्य वाढतं’’- हे सगळं खरं आहे. सगळं सगळं मान्य आहे. पण या गोंडस रूपापेक्षा आपण आपल्या धारणांपासून दूर चाललो आहोत, हे विचित्र चित्र अधिक खरं आहे. आणि यातून होणार्‍या मिळकतीपेक्षा होणारी ही हानी खूप मोठी व अधिक धोकादायक आहे. प्रचंड उत्साहाने आणि अतिरेकी जल्लोषात निघणार्‍या, प्रदूषण करणार्‍या गणेश विसर्जन मिरवणुका, त्यात होणारी चेंगराचेंगरी, गुंडगिरी आणि हकनाक गमावलेले जीव हा तर सगळ्याचा कळस ठरतो आहे!
**********
हो, हे सगळं खरं आहे. पण तरीही हे सगळं होतच राहील! काळाच्या अथांग दर्याच्या उदरातून भल्या-बुर्‍याच्या लाटा येत राहतील. वाईट-साईट कधी ना कधी किनार्‍याला लागेल. चांगल्याचे मोती होेऊन बाहेर पडतील. तण फोफावत राहील. रान माजेल. पण हा दाह आशेच्या-श्रद्धेच्या दूर्वेने शांतही होत राहील. दोन्हीही या मातीचेच पुत्र- पण कार्तिकेय विनाकारण वळसा घालून भक्ती करेल. गणपती हुशारीने प्रदक्षिणेवर श्रद्धा ठेवेल. लिहिणारे लिहीतील, वाचणारे ‘वाचतील!’ चिखल करणारे चिखल करतील. मूर्ती करणारे मूर्ती करत राहतील... सद्विचारांचे गणपती अविचारांच्या उंदरांवर अंकुश ठेवत राहतील....
कोणी काहीही म्हणो. भक्तीचा शिमगा होवो किंवा चैनीची दिवाळखोरी होवो, समृद्धीचे श्रावण बरसोत किंवा अर्थव्यवस्थेवर संक्रांत येवो- तुमची आमची ‘चवथ’ मात्र धूमधडाक्यात साजरी होईल.
माटोळीचा बाजार भरेल. फळफळावळ, खाणं-पिणं, खरेदीची झुंबड उडेल. बाजार फुलेले. ‘वजी’ पाठवली जातील. नेवर्‍या, मोदक, लाडू, फराळ, रंगरंगोटी, मारांदे, पेटारे, फोली-पताका, डेकोरेशन्स, मखरं, जागरणं, हारतुरे... लयलूट होईल. तेल, वात, धूप, दीप, रांगोळ्या सजतील. ‘तये’च्या उपासात गणपती घरी येईल. ‘चवथी’च्या पूजेला भट दारात येईल. घाई करेल. गणपती बसवेल. झांजा, आरत्या, घुमटं घुमतील. भजनाच्या फैरी झडतील. खाणं, जेवणं, फिरणं, पूजा-नैवेद्य-वाडी, नवस-सायास, भेटी-गाठी चंगळ होईल. पाचव्या-सातव्या दिवशी ‘गवर’ येईल. देवीची भाजी-भाकरी, ‘हौशे’ गावभर वाटले जातील. फुगड्या-फेर-गाण्यांमधून ‘माये’ला सुखं-दुःखं सांगितली जातील... बाप्पाचा बाप, मायेची थोरली माय आणि त्यांचा लाडका ‘बाळ’ गणेश आशीर्वादाचा हात पाठीवरून फिरवत राहील... साठां उत्तरांची ही कहाणी पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण होईल! बघता बघता बाप्पा निघायची तयारी करतील... एका डोळ्यात सुखाचा पूर, दुसर्‍या डोळ्यात विरहाची नदी आणि अंतःकरणात समाधानाच्या लहरी उठत राहतील आणि आतून साद येत राहील, गाज उठत राहील- ‘गणपती बाप्पा मोरया’ या उत्स्फूर्त उद्घोषाची!

सार्वजनिक गणेशोत्सव

प्रा. रमेश सप्रे



‘लोकमान्य’ ही पदवी टिळकांना पद्मश्री, पद्मभूषणसारखी ‘पद्मखिरापत किंवा खैरात’ म्हणून सरकारनं दिली नव्हती. कारण त्यावेळचं इंग्रजांचं सरकार. या ‘भारतीय असंतोषाच्या जनका’ला अशी काही पदवी देणं शक्यच नव्हतं. बहुजन-सामान्य-लोकांनीच आपल्या या लाडक्या नेत्याला ‘लोकमान्य’ म्हणायला सुरुवात केली होती. कारण टिळकांचं सर्व कार्यच- म्हणजे लेखन, भाषण, जीवन- लोकांना मान्य होतं. कारण त्याचा हेतू आणि परिणाम सार्‍यांच्या हिताचाच असणार होता. ‘केसरी’ वृत्तपत्रातील अग्रलेखच नव्हेत तर त्यांची अन्य ग्रंथसंपदाही लोकमान्य होती. त्यांचं कर्तृत्व-वक्तृत्व-नेतृत्व सारं लोकांना शिरोधार्य होतं. म्हणून टिळक हे लोकमान्य!
लोकमान्यांच्या भारतीय जनतेच्या कल्याणभावनेतून दोन महत्त्वाचे सण-समारंभ जन्मास आले. सार्वजनिक गणेशोत्सव नि शिवजयंती! स्वराज्य हा त्यांचा केवळ जन्मसिद्ध अधिकारच नव्हता तर त्यांचा ध्यास होता नि श्‍वासही होता. त्यामुळे भारतीय जनता केवळ गुलामीतून मुक्त व्हावी एवढाच त्यांचा प्रयत्न नव्हता तर सामाजिक एकता- भावनिक एकात्मता या सूत्रात समाजातील सर्व गट-पंथ-संप्रदाय बांधले जावेत हाही उद्देश त्यांच्या सर्व कार्यक्रम-उपक्रमांत असायचा.
छत्रपती शिवराय हा आपला मानबिंदू आहे, या विचारातून त्यांनी शिवजयंतीचा उत्सव सुरू केला. देशभक्तीचा स्फुल्लिंग लोकांच्या मनामनात चेतवण्यासाठी त्यांचा हा प्रयोग होता. केवळ ‘जय भवानी, जय शिवाजी’ची घोषणा देत संकुचित राजकारण लो. टिळकांच्या कल्पनेतसुद्धा नव्हतं, तर आत्मबलिदानासाठी समाजाच्या सर्व थरांतील लोकांना त्यांना आवाहन करायचं होतं. विशेषतः युवावर्गाला.
त्याचवेळी या ‘गीतारहस्य’ जाणणार्‍या व सर्वांना सांगणार्‍या द्रष्ट्या प्रेषिताच्या लक्षात आलं की धर्म नि त्याचं अंग असलेले सण-समारंभ-सोहळे हा भारतीयांचा प्राण आहे. विवेकानंद म्हणत त्याप्रमाणे ‘भारत हा धर्मप्राण देश आहे. इथे धर्माविरुद्ध चळवळ करावयाची असेल तरी त्याचा आधार धर्मच असावा लागेल.’ या दृष्टिकोनातून लो. टिळकांनी ‘जनगणमन’च्या खर्‍या अधिनायकाचा म्हणजे गणेशाचा सार्वजनिक उत्सव सुरू केला. त्यावेळच्या नेत्यांचं वैशिष्ट्य होतं- आधी केलं, मग सांगितलं. समर्थ रामदासांच्या शब्दांत- ‘क्रिया करून करवावी बहुतांकरवी|’ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचा ठरवल्यावर- राहणी (स्वतःचं उदाहरण)- वाणी- लेखणी या त्रिवेणीच्या माध्यमातून प्रचार-प्रसार सुरू झाला.
लो. टिळकांच्या मनात असलेला सार्वजनिक गणेशोत्सव नि आजचा उत्सव यात खूप फरक आहे. लोकमान्यांचा उत्सव स्वप्नवत् वाटावा इतकं आजचं वास्तव भयानक आहे. पण एक गोष्ट सर्वप्रथम लक्षात ठेवली पाहिजे की काही वर्षांपूर्वी असलेलं उत्सवाचं बरंचसं बकाल, अभद्र रूप हळूहळू सुधारतंय. याविषयी सहचिंतन श्रीगणेशाच्या प्रेरणेनंच करूया. चिंतनासाठी एकवीस मुद्दे घेऊया. एका परीनं गणेशाला अर्पण केलेली ही दूर्वांची जुडीच समजूया.
श्रीगणेशमूर्ती ः पूर्वीही सार्वजनिक गणेशाची मूर्ती मोठी असायची. पण आजच्याएवढ्या अजस्त्र मूर्ती तेव्हा नसत. आज इलेक्ट्रिसिटीच्या तारा दूर करून, वर उचलून अशा मूर्तीची मिरवणूक काढावी लागते. पूर्वीच्या जवळजवळ सर्व मूर्ती शाडूच्या (मातीच्या) असत. त्या जलाशयात पूर्णपणे मिसळून जात. आज प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती अगदी घरीसुद्धा बसवल्या जातात. त्या पाण्यात विरघळत तर नाहीतच, पण इतर समस्या मात्र निर्माण करतात. दिसतात रेखीव नि रंगसंगतीही सुंदर असते, पण त्या निसर्गस्नेही नसतात.
श्रीगणेशाचं आगमन ः ही मिरवणूक पूर्वी आजच्याएवढी भव्य नसायची. पण वाद्यांच्या गजरात गणरायाला आणणं हा सात्त्विक अनुभव असायचा. आज मात्र ढोल-ताशांचा हृदयाचे ठोके चुकवणारा गडगडाट, फटाक्यांच्या माळांचा कानठळ्या बसवणारा आवाज, समोर नाचणार्‍यांचा कर्कश्श गोंगाट यांनी गणरायाचं आगमन हा फारसा सुखद प्रकार नसतो. छोट्यामोठ्या सार्वजनिक मंडळांच्या गणपतीच्या मूर्ती कमी-जास्त प्रमाणात पण अशा वाजत-गाजत येतात.
श्रीगणेशपूजन ः रोज पूजा आजही केली जाते. सर्वच मोठ्या प्रमाणावर असल्याने ही पूजा पूर्वीप्रमाणे षोड्‌शोपचारांनीच होते. फक्त ध्वनिक्षेपकाचा मोठा आवाज, नैवेद्याच्या पदार्थांची गर्दी, भक्तांपेक्षा कार्यकर्त्यांचा जोशपूर्ण सहभाग यामुळे या नित्यपूजेतील भाव, उत्कटता, आर्तता कमी होत चाललीय. आर्त भावाशिवाय म्हटली जाणारी गदारोळी समूहआरती ही काहीशी कर्णकटू व कानाच्या पडद्यांना त्रासदायक असते.
श्रीगणेशविसर्जन ः सलग आवाहन-पूजन-विसर्जनाचा विचार व्हावा म्हणून हा पैलू आधी घेतलाय. विसर्जनाची मिरवणूक हा पूर्वी- म्हणजे अगदी चाळीसपन्नास वर्षांपूर्वी- हृदयस्पर्शी सोहळा असायचा. गणरायाला दिला जाणारा निरोप; त्यावेळी त्याच्यासमोर केले जाणारे दांडपट्टा, बोथाटी यांसारखे मैदानी खेळ; केली जाणारी लोकनृत्ये; दिल्या जाणार्‍या घोषणा; रस्त्यावर जागोजागी केली जाणारी आतषबाजी; सामाजिक एकात्मतेचा विशिष्ट संदेेेेेश देणार्‍या कमानी; रात्री प्रकाशासाठी पेटवलेल्या गॅसबत्त्या अन् त्या डोईवर घेऊन जाणार्‍या व्यक्ती हे सारं रोमहर्षक, प्रेक्षणीय नि संस्मरणीय असायचं.
आजची विसर्जन मिरवणूक विद्युत रोषणाई, चाकावर फिरणारे चालतेबोलते चित्ररथ, निरनिराळ्या प्रायोजकांनी उभारलेल्या नि त्यांच्या जाहिरातींनी सजवलेल्या मोठमोठ्या कमानी (हे प्रायोजक बर्‍याच वेळा तंबाखू, गुटखा, मद्य यांचे निर्माते असतात), ‘बँजो पार्टी’ नावानं ढणढण वाजणारं कर्णकर्कश्श संगीत; वाहतूक, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची साधनं, विद्युतपुरवठा, स्वच्छता व आरोग्य अशा सर्व प्रकारच्या व्यवस्थांवर पडणारा ताण; तासन्‌तास चालणारा हा अंगावर येणारा विसर्जन सोहळा हे सारंच भयंकर वाटतं. पूर्वी गणपतीला निरोप देताना हुरहूर वाटायची, डोळे पाणवायचे. आज बहुतेकजण ‘गेले बुवा गणपती!’ असं म्हणून सुटकेचा निःश्‍वास सोडतात. कारण आधीचे काही दिवस सार्‍यांची अवस्था ओलीस ठेवलेल्या व्यक्तीप्रमाणे असहाय झालेली असते. लो. टिळकांना स्वप्नातही असा गणेशोत्सव अभिप्रेत नसावा.
निधिसंकलन ः लोकांनी ‘स्वेच्छेनं-स्वखुशीनं’ दिलेल्या वर्गणीतून पूर्वीचा सार्वजनिक गणेशोत्सव थाटात साजरा होत असे. त्यावेळचे उत्सवाचे अर्थशास्त्र वेगळे होते. म्हणजे उत्सवांना अर्थही होता नि शास्त्रही! आज एकूण सर्व गणेशमंडळांची महाराष्ट्रातली एकूण उलाढाल कोट्यवधी रुपयांची असेल. लाखो रुपयांच्या मूर्ती, तितकाच खर्च करून मूर्तिमंडप नि त्याच्या कितीतरी पटीनं खर्च करून उभारलेले देखावे! हे सारं खरं असल्यासारखं भासतं. एरव्हीचे रहदारीनं वाहणारे बरेचसे अस्वच्छ रस्ते एखाद्या स्वप्ननगरीसारखे चकचकीत बनवतात. झळाळून उठतात.
एवढा पैसा खर्च करायचा म्हणजे त्याहून अधिक जमा करायचा. यासाठी वर्गणी- तीही सक्तीची- म्हणजे एकप्रकारची खंडणीच! मध्यमवर्गीयांना, गरिबांना परवडणार नाही एवढ्या रकमेच्या पावत्या आधी तयार करूनच फाडल्या जातात. आपल्या व घराच्या सुरक्षिततेसाठी अनेकांना हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावाच लागतो. जनशक्ती व लोकसत्ता यांच्यापुढे शहाणपण कुणाचं चालणार?
अक्षरशः भुईछत्रांप्रमाणे (मशरूम्स) दरवर्षी उगवणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अन् त्यांच्या लहानमोठ्या तथाकथित कार्यकर्त्यांकडून सक्तीनं केलेलं निधिसंकलन, हा सारा प्रकार बेहिशेबी कारभाराचं उदाहरण असतं. हिशेब सादर केले जातात, पण त्यात मोठ्या प्रमाणावर गोलमाल प्रकार घडलेले असतात. सामान्य माणसांच्या हातात फक्त गणरायाची प्रार्थना करणं एवढंच असतं.
कार्यक्रम ः लो. टिळकांच्या गणेशोत्सवाचा समाजप्रबोधनाचे कार्यक्रम हा अक्षरशः प्राण होता. हे कार्यक्रमही मनोरंजनाच्या माध्यमातून सादर केलेले असत. काही व्याख्यानं, चर्चा, परिसंवाद मात्र बर्‍यापैकी बौद्धिक वळणाचे असत. पण तेही समाजाच्या हिताचे असत. ‘मेळे’ नावाचा एक प्रकार त्याकाळी लोकप्रिय होता. यात अनेक दृक्‌श्राव्य प्रकारांचा सुंदर मेळ असायचा. गीतं, पोवाडे, भारुडं, व्यक्तिगत व सामूहिक देशजागरणपर पदं, नाटकुली, संवाद, नकला, वाद्यसंगीत असा भरगच्च कार्यक्रम सादर केला जायचा. यातले सर्व कार्यक्रम सांस्कृतिक असत. गणेशपूजेचं व उत्सवाचं पावित्र्य सांभाळणारे असत. लोक जागोजागी गर्दी करून हे मेंदू-मन-मनगट या तिन्हींना प्रेरणा देणारे कार्यक्रम रूचीनं पाहत. आज वैचारिक कार्यक्रमांना अनेक गणेशोत्सव मंडळांनी फाटा दिलेला दिसतो. कार्यक्रम पत्रिकेत व्याख्यानं- चर्चा- परिसंवाद यांच्यावर काट मारलेली असते. महनीय व्यक्तींच्या (सेलेब्रिटी) मुलाखतीही करमणुकीच्या अंगानेच घेतल्या जातात. व्यावसायिक नाटकं, सिनेमा, ऑर्केस्ट्रा यांचं प्राबल्य असतं. सिनेगीतांच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. हे सारं लो. टिळकांना अभिप्रेत नव्हतं.
उपक्रम ः विविध विषयांवर निरनिराळ्या वयोगटांसाठी घेतल्या जाणार्‍या स्पर्धा; गणेश व इतर देवदेवतांच्या स्तोत्रांचं मोठ्या प्रमाणावर पठण, रोज केला जाणारा मंत्रजागर, शांतिमंत्रांचा गजर हे पूर्वीपेक्षा लक्षणीय असतं. विशेष म्हणजे उपक्रमांच्या पातळीवर पूर्वीपेक्षा आज जरा जास्त जागृती झालेली दिसते. लो. टिळकांना बरे वाटेल असे समाजहिताचे उपक्रम काही मोठ्या मंडळांतर्फे राबवले जातात. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहं, शिष्यवृत्त्या, उच्च शिक्षणासाठी व संशोधनासाठी आर्थिक साह्य हे उपक्रम कौतुकास्पद आहेत. वेश्यांच्या मुलामुलींचं पुनर्वसन, मुलींच्या-स्त्रियांच्या आरोग्यासाठी शिबिरं, मोफत शस्त्रक्रिया इ. इ. अनेक उपक्रम खास उल्लेख करण्यासारखे आहेत. यासाठी उर्वरित निधी वापरला जातो.
प्रायोजक (स्पॉन्सर्स) ः एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करायचा तर प्रायोजक हवेतच. पूर्वीही असे लोक सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मदत करत. पण एक तर त्यांची संख्या कमी होती नि उत्सवासाठी लागणारा निधीही मर्यादित असायचा. आज मात्र मोठ्या प्रमाणावर वर्गणी जमवूनही प्रायोजकांची गरज उरतेच. यात वाईट काही नाही, फक्त अनेक ठिकाणी प्रायोजक समाजविघातक उत्पादनं निर्माण करणारे असतात. जर्दा-तंबाखू-गुटखा यांनी शाकारलेल्या भव्य कमानीतून गणराय प्रवेश करतात अन् त्याहीपेक्षा मोठ्या अशा कमानीतून मोठ्या थाटात निरोप घेतात. या कमानी उभारणार्‍यांचे उत्पन्नाचे स्रोत, उत्पादन करतात ते दारूसारखे पदार्थ. हा सारा प्रकार गणरायाचाही श्‍वास गुदमरवणारा असतो. काळाच्या ओघात असे प्रायोजनाचे प्रकार खूप वाढून आता काहीसे कमी होऊ लागलेत.
पुरस्कर्ते ः पूर्वी प्रायोजक हा प्रकार नव्हता. पुरस्कर्तेसुद्धा आर्थिक व्यवहार शुद्ध असणारे  असत. आज गणेशोत्सव मंडळांतर्फे स्मरणिका काढल्या जातात. स्मरणचिन्हं वाटली जातात. स्तोत्र-आरतीसंग्रह प्रकाशित होतात. या सार्‍यांना पुरस्कृत करणारे बरेचसे राजकीय क्षेत्रातले प्रतिनिधी किंवा कार्यकर्ते असतात किंवा गैरव्यवहार, भ्रष्टाचार करणार्‍या छोट्या-मोठ्या संस्था असतात. हे चित्र बदललं पाहिजे.
उत्सवोत्तर कार्यक्रम ः जी गणेशोत्सव मंडळे पूर्वीच्या चालीप्रमाणे चांगल्या परंपरांचं पालन करणारी असतात ती उत्सव संपल्यानंतरही वर्षभर विद्यार्थ्यांना अभ्यासविषयक मार्गदर्शन, व्यवसाय समुपदेशन, आरोग्य शिबिरं, स्पर्धापरीक्षांची तयारी, रक्तदानासारखी शिबिरं, श्रमदान, सामाजिक आपत्तीत साह्य अशी कामं करतच राहतात. हल्ली याविषयी जागृती होऊ लागलीय.
सजावट ः पूर्वीची गणेशमूर्तीच्या मागची, पुढची, बाजूची सजावट वेधक पण साधी असायची. आजकाल मात्र हाती असलेला निधी, प्रगत तंत्रज्ञानाची जोड, कलाकुसर व इतर कौशल्यांचा झालेला विकास यामुळे दरवर्षी नवनवे विषय (थीम्स) घेऊन नेत्रदीपक सजावट केली जाते. जगातील आश्‍चर्ये, संपन्न नगरे, राजवाडे, मंदिरे, पर्यटनस्थळे, देवस्थाने (अष्टविनायक, ज्योतिर्लिंग इ.) यांच्या हुबेहूब प्रतिकृती सादर केल्या जातात. हा स्वागतार्ह बदल आहे.
अनिष्ट प्रथांना आमंत्रण ः गणेशोत्सवाच्या निमित्तानं होणारी गर्दी, वाढणारी गुन्हेगारी, गणेशमंडळांची परस्पर जीवघेणी स्पर्धा, पैशांचा अतोनात होणारा अपव्यय, अरुणांना व तरुणांना वाईट सवयी लागण्याची शक्यता व तशा उपलब्ध संधी, या हल्लीच्या उत्सवातील अनिष्ट प्रथा थांबवल्या पाहिजेत.
अनिष्ट प्रथांची बोळवण ः काही चांगल्या प्रथा आता प्रस्थापित होऊ लागल्या आहेत. निर्माल्यसंकलन, कचर्‍याची विल्हेवाट, नव्या प्रकारचे दीप वापरून विजेची बचत, रस्त्यावरील वाहतुकीचं निमंत्रण, एकूण आयोजनात दिसून येणारं व्यवस्थापन आणि ढिसाळपणाला निरोप, वाढता नीटनेटकेपणा, समयपालनाच्या शिस्तीचा संस्कार अशा कित्येक चांगल्या गोष्टी हळूहळू विकसित होऊ लागल्या आहेत.