ऐका गणेशदेवा, तुमची कहाणी

डॉ. अनुजा जोशी




लहानपणापासून मला बालगणेश खूप आवडतो. त्याचा गोंडस बाळसेदारपणा व कोवळ्या अंकुरासारखी टुकटुकीत त्याची इवलीशी ‘सोंडुली’- मला खूपच भावते. पण तेव्हा एखाद्या कॅलेंडरशिवाय तो फारसा कुठे दिसत नसे. गणेशचतुर्थीतही कुठेतरी क्वचित एखाद-दुसरा नवसाचा बालगणेश बसवलेला दिसायचा.
पण अलीकडे टीव्ही-जाहिरातींच्या आक्रमणामुळे तो स्टीकर्स, टॅटू, टिफीन, बॅगा, कपडे, वह्या, पुस्तके कुठेही दिसू लागलाय. पौराणिक मालिका व कार्टून सिरीयल्समध्ये त्याचं अनेकदा ‘लाईव्ह’ दर्शनही घडलं. बालगणपती अनेक खोड्या करताना, लढाया-पराक्रम करतानाही बघायला मिळाला. ‘ओ माय फ्रेंड गणेशा’ने तर धमालच उडवून दिली. आणि आता तर सार्वजनिक गणेशोत्सवाचे पेव फुटल्यापासून बालगणपतीच काय, तरुण-वयस्कर कोणत्याही वयाचा, कोणत्याही ‘व्हरायटी’चा गणपती दिसू लागलाय! सैनिक, शेतकरी, कुंभार, इंजिनिअर, डॉक्टर असे सगळे व्यवसाय करणारा, साधू-बाबा-संत-महंत सर्वांच्या रूपातला, सगळ्या देव-देवतांच्या आकारातला, प्राणी-पक्षी, फुलं-फळं यांपासून तयार झालेला, काडेपेटीच्या आकारापासून ते माडाच्या उंचीपर्यंत- सगळ्या गणपतींचा सुकाळ झाला! गणेशोत्सवाचा ‘गनेश फेस्टिव्हल’ झाला!
या बदललेल्या दिवसातला एक गमतीशीर प्रसंग येथे आवर्जून आता सांगावासा वाटतोय-
टीव्हीवर गणपतीचीच एक पौराणिक मालिका सुरू होती. बच्चेकंपनी बघायला बसलेली. मालिकेत ‘पार्वती आपल्या अंगाचा मळ काढून त्याची मूर्ती तयार करते आहे’ असा सीन होता. आता थोड्याच वेळात माझा आवडता बालगणपती बघायला मिळणार या आशेने मीही तिथे थांबले. पार्वती अंगाचा ‘मळ’ काढत होती. तो मळ चकचक चमकताना वगैरेही दाखवला होता. लेप उतरवावा तसा ‘मळ’ उतरवून पार्वतीने त्याची एक मूर्ती तयार केली. अर्थात मूर्तीही चमकू लागली. त्यापासून एक छान गुटगुटीत बाळ तयार झालं. अंगाच्या मळाचं असं बाळ तयार झालेलं बघून सिरीयल बघणार्‍या बच्चेकंपनीकडून- ‘‘श्श्शीऽऽऽ इतका मळ तिच्या अंगावर साठला होता की काय?’’ अशी जबरदस्त प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. मुले अगदी उत्स्फूर्तपणे व बेधडकपणे हे बोलली व एखादी मनोरंजक फँटसी बघावी तशी पुन्हा मजेत सिरीयल बघू लागली...
-मुलांची शंका व प्रतिक्रिया अतिशय रास्त होती. ‘पार्वतीच्या अंगाच्या मळाची मूर्ती’ हा किंतु माझ्याही मनात लहानपणापासून होता. खरं तर, आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात हे कधी ना कधी येऊन गेलंही असेल. पण असं म्हणण्याचं, कुणाला विचारण्याचं धाडस आपण कधी केलं नाही. सणवार- धार्मिक श्रद्धा व सगळ्याची व्यर्थ भीती यांमुळे अशा अनेक प्रश्‍नांच्या स्प्रिंग्ज् दाबून ठेवण्याएवढे बावळट आपण नक्की होतो. आपले एक वेळ चालून गेले. पण असं लक्षात घ्यायला हवं की, आजची ही बालगणेशांची पिढी खूप स्मार्ट बनली आहे. बुद्धिमान आहे. त्यांना खूप प्रश्‍न पडतात. त्यांची समर्पक उत्तरेही त्यांना हवी असतात. त्यांच्या पौगंडावस्थेत तर ‘त्यांना सगळं काही कळतं आणि काहीच कळत नाही’ अशा दोन्हींचं मिश्रण झालेलं असतं. धार्मिक गोष्टींकडे केवळ अवडंबर आणि हौस म्हणून न बघता त्यातलं ‘ज्ञान’ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या आयुष्याच्या इमारती मुलभूत ज्ञानाच्या या पायावर भक्कम उभ्या राहू शकतात. म्हणून अशा गोष्टी आपणच जिज्ञासूपणे समजून घेऊन त्यांच्यापर्यंत योग्यप्रकारे पोचवल्या पाहिजेत असं या प्रसंगानंतर वारंवार माझ्या मनात येऊ लागलं.
शास्त्रे-पुराणे-लोकवेदातल्या अशा गोष्टींमागे असलेले वैज्ञानिक आधार पार्वतीच्या या गोष्टीपासूनच मी शोधायचे ठरवले. आज मुलांचं जगही बदललं आहे. डोरेमॉन, निंजा हतोडी, त्यांची भारी भारी गॅजेटस्, त्यांचे पराक्रम, पोकेमॉन, पिकाचू, शिशिमानो, कियो, सुनियो, टॉम ऍण्ड जेरी, ऑग्गी ऍण्ड कॉक्रोचेस् वगैरे वगैरेंच्या अवघ्या लीला समरसून बघणार्‍या मुलांनी ‘पार्वतीने अंगाच्या मळाची मूर्ती तयार करणे’ हा चमत्कारही तेवढाच मजेदारपणे बघितला होता. प्रचंड ज्ञानाचे भांडार असलेली ‘श्रीगणेश’ ही संकल्पना मुलांनी फक्त कार्टून म्हणून बघावी, याचा मला मनोमन खूप खेद वाटत होता...
**********
पुरुषबीज व स्त्रीबीज संयोगातून गर्भाशयामध्ये गर्भधारणा होते. स्त्रीचा मासिक रजःस्राव बंद होतो व पुढे त्यावरच नऊ महिने गर्भाचे पोषण सुरू राहते. जो स्त्राव दरमहा शरीरातून ‘मल’ रूपात बाहेर पडणार असतो, त्यावरच गर्भाची वाढ होते. म्हणजेच आपला जन्म हा असा ‘मळामधूनच’ होतो. चिखल, दलदलीतून ज्याप्रमाणे सुरेख कमळ फुलून येते, तसेच रजःस्रावाच्या पोषणामुळे ‘सजीव देह’ जन्माला येतो. नवनिर्मिती ही अशी दोषांना पचवूनच होत असते असेही म्हटले तरी चालेल. या नवनिर्मितीच्या- सर्जनाच्या प्रक्रियेत दोष पोसले जात नाहीत तर दोष पचवले जातात! दोघांमधलेही गुण शोषून घेऊन अस्सल नवी कलाकृती निर्माण होते. दोषांना संपूर्ण पचनी पाडून तयार होणारी ही कलाकृती संपूर्ण निर्दोष, निर्व्यंगी व आनंददायी असते. पार्वतीच्या ‘अंगाचा मळ’ या संकल्पनेत ‘मळा’मधून निर्माण होणार्‍या आपल्या सुंदर अशा जन्माचे एवढे मोठे शास्त्र समावले आहे! ‘पार्वती’ या शब्दाचा लाक्षणिक अर्थ लक्षात घेतल्यास पार्वती म्हणजे पर्वतापासून बनलेली- पर्वताची लेक- तिच्या अंगाचा मळ म्हणजे साक्षात मळ नसून तीही फक्त मातीच व या मातीपासून तयार केलेली मूर्ती म्हणजे गणपती असाही खूप समर्पक अन्वयार्थ लावता येतोच. फक्त सर्वसामान्यांना समजून घेत, मौखिक परंपरेने, रंजक व कथात्म पद्धतीने असे काही सांगितल्यामुळे ते चमत्कृतीपूर्ण वाटते. वास्तविक पाहता हे सारे जगण्याचे शास्त्र आहे, हे मात्र खरे!
सर्जनाची किंवा नवनिर्मितीची साक्षात मूर्ती म्हणजे माती! माती हीच धारणा! रुजायचं, वाढायचं, लोप पावायचं, नाळ पुरायची, नाळ जोडायची- सगळा संबंध मातीशीच! गणपतीची मूर्ती मातीची असण्यामागे हाच सर्जनशील विचार आहे. गणपतीच्या पूजेमध्ये प्राणप्रतिष्ठा करताना मूर्तीच्या हृदयाच्या ठिकाणी दूर्वेने तूप लावून त्याठिकाणी हाताने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचा मंत्र म्हटला जातो. मूर्तीत प्राण प्रविष्ट झाले आहेत अशी श्रद्धापूर्वक कल्पना करून पुढचे विधी केले जातात. मला ‘प्राणप्रतिष्ठा करणे’ ही संकल्पना खूपच भावते. वाटतं की, आपलं शरीर हीसुद्धा एक मातीचीच मूर्ती आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा पाच महाभूतांपासून तयार झालेला हा देह शेवटी मातीस्वरूपच होणार आहे. रोज वेगवेगळे ताणे-बाणे निभावणारं हे शरीर आपण रात्री झोपेच्या स्वाधीन करतो. या जगापासून वेगळे होतो. एक प्रकारची शून्यावस्था झोपेत आपल्याला येते. सकाळी उठल्यावर या शून्यातून पुन्हा विश्‍व उभारायचं असतं. या धकाधकीच्या काळात जगताना गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेचं हे सुंदर कर्म प्रतिकात्म रूपात आपणही रोज सकाळी करावं...
पहाटे जाग यावी. उठावं. अंथरुणावर डोळे मिटून शांत बसावं. हृदयाच्या ठिकाणी हात ठेवावा. हृदयाला सांगावं की, ‘‘तू जिवंत आहेस. मला जिवंत ठेव. बधीर, बोथट होऊ नको. सभोवतीचं जग संवेदनशीलतेने टिपून घे. मी ‘माणूस’ म्हणून जिवंत आहे- हे सिद्ध कर!’’
‘माणूस’ म्हणून जगताना मानवी मनाची संवेदनशीलता या देहामध्ये रोज अशी प्रतिष्ठित करायला हवी. केवळ खाणं, पिणं, चालणं, फिरणं इ. पद्धतीने सगळेच चराचर इथे जगतात. अशा रूढार्थाने सगळेच तसे जिवंत असतात. पण आपण ‘माणूस’ म्हणून काही वेगळ्या प्रकारे जिवंत असायला हवे. वेगळे ‘जीववंत‘ असायला हवे. वेगळे जगायला हवे. आपल्या ठिकाणी असणार्‍या हृदयाला विविध बर्‍यावाईट संवेदनांची उत्कट जाणीव असायला हवी. सुख-दुःखांचे नानाविध पैलू त्याला कळायला हवेत. दुसर्‍याच्या सुखाने सुख व दुःखाने दुःख व्हायला हवे. दुसर्‍याला दुःख देऊन सुखी व दुसर्‍याला सुखी बघून हे हृदय दुःखी होता उपयोगी नाही. सुख-दुःखांची, आशा-निराशेची सह-अनुभूती या हृदयाला यायला हवी! रोज सकाळी हृदयाच्या ठिकाणी अशी प्राणप्रतिष्ठा करून ‘स्वतः’ला असे जिवंत ठेवायला हवे. माणुसकीच्या धर्माने याच उदात्त उद्देशाने ‘मूर्तीपूजा’ सांगितली आहे का? मातीच्या मूर्तीत केलेल्या प्राणप्रतिष्ठेने आपले हृदय, सर्व संवेदना व आत्मिक शक्ती जागृत झाली तरच ती पारदर्शक व डोळस श्रद्धा म्हणता येईल; अन्यथा संवेदनांचे डोळे बंद करून केलेली भक्ती व ठेवलेली श्रद्धा दोघीही अंध होऊन नुसत्याच चाचपडत राहतात. स्वतःचेच अस्तित्व उत्सवाच्या बाजारात शोधत राहतात. आज जिथे-तिथे याची प्रचिती येतेच आहे...
अर्थात संवेदनशील मन हवं, तसा बुद्धिमान मेंदूही हवा. आयुष्याचं हे तारू तरंगत जायचं तर खाली पाणी हवं आणि वर वाराही हवा! पण माणसाचा बुद्धिमान मेंदू जणू शाप मिळाल्यासारखा षड्‌रिपूंनी सहज ग्रासू शकतो. काम, क्रोध, लोभ, मद, मोह व मत्सर या सहा शत्रूंनी तो ग्रासला जातो व तिथेच सगळे अनर्थ ओढवतात. सर्व कला, संवेदना, भावना यांचे अधिपती असणार्‍या हृदयाला संयमी, विवेकी व स्थिर बुद्धीची (मेंदूची) जोड असायला हवी. कल्याणकारी सांबशिवाने याचसाठी माणसाचं हे विकारी व विषारी मस्तक उडवून त्याजागी हत्तीचं मस्तक आणून जोडलं आहे! हत्ती हा खूप बलाढ्य असूनही संपूर्ण शाकाहारी व प्रचंड बुद्धिमान प्राणी. त्याची बुद्धी षड्‌रिपूंनी ग्रासली जात नाही. भुकेने व्याकूळ झाला तरी तो एखाद्या प्राण्याला तुडवून मारून खात नाही. त्याची केलेली फसवणूक तो कधीच खपवून घेत नाही. तो लाचार होत नाही. तो मदांधही होत नाही. तो अन्याय करत नाही आणि अन्याय सहनही करत नाही! अशा प्रकारे साक्षात आदिमातेने स्वतःचे आयुष्य झिजवून घडवलेले बळकट शरीर, तिचेच कनवाळू संवेदनाक्षम मन आणि साक्षात जगद्पित्याने बहाल केलेले विवेकाचे मस्तक व कल्याणकारी बुद्धी अशा सुरेख संगमाने आदिदेव ठरलेला हा शिवपार्वतीचा पुत्र गणपती म्हणूनच सुखकर्ता व दुःखहर्ता ठरतो.
- गणपतीची सिरीयल बघणार्‍या मुलांच्या प्रतिक्रियेच्या निमित्ताने हा खूप सुंदर अन्वयार्थ उलगडला याचा आनंद झाला खरा, पण दुर्दैवाने आज अशी विचित्र परिस्थिती आहे की, या विघ्नहर्त्या गजाननाची ओळख मुलांना ‘एलीफंट गॉड’ अशी करून दिली जाते. फनी कार्टूनच्या रूपात पौराणिक सिरीयल्स दाखवल्या जातात. आणि मग ‘पार्वतीच्या अंगावर इतका मळ साठला होता की काय?’ अशी प्रतिक्रिया हे बालगणेश उत्स्फूर्तपणे व्यक्त करताना दिसतात. मुळातले उद्देश, खरे ज्ञान मागे पडते.
खरे तर हा माय-लेकराच्या मायेचा गौरी-गणपतीचा सण. पण आज परस्परविरोधी चित्रे अवतीभवती दिसताहेत. माता वैरीण, पुत्र शत्रू बनतो आहे आणि पिता अत्याचार करत सुटला आहे. प्रचंड विरोधाभासाच्या या चित्रात कुटुंबव्यवस्थाच डळमळीत होऊन कोलमडताना दिसते आहे. नाती दुरावताहेत. सांस्कृतिक चंगळवाद फोफावतो आहे. साहजिकच नात्यांची वीण घट्ट करणारे सांस्कृतिक सोहळे, रीतीरिवाज, सणवार झपाट्याने बदलताना दिसताहेत.
संपूर्ण बदललेला आजचा गणेशोत्सव हे या बदललेल्या विचित्र परिस्थितीचेच एक प्रतिबिंब आहे, हे कटू सत्य आहे. आपण आपल्या धारणांपासून दूर चाललो आहोत. या मातीशी असणारी नाळ तोडत चाललो आहोत. फार दूर कशाला, आता आपण अगदी जवळचेच उदाहरण घेऊ. खरं तर ‘मातास्वरूप मातीची मूर्ती’ तयार करून तिचा गौरव करून पुजण्याचा हा सण. तर आपण या धारणेलाच फाटा देत आहोत. माती सोडून अन्य कोणत्याही पदार्थांपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती हे कसले प्रतीक आहे? प्लॅस्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल, सिमेंट, वाळू, दगड, खडी कमी पडते म्हणून की काय बाटल्या, काचा, मणी, नाणी, लाकूड-फाटा, दाणा-गोटा इथपासून ते धागेदोरे, सुंभ, सुतळी, वायरी, तारांपर्यंत आणि सोडावॉटरच्या बुचांपर्यंत कसलीही गणेशमूर्ती आपण बनवतो. रबर, प्लॅस्टिक, कचकडी सामानाची खैरात करतो. ‘इको फ्रेंडली गणेश’ करण्यासाठी कापूस, काथ्या, चिंध्या, कागदाचा लगदा, पुठ्ठे, पेपर, गोणपाटं, बारदानं, बांबू, पिडे, सोडणं, चुडतं, बोंडं, केसरं नि तुरे... काही म्हणता काही आपण शिल्लक ठेवत नाही. वरून इलेक्ट्रिक दिव्यांचा झगमगाट, कर्कश संगीत व फटाक्यांचा धुमाकूळही सुरू असतो. स्पर्धा, खाणे, कपडे खरेदी, मौजमजेची जत्रा असते. सोडती, लॉटर्‍या, वर्गण्या नि खंडण्या लुटल्या जातात. रस्त्यावर तर रस्त्यावर, गटारावर तर गटारावर, घाणीच्या नाल्यावर तर नाल्यावर, साचलेल्या पाण्यात, टाकीत, नदीत, ओढ्याकाठी, बाजारात, चौकात, स्टँडवर, तिस्कावर, गल्लीबोळात, धुळीत, वाळूत वाट्टेल तिथे गणेशमूर्ती पूजली जाते. होय. हीच वस्तुस्थिती आहे....!!!
‘‘या सर्वामधून कलेची जोपासना होते. समत्व, प्रेम, श्रद्धा, बंधुभाव वाढतो. एक निखळ आनंद मिळतो. दुःख झेलायची ताकद येते. जगण्यातलं सौंदर्य वाढतं’’- हे सगळं खरं आहे. सगळं सगळं मान्य आहे. पण या गोंडस रूपापेक्षा आपण आपल्या धारणांपासून दूर चाललो आहोत, हे विचित्र चित्र अधिक खरं आहे. आणि यातून होणार्‍या मिळकतीपेक्षा होणारी ही हानी खूप मोठी व अधिक धोकादायक आहे. प्रचंड उत्साहाने आणि अतिरेकी जल्लोषात निघणार्‍या, प्रदूषण करणार्‍या गणेश विसर्जन मिरवणुका, त्यात होणारी चेंगराचेंगरी, गुंडगिरी आणि हकनाक गमावलेले जीव हा तर सगळ्याचा कळस ठरतो आहे!
**********
हो, हे सगळं खरं आहे. पण तरीही हे सगळं होतच राहील! काळाच्या अथांग दर्याच्या उदरातून भल्या-बुर्‍याच्या लाटा येत राहतील. वाईट-साईट कधी ना कधी किनार्‍याला लागेल. चांगल्याचे मोती होेऊन बाहेर पडतील. तण फोफावत राहील. रान माजेल. पण हा दाह आशेच्या-श्रद्धेच्या दूर्वेने शांतही होत राहील. दोन्हीही या मातीचेच पुत्र- पण कार्तिकेय विनाकारण वळसा घालून भक्ती करेल. गणपती हुशारीने प्रदक्षिणेवर श्रद्धा ठेवेल. लिहिणारे लिहीतील, वाचणारे ‘वाचतील!’ चिखल करणारे चिखल करतील. मूर्ती करणारे मूर्ती करत राहतील... सद्विचारांचे गणपती अविचारांच्या उंदरांवर अंकुश ठेवत राहतील....
कोणी काहीही म्हणो. भक्तीचा शिमगा होवो किंवा चैनीची दिवाळखोरी होवो, समृद्धीचे श्रावण बरसोत किंवा अर्थव्यवस्थेवर संक्रांत येवो- तुमची आमची ‘चवथ’ मात्र धूमधडाक्यात साजरी होईल.
माटोळीचा बाजार भरेल. फळफळावळ, खाणं-पिणं, खरेदीची झुंबड उडेल. बाजार फुलेले. ‘वजी’ पाठवली जातील. नेवर्‍या, मोदक, लाडू, फराळ, रंगरंगोटी, मारांदे, पेटारे, फोली-पताका, डेकोरेशन्स, मखरं, जागरणं, हारतुरे... लयलूट होईल. तेल, वात, धूप, दीप, रांगोळ्या सजतील. ‘तये’च्या उपासात गणपती घरी येईल. ‘चवथी’च्या पूजेला भट दारात येईल. घाई करेल. गणपती बसवेल. झांजा, आरत्या, घुमटं घुमतील. भजनाच्या फैरी झडतील. खाणं, जेवणं, फिरणं, पूजा-नैवेद्य-वाडी, नवस-सायास, भेटी-गाठी चंगळ होईल. पाचव्या-सातव्या दिवशी ‘गवर’ येईल. देवीची भाजी-भाकरी, ‘हौशे’ गावभर वाटले जातील. फुगड्या-फेर-गाण्यांमधून ‘माये’ला सुखं-दुःखं सांगितली जातील... बाप्पाचा बाप, मायेची थोरली माय आणि त्यांचा लाडका ‘बाळ’ गणेश आशीर्वादाचा हात पाठीवरून फिरवत राहील... साठां उत्तरांची ही कहाणी पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण होईल! बघता बघता बाप्पा निघायची तयारी करतील... एका डोळ्यात सुखाचा पूर, दुसर्‍या डोळ्यात विरहाची नदी आणि अंतःकरणात समाधानाच्या लहरी उठत राहतील आणि आतून साद येत राहील, गाज उठत राहील- ‘गणपती बाप्पा मोरया’ या उत्स्फूर्त उद्घोषाची!

सार्वजनिक गणेशोत्सव

प्रा. रमेश सप्रे



‘लोकमान्य’ ही पदवी टिळकांना पद्मश्री, पद्मभूषणसारखी ‘पद्मखिरापत किंवा खैरात’ म्हणून सरकारनं दिली नव्हती. कारण त्यावेळचं इंग्रजांचं सरकार. या ‘भारतीय असंतोषाच्या जनका’ला अशी काही पदवी देणं शक्यच नव्हतं. बहुजन-सामान्य-लोकांनीच आपल्या या लाडक्या नेत्याला ‘लोकमान्य’ म्हणायला सुरुवात केली होती. कारण टिळकांचं सर्व कार्यच- म्हणजे लेखन, भाषण, जीवन- लोकांना मान्य होतं. कारण त्याचा हेतू आणि परिणाम सार्‍यांच्या हिताचाच असणार होता. ‘केसरी’ वृत्तपत्रातील अग्रलेखच नव्हेत तर त्यांची अन्य ग्रंथसंपदाही लोकमान्य होती. त्यांचं कर्तृत्व-वक्तृत्व-नेतृत्व सारं लोकांना शिरोधार्य होतं. म्हणून टिळक हे लोकमान्य!
लोकमान्यांच्या भारतीय जनतेच्या कल्याणभावनेतून दोन महत्त्वाचे सण-समारंभ जन्मास आले. सार्वजनिक गणेशोत्सव नि शिवजयंती! स्वराज्य हा त्यांचा केवळ जन्मसिद्ध अधिकारच नव्हता तर त्यांचा ध्यास होता नि श्‍वासही होता. त्यामुळे भारतीय जनता केवळ गुलामीतून मुक्त व्हावी एवढाच त्यांचा प्रयत्न नव्हता तर सामाजिक एकता- भावनिक एकात्मता या सूत्रात समाजातील सर्व गट-पंथ-संप्रदाय बांधले जावेत हाही उद्देश त्यांच्या सर्व कार्यक्रम-उपक्रमांत असायचा.
छत्रपती शिवराय हा आपला मानबिंदू आहे, या विचारातून त्यांनी शिवजयंतीचा उत्सव सुरू केला. देशभक्तीचा स्फुल्लिंग लोकांच्या मनामनात चेतवण्यासाठी त्यांचा हा प्रयोग होता. केवळ ‘जय भवानी, जय शिवाजी’ची घोषणा देत संकुचित राजकारण लो. टिळकांच्या कल्पनेतसुद्धा नव्हतं, तर आत्मबलिदानासाठी समाजाच्या सर्व थरांतील लोकांना त्यांना आवाहन करायचं होतं. विशेषतः युवावर्गाला.
त्याचवेळी या ‘गीतारहस्य’ जाणणार्‍या व सर्वांना सांगणार्‍या द्रष्ट्या प्रेषिताच्या लक्षात आलं की धर्म नि त्याचं अंग असलेले सण-समारंभ-सोहळे हा भारतीयांचा प्राण आहे. विवेकानंद म्हणत त्याप्रमाणे ‘भारत हा धर्मप्राण देश आहे. इथे धर्माविरुद्ध चळवळ करावयाची असेल तरी त्याचा आधार धर्मच असावा लागेल.’ या दृष्टिकोनातून लो. टिळकांनी ‘जनगणमन’च्या खर्‍या अधिनायकाचा म्हणजे गणेशाचा सार्वजनिक उत्सव सुरू केला. त्यावेळच्या नेत्यांचं वैशिष्ट्य होतं- आधी केलं, मग सांगितलं. समर्थ रामदासांच्या शब्दांत- ‘क्रिया करून करवावी बहुतांकरवी|’ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचा ठरवल्यावर- राहणी (स्वतःचं उदाहरण)- वाणी- लेखणी या त्रिवेणीच्या माध्यमातून प्रचार-प्रसार सुरू झाला.
लो. टिळकांच्या मनात असलेला सार्वजनिक गणेशोत्सव नि आजचा उत्सव यात खूप फरक आहे. लोकमान्यांचा उत्सव स्वप्नवत् वाटावा इतकं आजचं वास्तव भयानक आहे. पण एक गोष्ट सर्वप्रथम लक्षात ठेवली पाहिजे की काही वर्षांपूर्वी असलेलं उत्सवाचं बरंचसं बकाल, अभद्र रूप हळूहळू सुधारतंय. याविषयी सहचिंतन श्रीगणेशाच्या प्रेरणेनंच करूया. चिंतनासाठी एकवीस मुद्दे घेऊया. एका परीनं गणेशाला अर्पण केलेली ही दूर्वांची जुडीच समजूया.
श्रीगणेशमूर्ती ः पूर्वीही सार्वजनिक गणेशाची मूर्ती मोठी असायची. पण आजच्याएवढ्या अजस्त्र मूर्ती तेव्हा नसत. आज इलेक्ट्रिसिटीच्या तारा दूर करून, वर उचलून अशा मूर्तीची मिरवणूक काढावी लागते. पूर्वीच्या जवळजवळ सर्व मूर्ती शाडूच्या (मातीच्या) असत. त्या जलाशयात पूर्णपणे मिसळून जात. आज प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती अगदी घरीसुद्धा बसवल्या जातात. त्या पाण्यात विरघळत तर नाहीतच, पण इतर समस्या मात्र निर्माण करतात. दिसतात रेखीव नि रंगसंगतीही सुंदर असते, पण त्या निसर्गस्नेही नसतात.
श्रीगणेशाचं आगमन ः ही मिरवणूक पूर्वी आजच्याएवढी भव्य नसायची. पण वाद्यांच्या गजरात गणरायाला आणणं हा सात्त्विक अनुभव असायचा. आज मात्र ढोल-ताशांचा हृदयाचे ठोके चुकवणारा गडगडाट, फटाक्यांच्या माळांचा कानठळ्या बसवणारा आवाज, समोर नाचणार्‍यांचा कर्कश्श गोंगाट यांनी गणरायाचं आगमन हा फारसा सुखद प्रकार नसतो. छोट्यामोठ्या सार्वजनिक मंडळांच्या गणपतीच्या मूर्ती कमी-जास्त प्रमाणात पण अशा वाजत-गाजत येतात.
श्रीगणेशपूजन ः रोज पूजा आजही केली जाते. सर्वच मोठ्या प्रमाणावर असल्याने ही पूजा पूर्वीप्रमाणे षोड्‌शोपचारांनीच होते. फक्त ध्वनिक्षेपकाचा मोठा आवाज, नैवेद्याच्या पदार्थांची गर्दी, भक्तांपेक्षा कार्यकर्त्यांचा जोशपूर्ण सहभाग यामुळे या नित्यपूजेतील भाव, उत्कटता, आर्तता कमी होत चाललीय. आर्त भावाशिवाय म्हटली जाणारी गदारोळी समूहआरती ही काहीशी कर्णकटू व कानाच्या पडद्यांना त्रासदायक असते.
श्रीगणेशविसर्जन ः सलग आवाहन-पूजन-विसर्जनाचा विचार व्हावा म्हणून हा पैलू आधी घेतलाय. विसर्जनाची मिरवणूक हा पूर्वी- म्हणजे अगदी चाळीसपन्नास वर्षांपूर्वी- हृदयस्पर्शी सोहळा असायचा. गणरायाला दिला जाणारा निरोप; त्यावेळी त्याच्यासमोर केले जाणारे दांडपट्टा, बोथाटी यांसारखे मैदानी खेळ; केली जाणारी लोकनृत्ये; दिल्या जाणार्‍या घोषणा; रस्त्यावर जागोजागी केली जाणारी आतषबाजी; सामाजिक एकात्मतेचा विशिष्ट संदेेेेेश देणार्‍या कमानी; रात्री प्रकाशासाठी पेटवलेल्या गॅसबत्त्या अन् त्या डोईवर घेऊन जाणार्‍या व्यक्ती हे सारं रोमहर्षक, प्रेक्षणीय नि संस्मरणीय असायचं.
आजची विसर्जन मिरवणूक विद्युत रोषणाई, चाकावर फिरणारे चालतेबोलते चित्ररथ, निरनिराळ्या प्रायोजकांनी उभारलेल्या नि त्यांच्या जाहिरातींनी सजवलेल्या मोठमोठ्या कमानी (हे प्रायोजक बर्‍याच वेळा तंबाखू, गुटखा, मद्य यांचे निर्माते असतात), ‘बँजो पार्टी’ नावानं ढणढण वाजणारं कर्णकर्कश्श संगीत; वाहतूक, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची साधनं, विद्युतपुरवठा, स्वच्छता व आरोग्य अशा सर्व प्रकारच्या व्यवस्थांवर पडणारा ताण; तासन्‌तास चालणारा हा अंगावर येणारा विसर्जन सोहळा हे सारंच भयंकर वाटतं. पूर्वी गणपतीला निरोप देताना हुरहूर वाटायची, डोळे पाणवायचे. आज बहुतेकजण ‘गेले बुवा गणपती!’ असं म्हणून सुटकेचा निःश्‍वास सोडतात. कारण आधीचे काही दिवस सार्‍यांची अवस्था ओलीस ठेवलेल्या व्यक्तीप्रमाणे असहाय झालेली असते. लो. टिळकांना स्वप्नातही असा गणेशोत्सव अभिप्रेत नसावा.
निधिसंकलन ः लोकांनी ‘स्वेच्छेनं-स्वखुशीनं’ दिलेल्या वर्गणीतून पूर्वीचा सार्वजनिक गणेशोत्सव थाटात साजरा होत असे. त्यावेळचे उत्सवाचे अर्थशास्त्र वेगळे होते. म्हणजे उत्सवांना अर्थही होता नि शास्त्रही! आज एकूण सर्व गणेशमंडळांची महाराष्ट्रातली एकूण उलाढाल कोट्यवधी रुपयांची असेल. लाखो रुपयांच्या मूर्ती, तितकाच खर्च करून मूर्तिमंडप नि त्याच्या कितीतरी पटीनं खर्च करून उभारलेले देखावे! हे सारं खरं असल्यासारखं भासतं. एरव्हीचे रहदारीनं वाहणारे बरेचसे अस्वच्छ रस्ते एखाद्या स्वप्ननगरीसारखे चकचकीत बनवतात. झळाळून उठतात.
एवढा पैसा खर्च करायचा म्हणजे त्याहून अधिक जमा करायचा. यासाठी वर्गणी- तीही सक्तीची- म्हणजे एकप्रकारची खंडणीच! मध्यमवर्गीयांना, गरिबांना परवडणार नाही एवढ्या रकमेच्या पावत्या आधी तयार करूनच फाडल्या जातात. आपल्या व घराच्या सुरक्षिततेसाठी अनेकांना हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावाच लागतो. जनशक्ती व लोकसत्ता यांच्यापुढे शहाणपण कुणाचं चालणार?
अक्षरशः भुईछत्रांप्रमाणे (मशरूम्स) दरवर्षी उगवणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अन् त्यांच्या लहानमोठ्या तथाकथित कार्यकर्त्यांकडून सक्तीनं केलेलं निधिसंकलन, हा सारा प्रकार बेहिशेबी कारभाराचं उदाहरण असतं. हिशेब सादर केले जातात, पण त्यात मोठ्या प्रमाणावर गोलमाल प्रकार घडलेले असतात. सामान्य माणसांच्या हातात फक्त गणरायाची प्रार्थना करणं एवढंच असतं.
कार्यक्रम ः लो. टिळकांच्या गणेशोत्सवाचा समाजप्रबोधनाचे कार्यक्रम हा अक्षरशः प्राण होता. हे कार्यक्रमही मनोरंजनाच्या माध्यमातून सादर केलेले असत. काही व्याख्यानं, चर्चा, परिसंवाद मात्र बर्‍यापैकी बौद्धिक वळणाचे असत. पण तेही समाजाच्या हिताचे असत. ‘मेळे’ नावाचा एक प्रकार त्याकाळी लोकप्रिय होता. यात अनेक दृक्‌श्राव्य प्रकारांचा सुंदर मेळ असायचा. गीतं, पोवाडे, भारुडं, व्यक्तिगत व सामूहिक देशजागरणपर पदं, नाटकुली, संवाद, नकला, वाद्यसंगीत असा भरगच्च कार्यक्रम सादर केला जायचा. यातले सर्व कार्यक्रम सांस्कृतिक असत. गणेशपूजेचं व उत्सवाचं पावित्र्य सांभाळणारे असत. लोक जागोजागी गर्दी करून हे मेंदू-मन-मनगट या तिन्हींना प्रेरणा देणारे कार्यक्रम रूचीनं पाहत. आज वैचारिक कार्यक्रमांना अनेक गणेशोत्सव मंडळांनी फाटा दिलेला दिसतो. कार्यक्रम पत्रिकेत व्याख्यानं- चर्चा- परिसंवाद यांच्यावर काट मारलेली असते. महनीय व्यक्तींच्या (सेलेब्रिटी) मुलाखतीही करमणुकीच्या अंगानेच घेतल्या जातात. व्यावसायिक नाटकं, सिनेमा, ऑर्केस्ट्रा यांचं प्राबल्य असतं. सिनेगीतांच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. हे सारं लो. टिळकांना अभिप्रेत नव्हतं.
उपक्रम ः विविध विषयांवर निरनिराळ्या वयोगटांसाठी घेतल्या जाणार्‍या स्पर्धा; गणेश व इतर देवदेवतांच्या स्तोत्रांचं मोठ्या प्रमाणावर पठण, रोज केला जाणारा मंत्रजागर, शांतिमंत्रांचा गजर हे पूर्वीपेक्षा लक्षणीय असतं. विशेष म्हणजे उपक्रमांच्या पातळीवर पूर्वीपेक्षा आज जरा जास्त जागृती झालेली दिसते. लो. टिळकांना बरे वाटेल असे समाजहिताचे उपक्रम काही मोठ्या मंडळांतर्फे राबवले जातात. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहं, शिष्यवृत्त्या, उच्च शिक्षणासाठी व संशोधनासाठी आर्थिक साह्य हे उपक्रम कौतुकास्पद आहेत. वेश्यांच्या मुलामुलींचं पुनर्वसन, मुलींच्या-स्त्रियांच्या आरोग्यासाठी शिबिरं, मोफत शस्त्रक्रिया इ. इ. अनेक उपक्रम खास उल्लेख करण्यासारखे आहेत. यासाठी उर्वरित निधी वापरला जातो.
प्रायोजक (स्पॉन्सर्स) ः एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करायचा तर प्रायोजक हवेतच. पूर्वीही असे लोक सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मदत करत. पण एक तर त्यांची संख्या कमी होती नि उत्सवासाठी लागणारा निधीही मर्यादित असायचा. आज मात्र मोठ्या प्रमाणावर वर्गणी जमवूनही प्रायोजकांची गरज उरतेच. यात वाईट काही नाही, फक्त अनेक ठिकाणी प्रायोजक समाजविघातक उत्पादनं निर्माण करणारे असतात. जर्दा-तंबाखू-गुटखा यांनी शाकारलेल्या भव्य कमानीतून गणराय प्रवेश करतात अन् त्याहीपेक्षा मोठ्या अशा कमानीतून मोठ्या थाटात निरोप घेतात. या कमानी उभारणार्‍यांचे उत्पन्नाचे स्रोत, उत्पादन करतात ते दारूसारखे पदार्थ. हा सारा प्रकार गणरायाचाही श्‍वास गुदमरवणारा असतो. काळाच्या ओघात असे प्रायोजनाचे प्रकार खूप वाढून आता काहीसे कमी होऊ लागलेत.
पुरस्कर्ते ः पूर्वी प्रायोजक हा प्रकार नव्हता. पुरस्कर्तेसुद्धा आर्थिक व्यवहार शुद्ध असणारे  असत. आज गणेशोत्सव मंडळांतर्फे स्मरणिका काढल्या जातात. स्मरणचिन्हं वाटली जातात. स्तोत्र-आरतीसंग्रह प्रकाशित होतात. या सार्‍यांना पुरस्कृत करणारे बरेचसे राजकीय क्षेत्रातले प्रतिनिधी किंवा कार्यकर्ते असतात किंवा गैरव्यवहार, भ्रष्टाचार करणार्‍या छोट्या-मोठ्या संस्था असतात. हे चित्र बदललं पाहिजे.
उत्सवोत्तर कार्यक्रम ः जी गणेशोत्सव मंडळे पूर्वीच्या चालीप्रमाणे चांगल्या परंपरांचं पालन करणारी असतात ती उत्सव संपल्यानंतरही वर्षभर विद्यार्थ्यांना अभ्यासविषयक मार्गदर्शन, व्यवसाय समुपदेशन, आरोग्य शिबिरं, स्पर्धापरीक्षांची तयारी, रक्तदानासारखी शिबिरं, श्रमदान, सामाजिक आपत्तीत साह्य अशी कामं करतच राहतात. हल्ली याविषयी जागृती होऊ लागलीय.
सजावट ः पूर्वीची गणेशमूर्तीच्या मागची, पुढची, बाजूची सजावट वेधक पण साधी असायची. आजकाल मात्र हाती असलेला निधी, प्रगत तंत्रज्ञानाची जोड, कलाकुसर व इतर कौशल्यांचा झालेला विकास यामुळे दरवर्षी नवनवे विषय (थीम्स) घेऊन नेत्रदीपक सजावट केली जाते. जगातील आश्‍चर्ये, संपन्न नगरे, राजवाडे, मंदिरे, पर्यटनस्थळे, देवस्थाने (अष्टविनायक, ज्योतिर्लिंग इ.) यांच्या हुबेहूब प्रतिकृती सादर केल्या जातात. हा स्वागतार्ह बदल आहे.
अनिष्ट प्रथांना आमंत्रण ः गणेशोत्सवाच्या निमित्तानं होणारी गर्दी, वाढणारी गुन्हेगारी, गणेशमंडळांची परस्पर जीवघेणी स्पर्धा, पैशांचा अतोनात होणारा अपव्यय, अरुणांना व तरुणांना वाईट सवयी लागण्याची शक्यता व तशा उपलब्ध संधी, या हल्लीच्या उत्सवातील अनिष्ट प्रथा थांबवल्या पाहिजेत.
अनिष्ट प्रथांची बोळवण ः काही चांगल्या प्रथा आता प्रस्थापित होऊ लागल्या आहेत. निर्माल्यसंकलन, कचर्‍याची विल्हेवाट, नव्या प्रकारचे दीप वापरून विजेची बचत, रस्त्यावरील वाहतुकीचं निमंत्रण, एकूण आयोजनात दिसून येणारं व्यवस्थापन आणि ढिसाळपणाला निरोप, वाढता नीटनेटकेपणा, समयपालनाच्या शिस्तीचा संस्कार अशा कित्येक चांगल्या गोष्टी हळूहळू विकसित होऊ लागल्या आहेत.

श्रीगणेशस्तवन

- डॉ. सोमनाथ कोमरपंत


श्रीगणेशस्तवनाच्या या मौखिक आविष्काराचा विचार केल्यावर लिखित परंपरेकडे वळल्यानंतर काय दिसते? मौखिक-लिखित परंपरेच्या सीमारेषा येथे पुसट झाल्याचेही जाणवते. क्षितिजविस्तारच नजरेत भरतो. पण या गंगाप्रवाहाचा मूलस्रोत मौखिकच आहे हे उमजून येते.


आदिमकालापासून मानवी मन आपल्या उन्नयनाचा मार्ग शोधत आहे. त्याची निर्मितिशीलता सृष्टीच्या अणु-रेणूंमध्ये नित्यनूतनत्व शोधत आहे. अचेतनत्वामध्ये चैतन्य पाहणे हा मानवी प्रतिभेचा चमत्कार आहे. यातूनच कलासाधनेचा मार्ग तिने अवलंबिला. प्रज्ञा-प्रतिभेच्या विकासक्रमाबरोबरच संस्कृतीची संकल्पना मानवाच्या अंतरंगात रुजली. निसर्ग हा त्याचा प्रेरणास्रोत. त्याच्या सान्त जिवाला अनंतत्वाचा ध्यास लागला. त्याचे तत्त्वचिंतन सुरू झाले. तो निराकारामध्ये आकार शोधायला लागला. अरूपाला रूप देण्याचा प्रयत्न मग सुरू झाला. जीवनाच्या शाश्‍वत सत्याचा, शिवाचा आणि सुंदराचा ध्यास त्याने घेतला. या शोधप्रक्रियेत लहान कोण आणि महान कोण हेदेखील ठरविणे कठीण आहे. स्वतःच्या कुवतीनुसार त्याने विश्‍व निर्मिले. केवढे परमसत्य केशवसुत लिहून गेलेले आहेत!
विश्‍वाचा आकार केवढा
ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा
कुणाला श्रद्धेच्या सामर्थ्याने देवत्व शोधायचे असते; कुणाला प्रज्ञेच्या बळावर प्रतीकरूपाने त्याच्याकडे पाहायचे असते. श्रीगणेशाच्या रूपाची संकल्पना केव्हापासून लोकमानसात रुजली हे सांगणे हा मतभेदाचा विषय होऊ शकतो; पण तो लोकमानसाचा अधिनायक आहे याविषयी कुणाचेच दुमत नाही. भारतीय परंपरेने परमसत्य अधोरेखित केलेले आहे ः
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ|
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
ही मंगलमूर्ती सर्वमंगलासाठी आहे. तिच्या केवळ दर्शनानेदेखील चित्तवृत्ती प्रसन्न होते. समूहमनाला एकत्र आणून विधायकतेकडे प्रेरित करण्याची शक्ती या प्रतीकात आहे. खर्‍या अर्थाने ते लोकदैवत आहे. श्रीगणेश हा विद्या आणि कला यांचा अधिष्ठाता आहे. लोकमान्य टिळकांसारख्या प्रज्ञावंताला राष्ट्र संकटात असताना ते संघटित करण्याची प्रेरणा झाली ती श्रीगणेशाच्या आदिशक्तीमुळेच. त्याचे कुल आणि मूळ शोधण्यात शक्ती वाया घालविण्याऐवजी तो ‘गणनायक’ आहे हे आजच्या जीवनप्रणालीच्या संदर्भात तेवढेच खरे आहे. तो बुद्धिमंतांतील बुद्धिमंत आहे. बलवानांतील बलवान आहे. त्याची बुद्धिमत्ता आणि बल समष्टीच्या कल्याणासाठी आहे. तो विघ्नहर्ता आहे. आपल्या सांस्कृतिक संचिताशी आणि पर्यावरणाशी त्याचा दृढ संबंध आहे.
श्रीगणेशामध्ये प्रेरणा कशी शोधावी?
श्रीगणेशाचे मोठे मस्तक लाभदायक दीर्घ पल्ल्याच्या योजना आखण्याची प्रेरणा देते. मोठे कान शांतपणे ऐकण्यास, नवनवीन कल्पना आणि विचार करण्यास प्रवृत्त करतात. बारीक डोळे एकाग्र व्हायला सांगतात. लांब सोंड चौफेर ज्ञान मिळविण्यासाठी प्रेरित करते.
लोकवाङ्‌मयातून श्रीगणेशाची आराधना करताना म्हटले जाते ः
‘कार्यारंभी प्रथम पुजावे गणनायक गणपती देव हा देवांचा अधिपती...’
जात्यामध्ये धान्याची पहिली ओंजळ टाकताना प्रत्येक माता उद्गारते ः
पहिली माझी ववी गं
गणराया गणपती
पिठाला बरकती
तिथं उभी व्हवी
मंगल कार्याचा प्रारंभ करताना मुळचिठ्ठी गणरायाला जाते. त्याच्याशिवाय कार्यसिद्धी कशी होणार? कारण ‘पाच ग पासुल्याचा दिला मंडप साधूनी देव गणराया उभा कंबर कसुनी...’
पहिली ग मुळचिठ्ठी
माझी नामयाला जाते
देवा गणरायाची
गाडी घुंगराची येते
गोंधळी, आराधी, भोपे, धनगराचे सुंबराज, दशावतारातील त्याचे आद्यनमन, तमाशातील नांदी, शाहिराच्या पोवाड्यातील श्रीगणेशाचे स्तवन यासंदर्भात पुनःपुन्हा आठवावे. त्यातही पुन्हा प्रत्येक परिसराच्या मातीच्या गंधाने भारलेले गाणे नवनिर्मितीचा नवा आनंद देते. सर्वदूर पसरलेल्या भूभागांतील वैविध्याचे किती नमुने साठवावे? ते तर आपले समृद्ध संचित आहे.
आपल्या पारंपरिक लोककला गणेशस्तवनाशिवाय सुरू होत नाहीत. पोतराजाच्या ओव्यांत ‘पहिला नमन गणेश गणपतीला’ हे शब्द आठवावेत. आपल्या गोमंतकातील सुंवारीवादनाच्या घुमटावर थाप पडल्यानंतरची धून आठवावी. आसमंताला मंत्रमुग्ध करण्याचे भावसामर्थ्य त्या नादलयीत असते. या गणगोताच्या संस्कारशीलतेमुळे व्यक्तिमनाच्या जडणघडणीचा आणि समष्टीच्या संस्कृतीचा तलम पोत निर्माण होतो... सर्जनशीलतेची मुळे या सार्‍या संवेदनोर्मीमध्ये दडलेली असतात. फुगड्यांमधून स्त्रीमनाचे सारे हेलकावे कलात्मक ढंगाने प्रकट होतात.
भराडी हे भैरवनाथाचे उपासक. तेदेखील ‘मोरया गणपती गणराजा तुला विनवितो रणराजा, मायेचा निजरूप भराड मांडिला, भराड मांडिला’ या शब्दांत गणेशस्तवन करतात. शाहीरही आपल्या ओजस्वी वाणीत गणेशाला वंदन करतात. होनाजी बाळा, रामजोशी यांनी आपल्या रचनांच्या प्रारंभी गणेशाची प्रार्थना केलेली आहे.
श्रीगणेशस्तवनाच्या या मौखिक आविष्काराचा संक्षेपाचा विचार केल्यावर लिखित परंपरेकडे वळल्यानंतर काय दिसते? मौखिक-लिखित परंपरेच्या सीमारेषा येथे पुसट झाल्याचेही जाणवते. क्षितिजविस्तारच नजरेत भरतो. पण या गंगाप्रवाहाचा मूलस्रोत मौखिकच आहे हे उमजून येते.
श्रीगणपत्यथर्वशीर्ष म्हणते ः
हे मंगलमूर्ती, देवादि गणांचा पालक असलेल्या तुला, गणपतीला नमस्कार असो. तूच साक्षात तत्त्व आहेस. सर्व जगाची उत्पत्ती करणारा केवळ तूच आहेस. जगताचे पालन करणारा तूच आहेस. जगाचा संहार करणाराही केवळ तूच आहेस. जगद्रूपाने भासमान होणारे हे साकार ब्रह्म खरोखर तूच आहेस. चिरंतन राहणारा साक्षात आत्मा तूच आहेस ॥ मी वाचेने सत्य बोलत आहे. मनानेही सत्य सांगत आहे ॥
तू माझे रक्षण कर. तुझे गुणगान करणार्‍या वक्त्यांचे तू रक्षण कर. तुझे गुणगान ऐकणार्‍या श्रोत्यांचेही तू रक्षण कर. योग्य अधिकारी अशा शिष्याला तुझी उपासना देणार्‍या गुरूचे तू रक्षण कर. निरंतर गुरूच्या सान्निध्यात राहून ज्ञान संपादन करणार्‍या शिष्याचे तू रक्षण कर. पश्‍चिम दिशेकडून तू माझे रक्षण कर. पूर्व दिशेने तू माझे रक्षण कर. त्याचप्रमाणे ऊर्ध्वदिशेकडून तू माझे रक्षण कर आणि सर्व ठिकाणी तू माझे रक्षण कर ॥
शब्दरूपाने प्रतिपादित असलेले वेदादि सर्व वाङ्‌मय तूच आहेस. तू ब्रह्ममय आहेस. नामरूपाचा अहंकार धारण करणारा जीव तूच आहेस. ते आनंदमय आहेस. तू ब्रह्ममय आहेस. तू अविनाशी, चैतन्यरूप, आनंदरूप आणि अद्वितीय आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्मच आहेस. तू अध्यात्म ज्ञानमय आहेस आणि तूच भौतिक ज्ञानमय आहेस ॥
हे सर्व जगत तुझ्यापासूनच उत्पन्न होत असते. हे जग तुझ्यामुळे स्थिर राहत प्रसृत झालेले हे सर्व जगत तुझ्या ठिकाणी परत येत असते. पृथ्वी, आप, अग्नी, वायू आणि आकाश तूच आहेस. परा, पश्‍चन्ती, मध्यमा आणि वैखरी या चार प्रकारच्या वाणीची स्वरूपे तूच आहेस ॥
सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांपासून तू दूर आहेस. स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीन देहांपासून तू दूर आहेस. भूत, वर्तमान आणि भविष्य या तीन कालांपासून तू दूर आहेस. मनुष्यदेहातील अधोभागाजवळ असलेल्या मूलाधार नामक स्थानाच्या ठिकाणी तू नित्य राहतोस. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही शक्तींना तू व्यापून राहतोस. योगिजन सदैव तुझे ध्यान करतात. जगाची उत्पत्ती करणारा तू ब्रह्मा, या जगताचे पालन करणारा तू विष्णू, या जगाचा संहार करणारा तूच रुद्र, सर्व देवांचा राजा इंद्र तूच, सर्व देवांचे मुख असलेला यज्ञभोक्ता तूच अग्नी, सर्व ब्रह्मांडात वाहत असलेला वायू तूच, सर्व जगाला प्रकाश देणारा सूर्य तूच आणि सर्व औषधींचे पोषण करणारा व रात्री शीतलतेने प्रकाश देणारा चंद्रही तूच. तूच ब्रह्म, तूच भूलोक, तू अंतरिक्ष, तूच स्वर्गलोक आणि प्रणवमंत्रही तूच आहेस ॥
गणाचा आदिभूत असलेल्या गकाराचा उच्चार करून नंतर वर्णारंभक अशा आकाराचा उच्चार करावा. त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा. तो अनुस्वार अर्ध चंद्राकृतीने विलसित असावा. तो प्रणवाने युक्त असावा. हे गणपते, आता जे वर्णिले हेच तुझ्या मंत्राचे स्वरूप होय. गकार हे त्या मंत्राचे स्वरूप होय. गकार हे त्या मंत्राचे पूर्वरूप, अकार हे मध्यमरूप, अनुस्वार व अर्धचंद्राकार यांचे संधान म्हणजे एकीकरणाचे साधन, तो नाद म्हणजे शब्दध्वनी होय. गकारादि चार अवयवांचे संमीलन किंवा यथानुक्रम उच्चार ही त्या मंत्राची संहिता. गणपतिमंत्र हीच ती ज्ञानप्रद अशी गणेशविद्या. या एकाक्षरी गणपतिमंत्राचा गणक ऋषी हा द्रष्टा. या मंत्राचा निचृद्गायत्री हा छंद होय. या मंत्ररूप विद्येची गणपती ही देवता. प्रणवयुक्त अशा या मंत्राच्या ठिकाणी व्यक्त होणार्‍या गणपतीला नमस्कार असो॥
एकदन्त अशा गणपतीला आम्ही जाणतो आणि म्हणूनच त्या वक्रतुंड देवाचे आम्ही ध्यान करीत आहोत. एकदन्त असा तो गणपती सर्व कार्यासाठी प्रेरणा देऊ दे ॥
एकदन्त आणि चार हातांत अनुक्रमे पाश, अंकुश, दात आणि वरद ही चार आयुधे धारण करणारा, उंदीर या वाहनावर बसणारा, लाल वर्णाचा, लांबट असे उदर असलेला, सुपाच्या आकाराचे कान असलेला, लाल रंगाचे वस्त्र परिधान केलेला, अंगाला रक्तचंदनाची उटी लावलेला, लाल रंगाच्या फुलांनी भक्तजनांकडून पूजन केला गेलेला, भक्तांवर दया करणारा, जगाचे आदिकारण, अविनाशी सृष्टीच्या निर्मितीपूर्वी अवतीर्ण झालेला आणि प्रकृती-पुरुषाहून निराळा अशा या गणपतीचे जो नित्य ध्यान करतो, तो योगी सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय ॥
निरनिराळ्या देवसमूहाचा पालक अशा तुला, नमस्कार असो. ब्रह्मादि देवगणांचा पालक असलेल्या तुला, नमस्कार असो. शंकराच्या पार्षदगणांचा पालक असलेल्या तुला, नमस्कार असो. लंबोदर, एकदन्त, सर्वविघ्नविनाशक आणि शिवपुत्र अशा तुला, नमस्कार असो. वरदमूर्ती असलेल्या तुला, गणपतीला नमस्कार असो.

प्राचीन कालखंडाकडून आपण संतपरंपरेकडे वळतो तेव्हा निरनिराळी विचारप्रणाली आणि दैवते मानणार्‍या संतांनी श्रीगणेशाचे प्रारंभी स्तवन केलेले आढळते. गणेशाकृती प्रणवाकार आहे म्हणून ज्ञानदेवांनी ‘ज्ञानदेवी’च्या प्रारंभी म्हटलेले आहे ः
ॐ नमो जी आद्या| वेद प्रतिपाद्या|
जयजय स्वसंवेद्या| आत्मरूपा॥
देवा तूंचि गणेशु| सकलमतिप्रकाशुु|
म्हणे निवृत्तिदासु| अवधारिजो जी॥
अकार चरणयुगुल| उकार उदर विशाल|
मकार महामंडल| मस्तकाकारें॥
हे तिन्ही एकवटले| तेथ शब्दब्रह्म कवळलें|
ते मियां गुरुकृपा नमिलें| आदिबीज॥
संत एकनाथ म्हणतात ः
नमन एकदन्ता| एकपणे तूंचि आता|
एकी दाविसी अनेकता| परि एकात्मता न मोडे॥
भक्तिभावनेचे नितांत मनोहर रूप नामदेवांच्या आणि तुकारामांच्या रचनेत आढळते. संत नामदेवांनी वर्णन केलेला भक्तवत्सल श्रीगणेश असा आहे ः
लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड| करीतसे खंड दुश्‍चिन्हांचा॥
चतुर्थ आयुधें शोभताती हातीं| भक्ताला रक्षिती निरंतर॥
भव्य रूप तुझें उंदीरवाहना|
संत तुकाराम म्हणतात ः
धरोनिया फरश करीं| भक्तजनांची विघ्नें वारी॥
ऐसा गजानन महाराजा| त्याचे चरणीं लाहो माझा॥
शेंदुर शमी बहु प्रिय त्याला| तुरा दुर्वाचा शोभला|
उंदीर असे जयाचें वाहन| माथां जडित मुगुट पूर्ण॥
नाग यज्ञोपवित रुळें| शुभ्र वस्त्रें शोभित साजिरें॥
समर्थ रामदासांनी गणपतीची जी आरती केलेली आहे ती तर जनमानसात रुळलेली आहे. या आरतीत भाषेची सुलभता आहे. प्रसन्नता, प्रासादिकता आणि समूहमनाची पकड घेण्याचे विलक्षण सामर्थ्य तिच्यात आहे. तीन चरणांची ही रचना. वानगीदाखल प्रथम चरण जरी पाहिला, ऐकला तरी आपल्या अंतःश्रुती तृप्त होतात. घुमट, समेळ, झांज आणि मंत्रमुग्ध करणार्‍या या शब्दकळेने आसमंत भारला जातो. सगुणभक्तीचा परमोच्चबिंदू या रचनेमध्ये गाठला गेलेला आहे. शब्द, अर्थ आणि भाव यांचा त्रिवेणी संगम येथे आढळतो ः
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची|
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची|
सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची|
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती॥
रामदासांच्या ‘दासबोधा’मधील गणेशस्तवनदेखील चित्तवृत्ती प्रसन्न करणारे आहे. त्यांची विनयशील वृत्तीही येथे प्रकट झालेली आहे ः
ॐ नमोजी गणनायका| सर्व सिद्धिफळदायका|
अज्ञान भ्रांतिछेदका| बोधरूपा|
माझिया अंतरी भरावें| सर्वकाळ वास्तव्य करावें|
मज वाक्शून्यास वदवावें| कृपाकटाक्षेंकरुनी॥
रामानंद ‘भूपाळी गणपतीची’मध्ये श्रीगणेशाचे तन्मयतेने वर्णन करतात ः
उठा उठा सकळिक| वाचे स्मरावा गजमुख|
ऋद्धि-सिद्धींचा नायक| सुखदायक भक्तांसी|
अंगीं शेंदुराची उटी| माथां शोभतसे कीरिटी|
केशरकस्तुरी लल्लाटीं| हार कंठी साजिरा॥
पूर्वसूरींची वाट पुसतच आधुनिक कवी-कवयित्रींनी गणेशस्तवन केलेले आहे.

पारंपरिक ज्ञानाचा खजिना

- सौ. पौर्णिमा केरकर

प्रतिष्ठा, पैसा, स्पर्धा यांच्या गदारोळात त्याचे मूळचे आत्मतत्त्व हरवणार तर नाही ना ही खंत वाटते. विद्येची, बुद्धीची, कलेची अधिष्ठात्री देवता श्रीगणेश. त्याचा परंपरेने चालत आलेला उत्सव सर्वांनाच डोळस करणारा ठरायला हवा.

अगदी चमत्कारिक, काहीसा ओबडधोबड दिसणारा, तरीही सर्वांगसुंदर अशा कलांचा अधिपती श्रीगणेश हा सर्वसामान्य लोकमानसाच्या थेट काळजापर्यंत पोचलेला देव. चैतन्याचे, सौंदर्याचे, भव्य, सुंदर कलात्मकतेचे रूप म्हणजेच गणपती. कलेचा, बुद्धीचा, नैसर्गिक तत्त्वांचा अधिपती असलेला हा देव पारंपरिक ज्ञानाचा खजिनाच जणूकाही आपल्या उत्सवाच्या दरम्यान समस्तांना उलगडवतो.
मानवी जीवनाच्या रोजच्या धकाधकीच्या वातावरणात त्याला कोठेतरी विरंगुळ्याचे चार निवांत क्षण गरजेचे असतात. ऋतुपरत्वे सृष्टीत होणारे बदल तनामनाला नवचैतन्य प्राप्त करून देणारे. या बदलांशी एकरूप होत मानवी मनाने उत्सवप्रियता बाळगली. चैत्र ते फाल्गुनापर्यंतचा हा प्रवास सर्जकतेचा, सृजनत्वाचा. श्रावणाचे लावण्य तर अभुतपूर्व असेच. श्रावणाचेच भक्तितत्त्व पुढे नेताना भाद्रपदातली चवथ तर सर्वच सणांची अधिष्ठात्री ठरणारी.
चतुर्थीचा सण जवळ येत जातो तसतशी घराघरांत जोरदार तयारी सुरू होते. जागोजागी गणेशमूर्ती विक्रीस ठेवलेल्या दृष्टीस पडतात. आकर्षक रंगात सजवून धजवून ठेवलेल्या या मूर्ती विकत घेऊन आज हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षीच हा उत्सव येतो, पण तरीसुद्धा या उत्सवामागचा अर्थ पुन्हा पुन्हा नव्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आजच्या आधुनिक कालखंडात श्रीगणेश तर पारंपरिक ज्ञानाचा खजिनाच आहे याची जाणीव होते.
पार्वती आंघोळ करण्यासाठी गेली त्यावेळी तिने आपल्या अंगीचा मळ काढून त्याचा एक बाहुला तयार केला. त्याला सजीव करून राखण करण्यासाठी दरवाजावर ठेवले. कोणीही आले तरी आत सोडू नकोस असा तिने हुकूम केला होताच. शंकर त्यावेळी शिकारीला गेले होते. परत आले असता त्या बालकाने त्याची वाट अडवली. मग रागाच्या भरात शंकराने त्याचे मुंडकेच छाटले. पार्वतीचा आकांत. मिळेल त्या प्राण्याचे मुंडके आणून धडाला लावायचे हा शंकराचा आदेश. पहिलाच प्राणी मिळाला गजराज. त्याचेच मुंडके मग धडाला चिकटवले गेले. तोच हा गणराज. ही गोष्ट परंपरेने चालत आलेली. लोकमानसात श्रद्धेने स्थिरावलेली. त्यात सत्य किती, असत्य कोणते ते पडताळून पाहण्याचा प्रयत्न नाही. प्रश्‍न आहे मानवी भावनांचा, लोकश्रद्धेचा. त्यामुळे ही गोष्ट हलत नाही, बदलत नाही. पार्वतीच्या अंगाचा मळ असा अर्थ घेणे म्हणजे पार्वतीने कितीतरी दिवस आंघोळच केली नसावी. परत देवासंदर्भात असा अविश्‍वास दाखवणे हेही श्रद्धेच्या माध्यमातून गैरच. मग गणपती हा ज्ञानाचा खजिनाच आहे या दृष्टीतून बघताना मात्र त्यात वेगळेपणा दिसतो. पर्वत धारण करणारी ती पार्वती. तिच्या अंगीचा मळ म्हणजे माती. ही माती डोंगरावरून शेताभाटांत येऊन स्थिरावली. कष्टकरी लोकांनी तिचीच मूर्ती केली. तिला पुजली, भजली. त्याचाच उत्सव चैतन्यमयी ठरला.
एखादी चमत्कृती अनुभवली, कोणत्या तरी अनाकलनीय गोष्टीचे भय मनात बाळगले की श्रद्धा उफाळून येते. मनाची भाबडी श्रद्धा असते. ज्या गोष्टीचे भय वाटते त्याचीच पूजा करायची, त्यामुळेच सार्‍यांचे रक्षण होईल. कदाचित या अशा वृत्तीतूनही चतुर्थीचा उत्सव जनमानसात रुजला असावा. भाद्रपदातील दिवस कुमेरी शेतीच्या ऐन बहराचे असायचे. मेहनत करून पिकवलेली शेती जंगलातील हत्ती फस्त करायचे. मेहनत फुकट जायची. हातातोंडाशी आलेला घास नाहीसा व्हायचा. त्यामुळे याच हत्तीरूपी देवाची पूजा करण्याची संकल्पना लोकमानसाने रुजवली असावी. आज तिला व्यापक स्वरूप प्राप्त झालेले असले तरी निसर्गाशी प्रामाणिक राहून स्वतःचे कुटुंब, संसार चालवताना त्याची होणारी तारेवरची कसरत आणि मग जो निसर्ग आपल्याला भरभरून सर्वकाही देतो त्याविषयीची कृतज्ञता या उत्सवातून निर्माण झालेली दिसते.
शेतातली माती शाडूची. त्याच मातीची गणेशमूर्ती बनवायची. चवथ येण्यापूर्वी घराची रंगरंगोटी करायची ती ‘रेवो’ घेऊन. रेवो म्हणजे पिवळसर, मऊ, लुसलुशीत माती खणून आणून पाण्यात फुगवायची. मग एखादा चांगला कपडा त्यात भिजवून मातीच्या घराच्या भिंतींना लेप काढायचा. खाली जमीन शेणाने सारवायची. जरासे वर भिंतीला एका रेषेपर्यंत शेणाने सारवायचे. एकंदरीत भिंतीला रेवो व शेण यांची रंगरंगोटी केली जायची. रेवो खणून आणून त्याचा रंग तयार करण्याचे ज्ञान परंपरेने घरातील सर्वच सदस्यांना असायचे अशातला भाग नाही. परंतु ही कृती मोठी माणसे जेव्हा करायची तेव्हा लहानग्यांना त्याचे अप्रूप वाटायचे. सहजच त्यांचेही हात त्या शाडूत माखले जायचे. तपकिरी रंगाच्या दगडातून भिंतीवर नक्षी आकाराला यायची. शेणावर पिठाची रांगोळी. ज्या जागेवर गणपतीची मूर्ती विराजमान केली जाणार आहे त्याच्या मागच्या बाजूला कमळाची कलाकृती नैसर्गिक रंगानेच काढली जायची. ही कला परंपरेने सर्वांच्याच वाट्याला यायची. दारावर तोरण बांधलेले असायचे. त्यातील भरतकाम, वीणकाम घरातील स्त्रियांनीच केलेले असायचे. मोराची, कमळाची, स्वस्तिकाची कलाकुसर त्यात असायची. दारासमोरच्या रांगोळीत सांस्कृतिक संचित अधोरेखित व्हायचे. नवीन लग्न झालेल्यांना ‘वजे’ दिले जायचे. त्या वज्यात तोरण असायचे. घरातील महिलांना, सासवा-सुनांना, लेकीबाळांना ही कला परंपरेने प्राप्त झालेली असायची. चतुर्थीच्या निमित्ताने या कलानिर्मितीला अधिक उजाळा यायचा.
गणेशाच्या आगमनाची तयारी करताना रंगरंगोटीबरोबरच माटोळीचे कामसुद्धा तेवढेच महत्त्वाचे होते. आठवड्यापूर्वी रानावनातील पत्री, फुले, फळे गोळा करून आणण्याचे काम सुरू व्हायचे. त्यात मोठ्या प्रमाणात वैविध्य होते. औषधी गुणधर्म तर यातील कित्येक फुलपत्रीला असल्याने माटोळीची रचना व त्याला बांधलेले नैसर्गिक धन हा तर मोठा ज्ञानाचा खजिनाच असायचा. एरव्ही रानात असताना काही काही वनस्पतींना तेवढेसे महत्त्व दिले जात नसे. माटोळीला बांधल्यानंतर त्याचे वेगळेपण उठून दिसे. भेरलेमाड एरव्ही ओबडधोबड दिसणारा, परंतु त्याच्या फळवेलींचा एवढा कलात्मक उपयोग सजावटीसाठी केला जायचा की जणू काही निरनिराळी फळे गुंफून एक माळाच केलेली आहे असा भास व्हायचा. किती नावे आणि किती औषधी गुणधर्म यांची गणतीच नसे. बोणकीचे फळ, रानकरमळ, सीतेचवरीचे मूळ, धुपाचे फळ, ताडमाड, शिवलिंग, तांबडी चाफी, पांढरी अबोली, घोड्याची पावले, हेरडा, कवचा, पालपणस, गमफळे, काटेकवर, गुंजी, अमृतवेल, आटकी, हळदफुल, ताम्हण, लाजरी, केवडा, वट्‌टेलाव, पितमाडे, रानकेळीचे फुल, चोनचाफ्याची फळे, वीख मोगरी, चवरमांडो, एरंड, खरसंग, धनुकाचो कात्रो, भेकरो, नर्कवाल, कांगला, माडतीची माट्टूला, पावसात जेवढ्या भाज्या घरासभोवताली- एखाद्या कुणग्यात पिकवल्या जातात त्यातील दोडकी, काकडी, भेंडी, तोरींग, दुधी वगैरेचा वापर माटोळीसाठी केला जातो. रानावनात मिळणार्‍या या फळाफुलांची, वेलींची फक्त माहिती होती असेच नव्हे तर त्याविषयीचे औषधी गुणधर्मसुद्धा त्याला ज्ञात होते. त्यामुळे माटोळीतील कोणते फळ-फुल कशावर उपयोगी आहे यावर तो माहिती द्यायचा. त्याबरोबरीनेच त्यामागची एखादी दंतकथाही सांगून टाकाया. त्यातील विषारी घटकसुद्धा अवगत असायचे. ‘नर्कवाल’संदर्भात तर सांगितले जाते की सीतेला रावणाने नजरकैदेत ठेवल्यावर तिला त्रास देण्यासाठी रावणाने आपल्या बहिणीला ही वाल म्हणजेच वेल दिली होती. या वेलीला खूप घाण वास येतो. चवरमांडो कौशीच्या झाडाच्या सालीपासून आकर्षक गोंडे करून माटोळी सजवली जायची.
लांब शेंग असलेले खरसंग पखवाज, मृदंगासाठी जसे उपयोगी तसेच गायीगुरांच्या गुदद्वाराला रोग जडला तर त्यावरही उपयोगी असायचे. भेकरेची फळे फोडून आतील गर गरम करून खाणे व्हायचे. कवचा या वनस्पतीला काटे असतात. याचा काढा करून प्राशन केल्यास मुतखड्यावरील ते जालिम औषध. ‘गणपती देवा करीन तुझी सेवा, नवस करीन रे, पाच फळांनी पाच फुलांनी दूर्वा वाहीन रे’ असे म्हणून आंब्याच्या टाळ्याशिवाय माटोळीला शोभाच नाही असे पदोपदीने वाटायचे. त्यासाठीच-
आंब्या तुजो टाळो
टाळो मोडून रथ घडयिलो
गणपती देवाचा रथ घडयिला
गणपती देवाची ही किमया
गणपती देवाला जाऊ शरणा
अशी श्रद्धा अभिव्यक्त करताना माटोलीला बांधलेल्या फळ-फुल-वेलींतून ज्ञानाचा औषधी गुणधर्माने युक्त असा मोठा खजिनाच तिथे सापडायचा. पारंपरिक वनौषधींचे ज्ञान उपजतच एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे संक्रमित व्हायचे. आज कसलाही आजार झाला तर ऍलोपथीचा वापर होतो. श्रावण-भाद्रपदातील रानफुलांचे लावण्य तर चवथीला अधिक रंगीत करायचे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने हे सारे हितकारकच होते जे आज विस्मृतीत जाताना दिसते.
आरोग्य आणि आहार यांची महत्त्वपूर्ण सांगड याच उत्सवादरम्यान दिसते. दीड, पाच, सात, अकरा दिवस गणपतीचे वास्तव्य कमी-अधिक प्रमाणात घराघरांत आढळते. या दिवसांत शाकाहाराचे व रानभाज्यांचे वैविध्यपूर्ण प्रकार केले जातात. गोडाधोडाच्या पदार्थांची रेलचेल असते. पूर्वी भातशेतीच मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने तांदळाचे पीठ सर्रास वापरले जायचे. पहिल्याच दिवशी तांदळाच्या पीठाच्या नेवर्‍या-करंज्या करताना डाळीचे पीठ व गूळ, नाहीतर नारळाचा चव व गूळ यांचे सारण करून केलेल्या करंज्या मातीच्या मडकीत पाणी घालून, त्यावर स्वच्छ कपडा बांधून, वर केळीचे पान ठेवून त्यावर करंज्या, मोदक उकडले जायचे. खतखते, मणगणे, सातकप्यांचे गोड पोळे, पायस, आमाड्याचा आंबट-तिखट सार हे सारे असायचेच. त्याशिवाय तेरे, तायखळा, आळू, शेगलाची भाजी, कुड्डू, हुर्डूक, वालीच्या पानांची भाजी, तवशी, दोडकी, भेंडी, पडवळ यांनी घराचे अंगण, भितोडी भरलेली असायची. त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात आहारात व्हायचा. या सकस, पोष्टिक आहारामुळेच त्याकाळची पिढी धष्टपुष्ट झालेली होती.
गणपतीचे आगमन होणार याची लगबग घरातील लहानथोर सर्वांनाच असते. तरीही घराची झाडपूस करणे, शेणसारपण, रंगरंगोटी, जेवणाखाणाचे बघणे हे काम घरातील स्त्रियांकडे यायचे. हे सर्व आवरून गणपतीच्या वास्तव्यात दवली-माणीच्या वादनापासून ते फुगड्या, झेमाडो घालीपर्यंत कधीकधी रात्र सरायची. परंतु फुगडीशिवाय एकही दिवस व रात्र सरत नसे. हाताखांद्याशी एखादे लहान मुल असले तरीही त्याला कडेवर घेऊन, प्रसंगी झोपवून, उठले तर त्याला थोपटून फुगडीत रममाण होणे व्हायचे. गणेशावरील असलेल्या निस्सिम श्रद्धेमुळेच हे शक्य होत असे.
वयीले डोंगरी गे बाई
रान कापीले हुस्केचे
देऊळ बांदिले बसकेचे
गणपती देवाचे, ग बाई गणपती देवाचे
श्रावणबाळ, चिलयाबाळ, सत्यवान-सावित्री, हरिश्‍चंद्र-तारामती, कृष्णसखा, गणपती जन्माख्यान, पार्वती, द्रौपदी, सीता, रामायण, महाभारत अशी आख्यानकाव्ये, कथानके, लोकोत्तर पुरुष-स्त्रिया यांचे भावबंध फुगड्यांतून उलगडत जायचे. रामायण, महाभारतासारखी महाकाव्ये अशाच फुगडीगीतातून पिढीपर्यंत पोहोचली. फुगडीगीतांतून ही कथाकाव्ये ऐकतच मनीमानसी संस्कार घडले व ही मौखिकता पुढे पुढे सरकत राहिली. संस्कारसंपन्न ज्ञानसाधनेचा हा मोठा परिपाठच गणेशचतुर्थीच्या निमित्ताने समाजासमोर यायचा. गणेशजन्माची कथा तर कित्येक फुगडीगीतांतून समूर्त होत गेली. प्रत्येक गीतात वेगळेपण-
पार्वतीचा तयेचा एकवाद
उठली फातोडचे पारी गे
गेली ती गायीचे गोठणी
हाडीले गुळीभर शेण गे
सारपले घर आनी दार गे
लायीली माळ्याक निसण
काडीले एकदोन नारळ
आप्रोस पिळून आंगी लावीला
आंगीच्या मळीचा बाळ घडयला...
दवले-माणीच्या गायनाची एक स्वतंत्र परंपराच तत्कालीन पिढीला मुखोद्गत झाली होती. फुगडीचे निमित्त असायचे स्त्रियांना स्वतःचे मन व्यक्त करण्यासाठी. सासरी वावरताना प्रसंगी त्रास सहन करावा लागायचा. कष्ट वाट्याला यायचे तरीसुद्धा हे सारे सहन करावे लागायचे. याची शिकवण माहेरहून आईने मुलीला दिलेलीच असायची. त्या संस्काराची शिदोरी बरोबर घेऊनच संसारात रममाण होणे व्हायचे.
शेत माझे डोंगरी गे, चित्त माझे माहेरी
आई माझी चिंता करी, लेक माझी एकटी
नाही आई एकटी मी, सासू आहे संगती....
असे मनाला समजावणे व्हायचे. हे भक्तीचे सामर्थ्य होते. गणेशावरची अढळ श्रद्धा होती. ती जशी फुगडीतून अधोरेखित व्हायची तशीच भजन, कीर्तन, आरत्यांमधून स्पष्ट जाणवायची. आजही भजन, कीर्तन, आरतीमधून ही परंपरा जिवंत, प्रवाही राहिलेली आहे. काळाप्रमाणे बदल घडला. पूर्वी ध्वनिक्षेपकाचे, फटाक्यांचे मोठे प्रदूषण होत नव्हते जे आज विसर्जनाच्या वेळी आपल्याला दिसते. घुमट, समेळ, झांज, पखवाज या वाद्यांतून साकारणारे संगीत मन बेभान करायचे. पावले थिरकायची. घराघरांत होणार्‍या भजन-आरत्यांमुळे घर पवित्र तर व्हायचेच. एकूणच ते दिवस भारावल्यासारखे. विसर्जनावेळी तर या सर्वांचा उत्कर्षबिंदू असायचा. आजही गणेशोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. प्रतिष्ठा, पैसा, स्पर्धा यांच्या गदारोळात त्याचे मूळचे आत्मतत्त्व हरवणार तर नाही ना ही खंत वाटते. विद्येची, बुद्धीची, कलेची अधिष्ठात्री देवता श्रीगणेश. त्याचा परंपरेने चालत आलेला उत्सव सर्वांनाच डोळस करणारा ठरायला हवा. पताका लावण्यापासून ते खाद्यपदार्थ तयार करण्यापर्यंत औषधी वनस्पतींचा खजिना, कथा-काव्यांचा संस्कारसंपन्न नजराणा पिढ्यान्‌पिढ्या पोचविणारा चवथीचा उत्सव हा पारंपरिक ज्ञानाचा खजिनाच आहे.

बालपणीची चवथ

- डॉ. पांडुरंग फळदेसाई 


आमची पिढी वाढली ती एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये. जवळजवळ तीन पिढ्या एकत्र नांदायच्या. बालगोपाळांचे गोकूळच तेथे अवतरलेले असायचे. असे हे बालपण आठवण्याचे कारण म्हणजे उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आमची पारंपरिक ‘चवत’ म्हणजेच गणपतीची परब.



प्रत्येकाला आपल्या बालपणात डोकावणे आवडते. आजच्या मोठेपणीच्या आयुष्याची तुलना स्वाभाविकपणे आपल्याच बालपणाशी होते आणि बालपणातल्या गमती-जमती आठवल्यावर आपण किती रम्य अशा बालपणाला मुकलो याची तीव्रतेने जाणीव होते. कितीही कठीण परिस्थितीत, संघर्षात, गरिबीत आणि कधीकधी दुःखात आपण बालपणातले दिवस घालविलेले असले, तरी आज त्याकडे आम्ही सुखाचे संचित म्हणूनच पाहतो. कारण त्यावेळेला भविष्यकालीन आयुष्याचा विचार मनाला फारसा स्पर्श करीत नसे. त्यामुळे एक निरागस, स्वच्छंदी वृत्तीने सभोवतालचे जग पाहण्याची सवय नकळत लागून जाते. त्यामुळे मिळेल त्या अनुभवातून आनंद मिळवायचा प्रयत्न सातत्याने चालू असतो. आपले कुटुंब, आई-वडील, काका-काकी, भाऊ-बहिणी, मामा-मावश्या, शेजारी-पाजारी, गावातील सवंगडी, शिक्षक, शाळेतील सोबती, मित्र-मैत्रिणी यांच्या गोतावळ्यात गुंग असताना आपण अचानक मोठे झाल्याची जाणीव होते. तेव्हा मात्र आपल्या बालपणातील दिवस पाखरासारखे उडून गेले याची जाणीव अस्वस्थ करून जाते. आता आपली मुले, नातवंडे यांच्या बालपणात आपण नकळत स्वतःला शोधत असतो. तो एक अनावर छंद मनाला भुरळ घालीत असतो. येणार्‍या बहुतेक सर्व प्रसंगांतून आपण आपल्या बालपणाचा वेध घेतो. त्यामागे पुनर्प्रत्ययाचा आनंद घेण्याची ऊर्मी असते. हे प्रसंग मूलतः कौटुंबिक स्वरूपाचे असतात. त्यात सण-उत्सवांचा मोठा वाटा असतो. कारण आमची पिढी वाढली ती एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये. मोठ्या कुटुंबातील जवळजवळ तीन पिढ्या एकत्र नांदायच्या. त्या ‘नांदण्या’तला आनंद वेगळाच होता. बालगोपाळांचे गोकूळच तेथे अवतरलेले असायचे. त्यामुळे क्षणोक्षणी आनंद अनुभवायचा. उत्साहाला उधाण आलेले असायचे. कोणतेही जोखमीचे कामदेखील आव्हान म्हणून स्वीकारण्याचे बळ अंगात यायचे. असे हे बालपण आठवण्याचे कारण म्हणजे उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आमची पारंपरिक ‘चवत’ म्हणजेच गणपतीची परब.
आमच्या बालपणातील चवत म्हणजे एक अविस्मरणीय घरगुती सण. एक पर्वणी. घरात पूजेसाठी आणायची मूर्ती कशी असावी याबद्दल आमच्या खूप कल्पना असायच्या तशाच अपेक्षादेखील असायच्या. परंतु त्याबाबतीत आपण बाल-गोपाल मंडळी फारसे काही करू शकत नव्हतो. परंतु घराची, मखराची सजावट, माटोळी, रांगोळी, आरत्या, फुगड्या, फटाके-दारूकाम याबाबतीत मात्र सर्वत्र आमची मिरासदारी असायची.
माटोळीच्या तयारीसाठी आम्ही मुले चार दिवस अगोदरच कामाला लागायचो. रानात जाऊन मिळेल ती जंगली फळे म्हणजे कुड्या-कात्रे, माट्टीकात्रे, कांगोणां, बेलफळे, फागलां जमवायचो. त्याच्याबरोबरीने मळे व बागायतीतील अनेक फळभाज्या आणि बागायती पिके असायची. त्यात सुपार्‍यांची शिपटीं, वैशिष्ट्यपूर्ण नारळ, केळी, चिकू, पेरू, तोरींग, नीरफणस, कर्मल, बिंबल, काकडी, दोडकी, पडवळ, दुधी, भेंडी असे एक ना अनेक फळभाज्या असायच्या. माटोळी उभारण्यासाठी आमच्याकडे आमचा पारंपरिक गडी रघुनाथ यायचा. आम्ही गोळा केलेल्या सर्व वस्तू तो यथासांग माटोळीला बांधायचा. माटोळी आकर्षक व्हावी म्हणून तिला आंब्याच्या डहाळ्यांची अथवा पानांची किनार असायची.
चतुर्थीच्या आदल्या दिवशी घरात गवर-म्हादेव पुजायचे. त्यासाठी स्वच्छ आणि गुळगुळीत केलेला मोठाला सोललेला नारळ आम्ही तयार ठेवायचो. गौरीसाठी पत्री गोळा करून आणण्याचे काम आमच्यासाठी जसे ठरलेले असायचे, तसेच एका विशिष्ट शेतीवर जाऊन दोन दिवसपर्यंत पूजेसाठी लागणार्‍या दूर्वा आणण्याचे कामही आमचेच असे. बाकी तुळशीपत्रे, फुले वगैरे पूजासाहित्यदेखील तयार ठेवण्याची कामगिरी आम्ही स्वेच्छेने करायचो. गौरीची चुडी वडीलधारी मंडळी तयार करी व गणपतीसाठीची पत्री-पुडी गावच्या मंदिरअर्चकाच्या घरी जाऊन आणण्याची जबाबदारी आम्हा मुलांवर असे. रंगीत पताका लावणे, तुळशीवृंदावनाजवळ छोटी माटोळी बांधल्याची खात्री करणे, रांगोळी घालणे आणि अधूनमधून स्वयंपाकघरातील गोडधोड पदार्थांचा वेध घेणे हे आमचे काम मात्र सातत्याने चालू असे. कधीकधी शेजार्‍यांकडील तयारी कुठवर आली याचाही अंदाज घेत असू. त्यांना काही मदत हवी असल्यास ती देण्यास आम्ही सगळेजण एका पायावर तयार. परंतु ठरलेल्या वेळेत सगळी तयारी पूर्ण व्हायला हवी याकडे आम्हा सगळ्याच मुलांचे लक्ष असे. कारण चवत व पंचम (चतुर्थी आणि पंचमी) या दोन दिवसांत आम्हाला अधिकाधिक कामात व्यस्त राहावे लागे.
चतुर्थीच्या काळात आजोळीची मंडळी, खास करून मामा यायचे. ते यायचे म्हणजे घरातील आम्हा मुलांसाठी खूप काही आणायचे. लाडू, करंज्या, हालवा, पोहे, पेढे, शेव, चिवडा आणि त्यासोबत फटाके आणि चंद्रज्योती. नंतरच्या काळात त्यात आपटगोळ्या आणि मोठ्या बॉंबचीही भर पडली. त्या आपटबॉंबकडे व फटाक्यांकडे पाहिल्यावर कधी एकदा आपण ते फोडू असे व्हायचे. मग मामाच्याच साक्षीने फटाके फोडायचो, नपेक्षा बॉंब तरी फुटायचे. कारण आमच्या दृष्टीने त्या आवाजात गणेशोत्सवाचे वातावरण तयार करण्याची प्रचंड क्षमता होती! फटाक्यांवर आणि बॉंबवर हक्क मुलांचा तर आपटबॉंब आणि चंद्रज्योती पेटविण्याचे काम मुलीबाळींचे असायचे.
चवतीच्या सकाळी गणपतीबाप्पा आमच्या घरी यायचे ते फटाक्यांच्या आवाजात. मूर्ती आवरणाखाली असल्यामुळे आम्हा सर्व मुलांची उत्कंठा शिगेला पोचलेली असायची. आपल्याकडे आणलेले गणपतीबाप्पा कोणत्या वेषात आणि कोणावर म्हणजे उंदीर, आसन, हंस, मोर, सर्प यांवर बसलेले आहेत, शिवाय त्यांचा आकार केवढा आहे हे जाणून घेण्याची ती उत्कंठा असे. गणपतीबाप्पाला मुख्य दरवाजात राठ दाखवून आत घेतले जाई. दुपारी त्याची पूजा व आरत्या होत. त्यावेळी ठेवणीतली घुमटे, शामेळ, झांज, कासाळे वगैरे वाद्ये आरत्यांसाठी तयार असत. ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ची आरती सुरू असे. घुमटांच्या तालावर आरत्या गाण्याचे आणि अनेक पारंपरिक आरत्या निवडून वेगवेगळ्या तालात म्हणण्याचे पहिले धडे आम्ही चवतीच्या परबेतच गिरवले. फटाक्यांचा धूमधडाका सुरू झाला की आम्ही सगळी मुले तेथे घोळक्याने हजर असायचो. एखादी भित्री भागूबाई रडव्या तोंडाने कोपर्‍यात उभी असे. आरत्या झाल्यावर गणपतीला नैवेद्य दाखविला जाई. त्यात लाडू-कापां-करंज्या आणि खास करून पातोळ्या असत. हळदीच्या पानातून उकडलेल्या त्या पातोळ्यांचा घमघमाट अनेक दिवसपर्यंत आमच्या नाकात भरून असायचा. गौरीसाठी खास सासवेची व देठ्याची अळणी भाजी असायची. शिवाय गौरीपुढे सर्व सुवासिनी वायन पुजायच्या.
त्यानंतर मुख्य कार्यक्रम म्हणजे जेवणावळी. पहिल्या पंगतीला मोठ्या पुरुष मंडळीसोबत आम्हा सर्व मुलांचा क्रम लागायचा. नेहमीच्या पदार्थांपेक्षा पानातील पातोळ्या, पायस, मोदक इत्यादी गोडधोड पदार्थांवर आमची नजर असायची. त्यावर यथेच्छ ताव मारला म्हणजे आमची चवत खूपच रंगायची. शिवाय दिवसभर अधूनमधून लाडू, करंज्या, शंकरपाळे, पेढे असल्या खाद्यपदार्थांची रेलचेल असायची.
दुपारच्या भोजनानंतरचा मुख्य कार्यक्रम लगबगीने सुरू व्हायचा, तो म्हणजे गावातील गणपतीबाप्पांचे दर्शन घेणे. आम्ही अगोदरच मनसुबे रचायचो, यावर्षी अमुक एवढे गणपती पाहायचे. म्हणून वाड्यावरील आम्हा मुलांमध्ये अहमहमिका असायची. कोणी किती संख्येने गणपती पाहिले त्याची पुढे वर्णने येत. अमुक अमुक घरातील गणपती का आवडला याचे वर्णन साग्रसंगीत करीत असू. काही ठिकाणी देखावे करीत. स्वयंचलित देखाव्यांची कल्पनाच त्यावेळी आमच्या बालमनाला प्रचंड भावायची. आमच्या बालपणात गावात वीजपुरवठा झालेला नव्हता. त्यामुळे एखादा स्वयंचलित दिवा गणपतीसमोर मखरात दिसणे म्हणजे आम्हाला कोण कौतुक वाटायचे. माझ्या एका बालमित्राने उंचावरून पडणार्‍या पाण्याच्या ओघाखाली डायनामा चालवून थेट गणपतीच्या मखरात दिवा पेटवला. तो ‘चमत्कार’ पाहण्यासाठी आम्ही असंख्य मुले त्या चतुर्थीला माझ्या मित्राच्या घरी गर्दी करून होतो. गणपतीबाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही गावात निघण्याअगोदर आम्हाला सूर्यास्तापूर्वी घरात परतण्याची तंबी दिलेली असायची.
त्यासंदर्भात गणपती आणि चंद्राची कथा आवर्जून सांगितली जायची. लाडू-मोदकांच्या भरपूर मेजवानीचा लाभ घेऊन गणपती उंदरावर बसून चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी परतत होते. त्यावेळी उंदराचा पाय रस्त्यात अडकला व पाठीवर बसलेले गणपतीबाप्पा तोल जाऊन खाली पडले. ते दृश्य पाहून चंद्राला हसू फुटले. तो मोठ्याने हसला. ते पाहून गणपती अपमानीत झाले. त्यांना राग अनावर झाल्याने त्यांनी आपला एक दात मोडून चंद्राकडे भिरकावला व त्याला शाप दिला- ‘चतुर्थीच्या दिवशी कोणीही तुला पाहणार नाहीत. जो पाहील त्याच्यावर भलताच आळ येईल.’ तसा भलता आळ आपणावर येऊ नये म्हणून आम्ही सर्व मुले संध्याकाळच्या आत घरात यायचो. रात्री आरत्या, फटाके, चंद्रज्योती, जमीनचक्रे, फुगड्या चालायच्या.
दुसरा दिवस कधी उजाडला आणि कधी संपला हे आम्हाला कळतच नसे. कारण दिवसभर गोडधोड खाणे, गणपतीच्या मूर्ती पाहणे, आरत्या म्हणण्यात सामील होणे, फटाके फोडणे, फुटलेल्या फटाक्यांच्या कचर्‍यातून न फुटलेले फटाके वेचून फोडणे इत्यादी अनेक उद्योग दिवसभर चालायचे. संध्याकाळ जवळ येता येता मात्र आम्हाला उदास वाटायचे. वर्षभर वाट पाहायला लावून आलेला हा आपल्या घरचा देव गणपतीबाप्पा आता आणखी काही वेळानंतर निघून जाणार या कल्पनेने आम्ही अस्वस्थ व्हायचो. ज्यांच्या घरी पाच-सात दिवसांचा गणपती आहे ते भाग्यवान असे वाटायचे. दीड दिवसानेच गणपती माघारी जाणार म्हणून आमच्यापैकी काही मुले रडायलाच लागायची. त्यांची समजूत काढताना मोठ्यांच्या नाकी नऊ यायचे. शिवाय गणपतीला आमच्या डोळ्यांदेखत पाण्यात बुडवीत ही कल्पनाच आमच्या बालमनाला असह्य वाटे. देव म्हणून घरी आणता, त्याची पूजा करता, खूप आनंद साजरा करता आणि शेवटी त्या देवाला पाण्यात विसर्जित करता. सगळेच अगम्य वाटे. परंतु त्या अस्वस्थतेतदेखील आम्ही सगळेजण मोठ्या आवाजात त्याला विनवणी करायचो, ‘गणपतीबाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!’ रम्य ते दिवस....

अस्सा गणेश सुरेख बाई...

सौ. रेखा ठाकूर


आनंदनिधान घेऊन येणारा, हुरहुर लावून जाणारा आणि वाट पाहायला लावणारा हा गणेश मला देवापेक्षा जवळच्या माणसांसारखा प्रिय वाटतो. कुटुंबातला एक वाटतो. त्याच्या प्रेमात पडल्याची ही सुफळ संपूर्ण गोष्ट.




ताशाचा आवाज टररऽऽर झाला
न् गणपती माझा नाचत आला...
कधीतरी लोकगीतसदृष्य या गाण्याचे बोल कानावर पडले आणि अगदी मनोमन पटून गेले- नृत्य म्हणजे उल्हास, नृत्य म्हणजे चैतन्य... गणपतीच्या आगमनाबरोबर हे सारं अनाहूतपणे येतंच. त्यामुळे नाचणारा गणपती प्रतीकच होऊन येतो. आमच्याकडे नृत्यमुद्रेतल्या गणपतीचे एक मोठ्ठे पोस्टर आहे. मागच्या दोन हातांमध्ये परशू आणि कमळ. पुढच्या दोन्ही हातांची मुद्रा अशी की त्यातून ‘तथास्तु’चा झंकार उमटावा. उजवा पाय चवड्यावर किंचित उचललेला आणि डावे पाऊल गिरकी घेण्याच्या पवित्र्यात. नखशिखांत नटलेला मूषक कौतुकभरल्या नजरेने आपल्या स्वामीच्या कला पाहतो आहे. या चित्राकडे पाहिले की प्रसन्नतेचा शिडकाव झाल्यासारखे वाटते. खिन्नतेच्या जाळ्या गळून पडतात आणि सोनसळी उन्हं बागडू लागतात आसपास. त्यामुळेच मला नाचणार्‍या गणराजाचे अप्रूप अधिक आहे.
गणपती आले की मग आठवणींची पाने फडफडू लागतात. माझ्या माहेरी माझे आईवडील नोकरीवाले. बिर्‍हाडाची बेताची जागा. त्यामुळे गणपती आणला की सारे यथासांग व्हायला हवे या आईच्या श्रद्धेमुळे इच्छा असूनही घरी गणपती बसवणे शक्य नव्हते. त्यामुळे घरी ‘बाप्पा’ येण्याचा थरार मला ठाऊकच नव्हता. आमच्याकडे सार्वजनिक गणपती मात्र धूमधडाक्यात असायचे. तिथे पडून असायचे. पण भक्तिभावाने घरात आणला जाणारा, सजवलेल्या मखरात विराजमान होणारा, लाल फुलं, दूर्वा ल्याणारा आणि घमघमत्या वासाचे शुभ्र मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करावयाचा ‘घरचा गणपती’ शेवटी वेगळाच ना!
कालांतराने ‘झाले मी सून गोव्या घरची’ म्हणत मी धाडकन गोव्यात आले. आमचं इकडचं सख्खं-चुलत असं एकत्र कुटुंब. सासू-सासरे, दीर-नणंदा, मुलंबाळं असं २०-२५ माणसांचं नांदतं घर गोकुळासारखं. तिकडून (म्हणजे फार लांबून नव्हे हो, महाराष्ट्रातून. पण इकडच्या काही मंडळीना महाराष्ट्र म्हटलं की जरा मळमळतं) आल्यामुळे मला ‘एकत्र कुटुंब’ ही संकल्पना नवीनच होती. इथल्या संस्कृतीला एक स्वतःचा वेगळा चेहरा आहे. तो मला अजून अपरिचित होता. ‘हम दो, हमारे दो’ अशा चौकटीत वाढल्यानंतर इथे आपलं जमेल ना अशी थोडी धुकधुक वाढली होती. पण या प्रेमळ घराने मला कुठलेही आढेवेढे न घेता सहज स्वीकारले. आमचं शंभर वर्षांचं जुनं घर. भक्कम. खूप खोल्या. गडगंज माजघर. तिथे प्रशस्त ओट्यावर देवघराची जागा. अनेक देवदेवतांच्या तस्विरींचा लवाजमा. मोठ्या देव्हार्‍यात अनेक मूर्ती... शाळिग्राम, बाण गंगा, वस्त्रात गुंडाळलेले कुठले पवित्र आकार. (अद्याप सगळे देव मला नावानिशी ठाऊक नाहीत.) माझे सर्व सासरे पौरोहित्य करणारे (म्हणजे ‘भटपण’), त्यामुळे घरात पूजाअर्चा, सणवार, सोवळंओवळं असायचं. पण त्याला कर्मठपणाचा किंवा कर्मकांडाचा वास नसल्यामुळे मला त्यात सामावून जाणं सहज जमलं. पारोशानी देवाची पेढी ओल्या वस्त्राने पुसणे, पूजेची उपकरणे चकचकीत करणे, रांगोळी रेखणे वगैरे आनंदाने करू लागले. सासरे सोवळे नेसून मनोभावे पूजा करायचे. दूर्वा, तुळशी, बेल, तांबड्या-पांढर्‍या-पिवळ्या फुलांची गर्दी. त्यात बुडालेले सुस्नात देव. उदबत्ती, धूपाचा गंध, घंटेचा मंजूळ नाद आणि त्यांच्या तोंडून येणारा मंत्रघोष... काहीतरी वेगळंच अनुभवायला मिळायचं. श्रावणातला प्रत्येक वार (एक बिचारा बुधवार सोडला तर) मानाचा. त्यात नागपंचमी, रक्षाबंधन वगैरे सण, त्यामुळे ही श्रावणधून पटकन संपत यायची. त्याआधीच घराला गणपतीचे वेध लागले. माझे मन उत्सुकतेने भरून गेले. ‘गणपती’ ही काय चीज आहे याची माझी कल्पना फारच तोडकी. त्यामुळे अंदाजच बांधता येईना. ‘पहिलावहिला गणपती’ आयुष्यातला.
रात्रीच्या पंगतीत येत्या शनिवार-रविवारी घरसफाईचं पक्कं झालं. नोकरीवाल्या मंडळींसाठी शनि-रविची योजना. मग काय घरात मंगलकार्य उभं राहिल्याची लगबग सुरू झाली. एवढं मोठं पुराणं घर... माणसांबरोबरच झुरळी, कोळी, उंदीर सुखाने राहत होतीच. सकाळी भरपेट खाऊन सार्‍यांनी कंबर कसली. लांब दांड्याच्या झाडूने धूळ, जळमटे साफ झाली. प्रत्येक वस्तू उचलून बादल्या-बादल्या पाण्याने सारी जमीन (फरशी) स्वच्छ झाली. अडगळ काढून तिचा निचरा झाला. भिंतीवरच्या पूर्वजांच्या तस्विरी स्वच्छ झाल्या. त्यांना नवे हार चढवले गेले. पडदे साबणपाण्यातून काढून उन्हात वाळायला पडले. सतत २-३ तास कामाची वेठ मारल्यावर अधेमधे चहाची आधणे आणि शेवचिवड्याचे बकाणे. खूप दिवसांनी निवांत एकत्र आल्याने थट्टामस्करी, हशा चालू राहिले. ही झाली बाह्य गणपतीसाठीची पूजेची खास. तांब्या-पितळेची उपकरणे सासरे काढायला लागले... अबब! दोन-अडीच फुटी पितळी भक्कम समया. तांब्याची ताम्हणे, लोट्या, पळ्या, तबके, कितीतरी निरांजने. मग आमसूल-मीठ लावून (धुऊन परत चुलीतल्या राखेने घसाघस घासून) उजळण्यात आम्ही गुंतलो. दुपार केव्हाच झाली. सुगरण सासवांनी चण्याची आमटी, सुरणाची कापं असा सर्वांचा आवडता पारंपरिक स्वयंपाक बनवला. त्यावर ताव मारून थोडी वामकुक्षी करून परत कामाला जुंपले. संध्याकाळपर्यंत घर चकचकू लागलं. एवढं काम करायची सवयच नव्हती. थकायला झाले, पण मजा आली.
आमच्याकडे गणपतीचा नैवेद्य म्हणजे उकडीचेच मोदक. पण गोव्यात नवर्‍या! त्याच्या खास प्रीतीच्या (आम्ही त्याला करंज्या म्हणतो आणि त्या दिवाळीलाच होतात). आता घरात एवढी माणसं, त्यात आला-गेला पैपाहुणा, लेकीबाळी (सासुर्‍याला आलेल्या), सगेसोयरे... त्यामुळे नेवर्‍यांचा नग चारशे ते साडेचारशे आणि दोन प्रकारचे (पीठाचे आणि बेसनाचे) लाडू शंभर-दीडशे. झाल्यास घरचा खास चिवडा, शंकरपाळे वगैरे ऐकून मला भोवळच आली. कसं व्हायचं एवढं? नेवर्‍यांचा मांड मांडला परत पुढच्या शनिवारी. कामावरून येईपर्यंत अतिशय कामसू सासूबाईंनी सारी जय्यत तयारी केलेली. पोळपाट, लाटणी, धुतलेले पाट, मोठ्ठ पातेलं भरून सारण (सुकं भाजलेलं खोबरं, खसखस, तीळ, गूळ, साखर, थोडा रवा आणि गव्हाचं भाजलेलं पीठ जायफळ, वेलची पावडर घातलेलं. हे सारण असं सुंदर दिसायचं की मोह व्हावा...), मैदा आणि भरायचं सारण यासाठी तसराळी, त्यात मापाचे बेतशीर चमचे, पात्यांच्या कडांना लावायला वाट्यातून पाणी आणि हलका काथा, कढया, झारे, वातीचा भला मोठा स्टोव्ह, तयार नेवर्‍या वारडू नयेत म्हणून त्यावर घालायला ओला पंचा आणि शेवटी तयार माल ठेवण्यासाठी कागद पसरलेला होता.
आम्ही सारे वेगवेगळ्या कामावर नेमले गेलो. २०-२५ वर्षांपूर्वी फूड प्रोसेसर वगैरे नसल्याने पीठ मळणे, तिंबणे हे सारे एका दिराकडे, साचे नसल्याने भरण्याचे काम एकाकडे, आम्ही काहीजणी फक्त पाती करण्याच्या कामावर, एक सासूबाई तळणीच्या तज्ज्ञ. स्टुलावर बसून स्टोव्हवरच्या कढईचा ताबा घेतला त्यांनी. कॅसेटवर ‘वस्त्रहरण’, ‘असा मी असा मी’, मध्येच नाट्यसंगीत, कधी जसराज, कधी मालिनी असं सतत चालूच. त्यात तोंडाचा पट्टा. म्हणता म्हणता झारा नेवर्‍यांनी ओसंडू लागला आणि मला एकीचे बळ काय असते याचे साक्षात उदाहरणच दिसले.
रात्री श्रमपरिहारार्थ पत्त्यांचा डाव रंगला. उरलेली कामे दुसर्‍या दिवशी अशीच हसत-खेळत. आता गणराज वेशीपर्यंत पोहोचलेच होते. हरितालिका येऊन गेली. पूजा झाली, कथा वाचली, आरती झाली, दिवसभर तर्‍हेतर्‍हेचा फराळ, वाती, फुलवाती, वस्त्र वगैरे चालूच होतं काहीबाही. कलेची नजर असलेल्या मंडळींनी सजावटीचा ताबा घेतला. (तेव्हा तयार मखरांची प्रथा नव्हती.) पताका लागल्या. जुनं सागवानी टेबल. त्याच्यामागे देखणा पडदा. टेबलावर सुंदर टेबलक्लॉथ, रंगीत दिव्यांच्या अन् फुलांच्या माळा अशी कलाकुसर झाली. माटोळीचे काम स्वतः सासर्‍यांनी हातात घेतले. ‘माटोळी’ हा प्रकार मला अनोखा वाटला. जयंतराव साळगावकर म्हणायचे तसा हा रानावनाचा (कारण मस्तक हत्तीचे) आणि माणसांचा (अर्ध शरीर माणसाचं) देव. उपलब्ध असलेली फळं अतिशय नेटकेपणानी माटोळीला बांधली आणि तशी बहरलेली रंगीत ‘माटोळी’ गणपतीपुढे छताला चढली. (तेव्हा पायीच जाऊन गणपतीला आणत. कारण गाड्या-घोडे कुठे होते.) टोप्या घालून झांजा घेऊन गणपती आणायला पोरंटोरं आणि मोठे निघाले. चंदनाच्या पाटावरून ‘मोरया रे मोरया गणपती मोरया’च्या गजरात, झांजांच्या आवाजात अखेर आगमन झाले. पायावर दूध-पाणी घालून आणि मीठ-मोहर्‍या ओवाळून त्याला घरात घेण्याचे मला सांगितले. घरच्या मोकळ्या वातावरणामुळे दडपण नव्हते. काही चुकलंबिकलं तरी गणपतीला ओवाळून घरात घेताना उगीचच भरून आलं. त्याच्या आगमनाबरोबरच एक शुचिर्भूत आनंदाची लहरच घरादारावर फिरली.
त्यावर्षी पाच दिवसांचा गणपती. मग रोजच उत्सव. सकाळी यथासांग षोडशोपचाराची पूजा, एकवीस दूर्वांच्या माळा, फुलांचे-जायांचे मुकुट, गोडधोडाचे नैवेद्य, अथर्वशीर्षाची आवर्तने, सग्यासोयर्‍यांची ये-जा, सजावट बघायला येणारे गावकरी, अशी गोड लगबग. संध्याकाळी कुणीतरी दीर स्नान करून सोवळे नेसून सायंपूजा करायचा. मग सुरू व्हायचा आरत्यांचा दणका. सतरंज्या पसरायच्या, आरत्यांची पुस्तके, डफ, झांजा... अगदी डबेही वाजवण्यासाठी दाखल व्हायचे. गळ्यावर आरत्या म्हणणारे खंदे वीर पुढे मांड्या ठोकून बसायचे. आम्ही कोरसला मागे. पारंपरिक आरत्यांसोबत ‘शेंदूर लाल चढावो’, ‘धन्य धन्य हो प्रदक्षिणा’, ‘गणराज रंगी नाचतो’, ‘येई हो विठ्ठले’ अशा चालींच्या आरत्यांची माळ लागायची. एवढा चेव यायचा की देवासमोर तबकात निरंजनं घेऊन असणार्‍याचा पुतळा झाला तरीही आरत्या थांबायच्या नाहीत. पण शेवटी ‘घालीन लोटांगण’वर यावंच लागायचं. मग धीरगंभीर ‘देवे’ चालायचे आणि सरतेशेवटी प्रसादांची लयलूट. फटाक्यांच्या लडी घेऊन पोरं केव्हाचीच चुळबुळत राहायची. (आमच्याकडे फटाके हा शब्द दिवाळीशीच जोडलेला.) असे कापरासारखे दिवस उडाले आणि विसर्जनाचा दिवस आला.
त्या दिवशी तर प्रत्येकाला या लाडक्यासाठी काय करू, काय नको होऊन गेलेलं. आज सायंपूजा आणखी मनोभावे. आरत्या आणखीनच दणाणत्या. मग आला विदाईचा क्षण. देवाला सांगणं करणं हा प्रकार मला खूप भावून गेला. माझे सासरे त्याला साकडे घालीत राहिले. सगळ्यांच्या मनातले. टाचणी पडली तरी ऐकू येईल एवढी शांतता पसरली. आजचा प्रसाद आणखीनच खपून बनवलेला. पण इथे गणपती विसर्जनाची प्रथा नसल्याने गणपती घरातच राहिला. गणपती न पोचवल्यामुळे खूप रिकामं नाही वाटलं. सगळ्या आठवणी फेर धरून राहिल्या.
आज २५-२६ वर्षांनी ते घर नाही. सारे वेगवेगळ्या जागी पण गणपती असाच. नात्यांची घट्ट वीण अद्यापि उसवलेली नाही. आता अधिक आधुनिक, सुटसुटीत झाली सारी तयारी. पण आपल्या घरी गणपती असण्याची फारशी असोशी पूर्वी नसणारी, मी मात्र त्याच्या आगमनाची नकळत वाट पाहत राहते. आनंदनिधान घेऊन येणारा, हुरहुर लावून जाणारा आणि वाट पाहायला लावणारा हा गणेश मला देवापेक्षा जवळच्या माणसांसारखा प्रिय वाटतो. कुटुंबातला एक वाटतो. त्याच्या प्रेमात पडल्याची ही सुफळ संपूर्ण गोष्ट.

बाप्पा मोरया रे...

- प्रदीप तळावलीकर


पंचमीच्या संध्याकाळी गणपती पाहायला बाहेर पडण्याचा कार्यक्रम पंधरा-वीस वर्षांपूर्वी ज्या उत्साहाने होत होता तसा उत्साहाने होत असलेला हल्ली दिसत नाही. पाच गणपती पाहिले की झाले अशीच वृत्ती दिसते. पण देखाव्यांच्या संख्येत मात्र प्रतिवर्षी वाढ झालेली दिसते.





‘नेमेचि येतो मग पावसाळा’ असे जे नेमाने आणि नियमाने येत असते किंवा होत असते त्याबाबतीत म्हटले जाते. तद्वत यंदाची गणेशचतुर्थी उंबरठ्यावर आहे. गणेशचतुर्थी म्हटली की बाल असो की वृद्ध, अबला असो की सबला, साधू असो की संत, लेखक असो की वाचक, गरीब असो की श्रीमंत- सार्‍यांनाच प्रिय असते. आमच्यासाररखा वृद्धत्वाच्या सीमेवर लुडबुड करणार्‍यांना मग आपल्या बालपणातील चवथ आठवायला लागते आणि मन तासन्‌तास त्या आठवणीत गुंतून पडते... तेव्हा आज मी तेव्हाची आणि आताची अशा दोन कालखंडांतल्या चतुर्थीची गंमत अनुभवणार आहे.
कालची चवथ...
मला आठवते ती माझी पहिली चवथ. मी जेमतेम साताठ वर्षांचा असेन, तेव्हाची! आम्ही म्हणजे आमचे कुटुंब जरी पणजीला स्थायिक झालेले असले तरी चतुर्थीला आम्ही आमच्या फोंडा तालुक्यातल्या तळावली गावात जायचो. गावातल्या घरी गेल्याबरोबर पहिला प्रोग्राम असायचा तो म्हणजे गणपतीशाळेत जाऊन आमचा तयार होणारा गणपती पाहाण्याचा. आजोबांबरोबर मग आम्ही तळावलीपासून जवळच असलेल्या नागेशी गावी गणपती पाहायला जायचो. तो बघण्याचा कार्यक्रम आटोपल्यावर दुसरा प्रोग्राम असायचा तो फोंड्याला जाऊन माटोळीसाठी आणि एकंदर उत्सवासाठी फळफळावळ आणि भाजी आणण्याचा. या पहिल्या दोन दिवसांत रात्रीच्या वेळी मखर रंगवायचा कार्यक्रम व्हायचा आणि दिवसा माटोळीला फळ-भाज्या बांधण्याचा.
हे सगळे तयार होईपर्यंत मग तृतीया म्हणजेच तय उजेडायची. परंपरेनुसार आमच्याकडे चतुर्थी तीन दिवस साजरी व्हायची. तय, चवथ आणि पंचम. तयेच्या दिवशी पार्वती आणि शंकराची पूजा व्हायची. चवथीच्या दिवशी त्यांच्याबरोबर गणपतीचीही आणि पंचमीच्या दिवशी संध्याकाळी गणपतीची उत्तरपूजा झाल्यावर मग विसर्जनाचा सोहळा व्हायचा. चतुर्थी आणि पंचमीच्या रात्री आरत्यांना फार धमाल यायची. कारण गावातले गावकरी आरत्यांना आमच्या घरी यायचे. ते सगळे घुमट आरत्या करायचे. फारच मजा यायची. त्यामानाने लहानशा असलेल्या त्या गावच्या घराच्या हॉलमध्ये जवळजवळ सत्तर-पंचाहत्तर लोक आरत्यांसाठी जमा व्हायचे. हॉलमध्ये आरत्या आणि आतल्या खोलीत प्रसादाचे द्रोण भरण्याची बायकांची लगबग, तर बाहेर पडवीत अस्मादिक आणि मित्रमंडळी पणजीहून येताना आणलेल्या माकावच्या फोगाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत. पंचमीच्या दिवशीची धावपळ साधारण अशी विभागलेली असायची. आरत्या वगैरे झाल्यानंतर मग पुजारी उत्तरपूजा सांगायचे आणि अचानक आमच्या लहानग्या मनावर बाप्पा आता घरी जाणार म्हणून एकप्रकारची रुखरुख लागून राहायची. विसर्जनासाठी जवळजवळ मैलभर चालून जावे लागायचे. त्यामुळे मूर्ती डोक्यावर घेऊन जायला आमच्या कुळागरांतील एकजण यायचा. त्याच्या मागे मग आमच्या घरातील वडीलधारी मंडळी आणि मग मध्ये मध्ये आम्ही लहानगी मंडळी. त्याकाळात घरातल्या बायकांनी बरोबर यायची प्रथा नव्हती. कारण कदाचित बरेच चालावे लागायचे हे असेल. पण आमची एकुलती एक बहीण मात्र त्यामुळे खट्टू व्हायची.
गावात विसर्जनाचे तळे बरेच दूर असल्यामुळे पायी चालत तिथपर्यंत जायला अर्धा-पाऊण तास तरी लागायचा. बहुतेक वाट शेतातून वा कुळागरांतून असल्याने एक-दोन पेट्रोमॅक्सही बरोबर असायचे. आम्ही मुले माकावच्या फोगांतील मारानाच्या फोगेटी मोकळ्या करून त्यांनी खिसे भरून घ्यायचो. मग उदबत्ती पेटवली की लावली फोगेटी! तळ्याकडे पोचेपर्यंत वाटभर एक-एक अशा त्या फोगेटी आम्ही लावायचो. प्रत्यक्ष विसर्जनाच्या वेळी लावायला एकतरी फटाक्यांचे बॉक्स ठेवावे लागायचे. तळ्याकडे पोचल्यावर तिथे बाप्पाची पुन्हा आरती केली जायची. नारळ फोडला जायचा आणि मग गणपतीची मूर्ती घेऊन तो माणूस हळूहळू तळ्याच्या पाण्यात उतरायचा. छातीपर्यंत पाण्यात गेल्यावर मग तो मूर्ती तीन वेळा पाण्याला स्पर्शून बाप्पा मोरयाच्या गजरात हळूच ती मूर्ती पाण्यात सोडायचा. तीरावर आम्ही सगळे ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देत देत गणपतीला निरोप द्यायचो. परत येताना एकप्रकारच्या निःशब्द शांततेत आम्ही सगळे येत असू.
पंचमीच्या दिवशी संध्याकाळी खिशात मोकळ्या फोगेटी भरून आम्ही मुले गावभर गणपती पाहायला जायचो. त्या काळात देखावे हा प्रकार जवळजवळ नव्हताच. गावातल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन भक्तिभावाने गणपती पाहायचा हेच आम्हाला ठाऊक असायचे.
चवथीच्या तीनही दिवशी जेवणाची चंगळ असायची. तयेच्या दिवशी पार्वतीसाठी खास तिच्या आवडीचे खाद्यपदार्थ केले जात. त्यात तिच्यासाठी केलेली पंचपाल्यांची भाजी आणि पातोळ्या असायच्या. पण त्यात एक पातोळी मात्र नेहमीच अळणी असायची. गणपतीच्या जन्माच्या वेळी पार्वतीला अळणी पातोळ्या खायची जबर इच्छा होत होती म्हणे. चतुर्थीच्या दिवशी मोदक आणि सुकूर उंडे व पंचमीला भाताच्या शेतातील नव्या कणसांची पूजा करण्याची पद्धत गोमंतकात प्रचलित आहे. त्यानुसार त्या नव्यांसाठी खीर आणि जेवणात गोवन इडली म्हणजेच हीट; व ते बुडवून खाण्यासाठी नारळाचे गोड दूध. पंचमीच्या दुपारचे जेवण जेवताना मग दुसर्‍या दिवसाचे म्हणजे सष्टीच्या दिवसाला काय जेवण करावे यावर विचारविनिमय... तसा सर्वसाधारण सष्टीचा मेनू ठरलेला असायचा. मसूरचे मसाल्याचे तोंडाक व त्याबरोबर लावायला फ्राय केलेले हीट. म्हणजेच कालची इडली ही आज ब्रेड बनायची. आणि श्रावणानंतरच्या नॉनव्हेजचा पहिला दिवस असल्याने बरोबर ताजी ताजी मासळी. बहुतेक करून बांगड्यांचे त्रिफळे घालून केलेले तिखट हुमण व तळलेली मासळी.
आजची चवथ....
परंपरेनुसार आजही आमच्याकडे दीड दिवसाची चवथ असते. आता रीतीप्रमाणे आमच्याकडे तयेचा उत्सव असल्याने चवथ ही तशी तीन दिवसांचीच होते. वयोमानानुसार आज आमचे रोल बदललेले आहेत. म्हणजे पूजाअर्चा आता आमच्याकडे आहे, तर मखर रंगवणे, फोग लावणे, गणपती हातात घेणे आदी कामे आता तरुण आणि लहान मंडळी त्यांच्या-त्यांच्या उपस्थितीनुरूप करतात. बहुतेक मुले देशी-परदेशी असल्यामुळे त्यांची अनुपस्थिती असते, पण उपस्थित असतात त्या वर्षाची चवथ ही एखाद्या उत्सवासारखी असते. नाहीतर मग जे आहेत ते आपली चवथ रीतीरिवाज, परंपरा सांभाळून शक्य तितक्या भक्तिभावाने साजरी करतात. आजही आमच्या आरती घुमटा-शामेळानेच होतात. आजही पातोळ्या, पंचपालेभाजी, मोदक, सुकुर उंडे, खीर, हीट हे सगळे होतच असते. आणि हो, सष्टीच्या नॉनव्हेज जेवणाचे प्लॅन्सही तसेच केले जातात. आता काळानुरूप मसूरच्या तोंडाकाऐवजी खिमा किंवा शागुती असे पदार्थही सुचवले जातात. कारण त्यांचेही हीटाबरोबर कॉम्बिनेशन बरे जमते.
विसर्जनाठिकाणी पायी जाण्याऐवजी आता गणपतीला गाडीतून सफर दिली जाते. बाकी सगळे तेच असते. चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या पूजेसाठी हल्ली भटजी मिळणे दुरापास्त झाले आहे असे दिसते. आणि तो मिळालाच तर त्याने वेळेवर येणे हे त्याहूनही दुरापास्त. घराण्याचा पुरोहित असला तर ते काम सोपे होते. पण पूजा चालू असताना भटजींच्या मोबाईलची रिंगटोन एकदोनदा वाजलेली गणपतीसह आपणा सर्वांनाच ऐकावी लागते. आता आता तर त्याची सवय सर्वांना होऊन गेलेली आहे. पंचमीच्या संध्याकाळी गणपती पाहायला बाहेर पडण्याचा कार्यक्रम पंधरा-वीस वर्षांपूर्वी ज्या उत्साहाने होत होता तसा उत्साहाने होत असलेला हल्ली दिसत नाही. पाच गणपती पाहिले की झाले अशीच वृत्ती दिसते. पण देखाव्यांच्या संख्येत मात्र प्रतिवर्षी वाढ झालेली दिसते. आणि देखावे दहा दिवस तरी ठेवीत असल्याने पहाणेही पंचमीचा दिवस सोडूनच होत असते. एकंदरीत तसे सगळे तेच असते, पण भक्तिभावात कुठेतरी कमतरता असल्यासारखे वाटते आणि घराघरांत माणसेही कमी झाल्याचे जाणवते. कालाय तस्मै नमः

भक्तिप्रेमाची सगुण मूर्ती

ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर

भक्ती आणि प्रेम हे दोन भावविशेष माणसाचे जीवन अधिक समृद्ध करणारे आहेत. कोणत्याही स्थितीत असलेल्याला जगण्यात आनंद वाटावा, अशी स्थिती निर्माण करणारे आहेत. भक्तीत प्रेम असते, पण प्रेमात नेहमी भक्ती असते असे नाही. मुलाच्या आईवरील प्रेमात भक्तीचा काही अंश जरूर असतो, पण आईचे मुलावरील प्रेम हे वात्सल्यमय असते. त्यात भक्तीचा लवलेशही नसतो. असूही नये. मोठ्या भावावर असलेल्या प्रेमाला काहीवेळेला भक्तीची जोड मिळते. पत्नीचे पतीवरील प्रेमही क्वचित भक्तीच्या स्तरापर्यंत जाऊन पोहोचते. पण सामान्यतः भक्ती ही वेगळी गोष्ट, मात्र भक्तीमध्ये प्रेम असावेच लागते, कारण भक्तीत जिव्हाळा ओतायचा झाला, तर तो प्रेमाशिवाय ओतता येणे शक्य नाही. म्हणून तर मधुराभक्तीचा महिमा विशेष प्रमाणात गायिला जातो. मधुराभक्ती म्हणजे परमेश्र्वर हा आपला पती आहे आणि आपण त्याच्या प्रेयसी किंवा पत्नी आहोत, अशी भावना निर्माण होणे. ही भावना उच्चतम भक्तीची निदर्शक आहे, असे पूर्वापार समजले गेले. म्हणून तर संत कबीर म्हणतात, ""एक एक गोपीके प्रेममें, बह गए लाख कबीर।।''

सकाम आणि निष्काम भक्ती

आपण देवाची भक्ती करतो त्यावेळेला सकाम भक्तीत प्रेम असेलच असे नाही. निष्काम भक्तीत मात्र प्रेमाचा अंतर्भाव होऊ शकतो. पण विठुराया किंवा गणराया यांच्यावर मराठी माणूस जे प्रेम करतो, ते प्रेम "या सम हे' या जातीचे आहे. नीट विचार केला तर ध्यानात येईल, विठ्ठलाच्या दरबारात हजर होण्यासाठी जसे लाखो वारकरी तहानभूक विसरून दर आषाढीला पंढरपुरात गर्दी करतात, किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाखो गणेशभक्त गुलालाने आनंदात रंगतात आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत सामील होतात, तसा भाग्ययोग इतर देवतांच्या कुंडलीत क्वचितच आढळेल. श्रीविठ्ठल आणि श्रीगणेश ही महाराष्ट्राची लोकदैवते आहेत. या दोन्ही दैवतांवर मराठी माणूस मनापासून प्रेम करतो आणि तुकोबांनी तर विठ्ठल आणि गणपती हे वेगवेगळे नाहीत असे सांगणारा एक अभंगच लिहिला. विठ्ठलावर संतकवींनी ज्या विविध रचना केल्या, त्यात विठ्ठलाला नको ती संबोधनेही वापरली. त्याला प्रेमाने दुरुत्तरेही केली. त्याचे कौतुक किती केले याला तर सीमाच नाही. विठ्ठल हा संतांच्या प्रेमाचा विषय आहे आणि म्हणाल तर गणेश हासुद्धा गणेशभक्तांच्या प्रेमाचा विषय आहे.

मनोहारी श्रीगणेश

अगदी मनापासून ज्याच्यावर प्रेम करावे, असा गणपती हा देव आहे. तो चार हात, मोठे कान, वाकडी सोंड या रूपामुळे थोडा वेगळा वाटत असला तरी त्याचे ते रूपही मनोहर आहेच आणि आपला विठुराया तर असा आजकालच्या नजरेने "सुंदर' वाटावा असा कुठे आहे? पण भक्तांच्या नजरेला तो "मदनाचा पुतळा' वाटतो. तुकोबा त्याला "सुंदर ते ध्यान' म्हणतात. प्रेमाचाच हा प्रकार आहे. प्रेमाच्या नजरेने पाहिले तर विठ्ठल जसा सुंदर वाटतो, तसा गणपतीही सुंदर वाटतो. आणि आणखी एक गोष्ट. गणपती हा तुमच्या - आमच्यासारखाच सर्वसामान्यांच्या आवडीनिवडीत रमणारा, रंगणारा देव आहे. त्याला गोडधोड आवडते, तो आनंदात असला की नाचतो. नाचायला लागला की सगळे जग स्वतः विसरतो आणि इतरांनाही विसरायला लावतो. तो खोडकर आहे. वडिलांच्या डोक्यावरचा चंद्र लपवून तो त्यांचीही खोडी काढण्यास कमी करीत नाही. सर्वसाधारण मुलांसारखा तो आपल्या भावाशी भांडतो. भांडण सोडवण्यासाठी आईला साकडे घालतो. तो प्रेम करतो, लढतो. आपण आयुष्याच्या ज्या ज्या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो, त्या सर्व परिस्थितीतून कसे शिताफीने निभावून जावे याचे प्रात्यक्षिकच जणू त्याने आपल्या विविध अवतारांत दाखविले आहे.

सर्वांमध्ये रस असलेला देव

मानवी आयुष्यात ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आणि आवडीच्या वाटतात, त्या सर्व गोष्टींमध्ये रमणारा देव म्हणजे गणपती. गणपती हा गोडधोड खाणारा आहे. त्याला "लाडू मोदक अन्ने परिपूर्ण पात्रे' प्रसन्न करतात. तो मोजकेच का होईना, पण अंगावर दागिने घालतो. पण असे असले तरी तो सुखासीनतेत रमणारा देव नाही. वेळप्रसंग घडला तर तो हातातील शस्त्रांचा उपयोग करायला मागेपुढे पाहात नाही. तो देवांचा सेनापतीही आहे. असे सांगतात की, 21 शिपायांचा एक गट असे 21, पुन्हा या 21 गटांचा एक मोठा गट असे 21 मोठे गट अशा पद्धतीने गणपतीने आपले सैन्य उभारले आणि सैन्याच्या अशा स्वरुपाची रचना आजही केली जाते. गणपती सेनापती म्हणून इतका श्रेष्ठ आहे की तो रणांगणात कधीही हरलेला नाही. तो निरंतर अजेय आहे. बरे, असे असूनही तो केवळ लढणारा शिपाई गडी नाही. त्याला नृत्य, नाट्य, गायन अशा कलांमध्ये विशेष रस आहे. "गणराज रंगी नाचतो' असे आपण कौतुकाने म्हणतो. सिद्धि - बुद्धि अशा दोन पत्नी निरंतर त्याच्यासोबत असतात. वादविवादात, लढाईत जिंकायचेच अशा निष्ठेने तो वावरतो. आपण लढाईत कमी पडू अशी शंका आली तर कपटाचा डाव मांडण्यासही तो मागेपुढे पाहात नाही. गणेशाचे हे स्वरूप म्हणूनच आपल्याला विलोभनीय वाटते आणि त्यामुळेच गेली काही हजार वर्षे आपण मनोभावे त्याचे पूजन करीत आलो आहोत आणि त्याबरोबरच त्याच्यावर मनापासून प्रेमही करीत आलो आहोत.

रूप गणेशाचे...

अरुण दाभोलकर

दाभोली. तळकोकणातलं एक छोटंसं गाव. पानं, फुलं, डोंगर, दऱ्या, समुद्र आणि किनाऱ्यांन नटलेलं. चित्रकारानं काढलेल्या चित्रातल्यासारखं. मी इथंच जन्माला आलो. माझ्या घराभोवतीच्या नारळ - पोफळीच्या बागा, आंबा - काजूचे डोंगर, खानोली - वायंगणीचा समुद्र आणि त्याच्या फेसाळ लाटा... याच मातीत माझ्या चित्रकलेची बीजं रुजलीयत... या साऱ्याचा विचार करताना आठवणी दाटतात त्या आमच्या घरालगतच्या करंगुटकरांच्या कुटुंबाच्या. या कुटुंबातील सर्वच माणसं प्रतिभावंत चित्रकार. कारागीर. माझं चित्रकलेबद्दलचं आकर्षण, आवड, समज ही त्यांच्या गणपतीच्या शाळेशी, त्या सर्व माणसांशी निगडित आहे आणि आज सगळे ओळखतात ती "दाभोलकरी चित्रशैली' करंगुटकरांच्या मला लाभलेल्या सहवासाची देणगी आहे.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना माझ्या हाती एक नितांत सुंदर, स्वस्त, प्रवाही आणि तुटपुंज्या वेळात झटपट काम करता येणारं रंगमाध्यम मिळालं. कॅम्लीन वॉटरप्रुफ इंक बाजारात आली आणि मी त्यावर चक्क तुटून पडलो. हा काळ होता 1980 चा. ही रंगीत शाई काम करताना एवढ्या बेमालुमपणे एकमेकांत सामावून जाते की मूळ रंग, छटा आणि त्याचं अस्तित्व कायम राखूनही मनात असणारे, नसणारे, अगोदरच न ठरवलेले अनेक मूर्त आणि अमूर्त आकार सहजगत्या आपणहून साकारतात.
असाच एकदा रंगशाईशी खेळत होतो. रंग, कागद, ब"श यांची जुळवाजुळव करीत होतो. संकष्टचतुर्थीचा तो दिवस होता. म्हटलं - कागदावर आज एक गणपती काढावा म्हणून सुरुवात केली... आणि रंगांच्या त्या झटपट खेळातून, बेजबाबदार रंगभरणीतून डोळ्यांना सुखावणारा एक मंगल आकार तयार झाला. मी स्वतःच अवाक झालो! काहीही न ठरवता हा विलक्षण प्रतिभा असणारा आकृतीबंध कागदावर उमटलाच कसा, याच्या आश्र्चर्यातून सावरायला बराच वेळ लागला. त्यानंतर दिवसभरात पहिला गणपती, दुसरा, तिसरा असे गणपतीचे मूर्त - अमूर्त असे खूप आकार तयार झाले.
त्यापुढील आठ - दहा दिवस रंगांनी आणि त्यांच्या नेत्रदीपक दर्शनाने झपाटलो. कल्पनेत नसणारे, न ठरवलेले आणि तरीही गणपतीसारखेच भासणारे, मंगल आकार तयार झाले. आठ दिवसांनीही तंद्री उतरेना.
गेली 32 वर्षे माझ्या हातून हजारो गणपती आकाराला आले. मुळात गणपतीचा आशीर्वाद आणि लोकांचं प्रचंड प्रेम हेच मला "गणपतिवाले दाभोलकर' म्हणून नावरूप देणारे ठरले. काही वर्षांपूर्वी मी बेळगावला एका प्रदर्शनाच्या निमित्ताने गेलो होतो. त्या प्रदर्शनातील गणपतीची रूपं ही कर्नाटकी साज घेऊन अवतरली होती. काळ्या रंगातील गोलघुमट असे ते गणपती माझ्या मनात घर करून होते. मुळात गणपती हा गोलाईच्या रूपात तुम्हाला दिसत असतो, अशी माझी तरी धारणा आहे. डोके, छाती, पाय, हात हे सगळे भाग एका सुरवातीच्या काळात गोलाकार असतात.. आणि मी त्याला फिनिशिंग देतो इतकंच. तर काळ्या पाषाणात कोरल्यासारखे ते कर्नाटकी गणपती शिल्पाच्या रूपात मी आकारले आणि ते प्रचंड लोकप्रिय झाले. 20 वर्षांपूर्वी या काळ्या पाषाणी गणपतीच्या गि"टिंग कार्डस्ना महाराष्ट्रातच नव्हे, अवघ्या भारतात प्रचंड लोकप्रियता मिळाली.
पंढरपुरला तर माझं बऱ्याच वेळा जाणं झालंय. पांडुरंगाच्या त्या मूर्तीसमोर गेलं की भान हरपायला होतं. तहानभूक विसरून विठोबाच्या ओढीने लाखो वारकरी पंढरीला का धाव घेतात, हे त्या मूर्तीसमोर नतमस्तक झाल्यानंतरच लक्षात येते. हाच अनुभव पांडुरंग गजाननाच्या रूपात साकारताना मला आला. विटेवर उभा असलेला आणि दोन्ही हात कमरेवर ठेवलेल्या या गणरायाच्या मागील लाल, पिवळा, निळा असे असं"य रंग गाभाऱ्याचा भास निर्माण करतात. हे चित्र आता डिजिलट प्रिंटिंगच्या अत्याधुनिक तंत्राने मोठ्या आकारात आणता आल्यामुळे त्याला एक वेगळाच टच निर्माण झालाय. सध्या या चित्राला खूपच मागणी आहे. अलीकडच्या काळातहा हा माझा सर्वांत लोकप्रिय गणपती.
माझ्या हातून उतरलेल्या अशाच आणखी एका गणेशाच्या आकाराने खूप समाधान मिळवून दिलं ते म्हणजे संपूर्ण लाल रंगातील नृत्य करणारा गणपती. रंग आणि नृत्य यांचा तो अफलातून मिलाफ होता. हे चित्र काढून आता बरीच वर्षं झालीत. तरी आजही त्याच्याकडे मी पाहतो, तेव्हा तो मला नुकताच काढल्यासारखा वाटतो...
ठरवल्याप्रमाणे मला कधीच कुठलं चित्र काढता आलेलं नाही. गणपतीचं तर नाहीच नाही. मुंबईहून दाभोली गावी परत गेल्यानंतर चित्रकार व्हायचं हे मात्र मनात होतं. चित्रकलेसाठी सतत भ"मंती झाली. यावेळी वेगवेगळ्या प्रांतांतील गणपतींचा जो आकार माझ्या मनात रुजला, तोच माझ्या ब"शमधून कॅनव्हासवर उतरला. त्यासाठी मला विशेष असं काही करावं लागलं असं मुळीच वाटत नाही.

गोंयची चवथ

डॉ. सुभाष भेण्डे

चवथ जवळ आली की गोंयकारांची झोप उडते. यावर्षी चवथ कशी साजरी करायची याचे बेत आखले जातात. मुंबईला व्यापार उदीमात रमलेले, नोकऱ्या सांभाळणारे गोंयकार दोन दोन महिने आधी बसून गाड्यांचे आरक्षण करू लागतात. यावर्षी कोण जाणार आणि कोण राहणार याविषयी कडाक्याची चर्चा होते आणि अखेरीस "सर्वांनीच जायचं!' असा नामी तोडगा काढला जातो. मुंबईहून काय काय आणायला हवं याची पुन्हा पुन्हा विचारणा केली जाते आणि हळुहळू मुंबईहून आणायच्या सामानाची यादी वाढत जाते. अगदी शेवटच्या घटकेलासुद्धा चार दोन पदार्थांची त्यात भर पडते.
पोटभर पाणी पिऊन शेतं तृप्त झालेली असतात. भाताची रोपं हातभर वर सरकलेली असतात. श्रावणातले उदंड सण उत्साहात साजरे होतात. श्रावणी रविवारी फुलांच्या झाडावरली पत्री गोळा करून सूर्यपूजा केली जाते. मग रात्री उपवास. श्रावणी सोमवाराचं महात्म्यही तसंच. दुपारी गोडधोड, रात्री उपवास. नव्या युगातल्या सुना सुधारलेल्या. तरीपण जुन्या रूढींविषयी जिव्हाळा बाळगणाऱ्या. श्रावणात अळम्याचं तोणाक खायला मिळणार म्हणून घरात लहानथोर आतुरलेली.
हां हा म्हणता श्रावण सरतो. चवथ येऊन ठेपते. आगरातली कामं थोपवून धरली जातात. श्रीगजाननाच्या आगमनासाठी स्वागताची जय्यत तयारी सुरू होते. चार दिवस खपून सोनेरी वर्खाचं सुबक मखर तयार केलं जातं. मखरामागे मोठा आरसा. मखराच्या पुढल्या भागाला कमळाची, मोराची चित्रं डकवलेली. (चित्रविचित्र चित्रं डकवण्याचं काम अपार उत्साहात चालूच असतं. उत्तरपूजा होऊन श्रीची मूर्ती विसर्जित करण्याची वेळ आली तरी घरातला छोटा बाबुश "राव रे पाच मिन्टां.. हे हत्तीचे चित्र लायता' अशी विनवणी करत असतोच!) पडवीवर श्रीच्या बैठकीची व्यवस्था होते. मग छताला चांगली लांबरूंद माटोळी बांधायची. असोला नारळ, सुपारीचे पिवळे बेडे, पपनस, तवशी, केळीचे घड माटोळीला गच्च लटकतात. घरातल्या बायका तांब्या - पितळेची भांडी चिंचेनं ल"ख घासून पुसून चकचकीत करतात. चंदनाचं गंध उगाळायची सहाण धुवून ठेवतात. तांब्याचा पडगा केंद्रस्थानी ठेवला जातो. कामं करून थकल्यावर बसल्याबसल्या कापसाच्या वाती वळायच्या. समयांची स्थापना होते. दोन दिवस वाती अखंड पेटायला हव्यात. त्यासाठी भरपूर तेलाची पूर्वतयारी.
मग अन्नासाठी दाहीदिशा फिरणारी सोयरे मंडळी तृतियेला दिवसभर, चवथीच्या पहाटे हळुहळू थडकू लागतात. त्यांचं चहापाणी, फराळ, भोजन आटोपता आटोपता मध्यरात्र होते. प्रवासानं थकलेली मंडळी गप्पा मारत झोपेच्या आधीन होतात तोच फटाक्यांच्या धाड्धाड आवाजानं दचकून जागी होतात. चवथीच्या दोन दिवसांत झोपेचं कसलं कौतुक? उरलेले तीनशे त्रेसष्ट दिवस झोपायचं आहेच की!
पहाटे मुलं मुली आगरातली, बागेतली फुलं वेचून आणतात. फुलांची मखराभोवतीची आरास रंगीबेरंगी दिव्यांच्या आराशीहून अधिक शोभिवंत दिसते. बाहेरून आलेले सोयरे-धायरे श्रींच्या सेवेत आपलाही सहभाग या भावनेने कुठे मखरावर चित्र चिकटव, कुठे माटोळीला फळं बांध, मुंबईहून आणलेल्या फटाक्यांची सामग"ी मुलांच्या हवाली कर, यात मग्न होतात. बायका मंडळी भाज्या चिरून ठेवणं, सोलकढीसाठी नारळाचा रस काढणं, नारळ खवणं अशी कामं करताना भूतकालीन चवथीच्या गमतीजमती एकमेकींना सांगण्यात रंगून जातात.
मग अनादी गणपती स्वामी वाजत गाजत येतो. त्याची मूर्ती घरातला कर्ता पुरूष पाटावर बसवून सावधपणे घेऊन येतो. पोरंटोरं भोवती गर्दी करतात. फोगोट्या वाजू लागतात. श्रीगजानन आसनाला टेकून येत्या जात्याला हात उंचावून आशीर्वाद देतो. घरातलं वातावरण एकाएकी मंगलमय होऊन जातं. धुपाचा, उदबत्त्यांचा सुगंध चौफेर दरवळू लागतो.
मग पूजेसाठी भटजीबुवांचा शोध सुरू होतो. भटाला कितीतरी दिवस आगाऊ नोटीस दिलेली असते. पण मागणी प्रचंड. भटांची सं"या मर्यादित. "भट त्या वाड्यार पावला. आत्ता शिरवैंकरांकडे आयलां, हेगडे देसायांकडले लोक ताची वाट पळैतात' अशा "ब"ेकिंग न्यूज' स्वयंभू वार्ताहर अधूनमधून आणत असतात. एरवी भटाला कोणी विचारत नाही. पोटापाण्यासाठी बिचारा अन्य कामं करत असतो. चवथीच्या काळात त्याला प्रचंड भाव! धावीस बिऱ्हाडं त्याची चातकासारखी वाट पाहात असतात. इतक्या घरांतील मंगलमूर्तींची पूजा करून त्याच्या तोंडाला फेस येतो. थकवा येतो. श्रीगजानन सगळं काही निभावून नेतो.
एकदा पूजा पार पडली की भोजनासाठी पानं पडतात. डायनिंग टेबलवर बसायची सवय झालेली मुंबईची व्ही.आय.पी. मंडळी कशीबशी मांडी घालून जमिनीवर बसतात आणि शिवराक जेवणाचा जमेल तसा व जमेल तितका आस्वाद घेऊ लागतात. मुगाच्या गाठी, पातोळ्या, खतखते, आंबाड्याची उडदमेथी, नीरफणसाची कापा ऊर्फ फोडी, तांदळाचा पायस, जिरं घातलेलं वरण असा नामी बेत असतो. एकमेकांना आग"ह करून समस्त जन "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' मोठ्या उत्साहाने व ताकदीने तडीस नेतात. जेवण उरकेपर्यंत अडीच तीन वाजतात. त्यानंतर बायकांची पानं. बायका जेवून उठेपर्यंत पुरुष मंडळी डाराडूर झोपलेली.
संध्याकाळी पुरुषमंडळी पाच घरी जाऊन गणेशमूर्तींचं दर्शन घेतात. त्यासाठी कुणी निमंत्रणाची वाट नाही पाहात. उघड्या दरवाजातून आत शिरायचं, नमस्कार करायचा आणि प्रसाद घेऊन पुढचं घर गाठायचं. कुणी भेटलं तर थोडावेळ गजाली, मुंबईला गर्दी कशी वाढते आहे, महागाई कशी गगनाना भिडते आहे. मॉलचं न मल्टीप्लेक्सचं प्रस्थ कसं पसरतंय याच्या वार्ता गोंयकारांना देऊन पुढे सटकायचं. तोंडओळख असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या "कसो आसा?' प्रश्नाला "घट!' असं उत्तर देऊन मोकळं व्हायचं. स्वतःच्या घरी गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्यांसाठी वृद्ध पिढी उपस्थित असतेच. रात्री परतताना चंद्र दिसणार नाही याची खास काळजी घ्यायची असते. चुकून चंद्राचं दर्शन झालं तर चोरीचा आळ येऊ नये म्हणून शेजाऱ्यापाजाऱ्याच्या कौलावर दगड फेकायचे. घरातून शिव्यांचा आवाज आल्यावर चोरीचा आळ टळला म्हणून समाधानानं परतायचं. (अलीकडे ही भाबडी मंडळी फारशी दिसत नाहीत!)
रात्रीचे दोन प्रहर उलटले की आरत्यांचा धडाका. मग हार्मोनियमवरची धूळ झाडायची. कुणा शेजाऱ्याचा पखवाज, तर कुणाचा तबला. "सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची', "लवथवती विक"ाळा' यासार"या मराठी आरत्यांबरोबरच "शेंदुर लाल चढायो' ही रुचीपालट म्हणून राष्ट्रभाषेतली आरती दणक्यात म्हटली जाते. रात्री पुरुष मंडळींना उपवास. थोडंसं काही तोंडात टाकून भजनाची बैठक सुरू होते. आसपासची मंडळी गोळा होतात. खड्या आवाजातल्या गायकांना प्रचंड मागणी. तुकाराम, एकनाथांपासून सोहिरोबानाथांच्या रसाळ भजनांपर्यंत निवडक भजनांची उजळणी होते. पोरंटोरं भजनांवर ताल धरतात. बायका मागं बसून भजनांचा मनमुराद आस्वाद घेतात.
भजन संपतं तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली असते. झांजा वाजत राहतात. फटाक्यांचे आवाज शांत वातावरणात घुमू लागतात. निजलेली पाखरं त्या आवाजानं पंख फडफडवित उठतात आणि डोळे मिटून अंधारात झेप घेतात. भजन करून थकलेल्या मंडळींना केळीच्या पानावर पंचखाद्य दिली जाते. जिभेवर ठेवली की विरघळणारी ती चविष्ट पंचखाद्य कितीही खा"ी तरी आणखी खावीशी वाटते. भाजलेल्या मुगाचे कण हाताखाली आले की पोटात कसं "गोविंद गोविंद' होतं. प्रसाद अपुरा पडतो. मग पपनसं कापावी लागतात. तवशी चिरणं भाग पडतं. पिकलेल्या केळ्यांचे घड शोधून काढावे लागतात.
दुसरे दिवशी संध्याकाळी श्रींची उत्तरपूजा होईपर्यंत घरात नुसता हैदौस चालू असतो. "शित रोस' हा दुपारच्या जेवणातला महत्त्वाचा पदार्थ. शिवराक जेवणातला सर्वांत "एक्सायटिंग' पदार्थ म्हणजे भजी. बटाट्याची, वांग्याची, मिरचीची. केवढाही ढीग पडो, तात्काळ त्याचा फन्ना. गृहिणी कपाळावरचा घाम पुशीत घाण्यावर घाणा काढत असतात. हास्यविनोदाला ऊत येतो. गेल्या अनेक चवथींच्या आठवणी निघतात. "त्यावेळची मजा आता नाही उरली' अशी नेहमीची तक"ार करता करता ताव मारणं सुरूच असतं.
उत्तरपूजा सुरू असतानाच मागीलदारातून मासळीची आयात होत असते, असा गोंयकारांविषयी प्रवाद आहे. तो कितपत खरा आहे याची कल्पना नाही. गोंयकारांचं मत्स्यावताराविषयीचं आकर्षण अधोरेखित करण्यासाठी तसा आरोप केला जात असावा.
उत्तरपूजा झाली की विसर्जनाची तयारी सुरू होते. संधीप्रकाशात मंगलमूर्तींची मिरवणूक वाजतगाजत खाजणाच्या दिशेने जाऊ लागते. पाऊस नसेल गॅसबत्त्या बाहेर काढल्या जातात. पोरंटोरं उरलेसुरले फटाके बाहेर काढतात. पुढल्या वर्षी लवकर येण्याची विनंती करून गजाननाला जड अंतःकरणाने निरोप दिला जातो.
मंडळी परततात. कुणीच फारसं बोलत नाही. मनं उदास झालेली. काहीतरी महत्त्वाचं हरपल्याची भावना. गजाली सरतात. काहीच नकोसं वाटतं. लवकर निजानिज होते. सगळीकडे शांत शांत होतं.
पुढचा दिवस उजाडतो. मुंबईला, गोव्यातल्या गोव्यात चाकरीच्या गावी जायचे वेध लागतात. बांधाबांध सुरू होते. मात्र, बाजारात आलेल्या बांगुडल्यांचं त्रिफळाचं सुकं दुपारी पानात पडलंच पाहिजे असा पुरुषमंडळींचा कटाक्ष असतो. जमलं तर विस्वणाची पॉस्ता! दबलेल्या आवाजात गप्पा सुरू होतात. निरोपाची बोलणी, पुढल्या वर्षी तीन चार दिवस आधीच येण्याचं अभिवचन.
संध्याकाळी पाखरं आपापल्या घरट्याकडे उडून जातात. मखरापुढची रोषणाई सुन्न होते. कोपऱ्याकोपऱ्यात शुकशुकाट पसरतो. "चवथ बरेबशेन जाली' म्हणत मंडळी आपापल्या कामाला लागतात...

लोकजीवनातील श्रीगणेश

पु. शि. नार्वेकर

श्रीगणेशाला गोव्याच्या लोकजीवनात जितके महत्त्व आहे तितके अन्य कोणत्याही देवतेला नाही, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. गणपती हा सर्व आबालवृद्धांचा आवडता देव. गणेशचतुर्थी जवळ येताच विशेषतः मुलांमध्ये एक नवचैतन्य संचारते. गणेशचतुर्थीच्या निमित्ताने शाळेला आठ - दहा दिवसांची सुटी असते. गणपती यायला अजून चार दिवस बाकी असले तरी ही मुले फटाके उडविण्यात दंग असतात. फटाक्यांची माळ एकदम लावायची नाही. ती सुटी करायची आणि फटाके खिशात भरून ठेवायचे. हातात एक पेटलेली उदबत्ती. तिला सुट्या फटाक्याची वात लावायची. सुर्रर्र आवाज झाला की ती फटाकी वर उडवायची. ठोऽऽ असा आवाज झाला की बालमंडळी खूष! कधीकधी फटाका हातातच फुटायचा व हात भाजायचा. पण त्याची फारशी चिंता नाही. भाजलेल्या हाताला तेल लावून स्वारी पुन्हा फटाके उडवण्यात दंग. आई ओरडायची, पण तिकडे लक्ष द्यायचे नाही. हा मुलांतील उत्साह पाहिला की वाटते, चतुर्थी हा खरोखरच मुलांचा सण.
देशात अनेक राज्ये आहेत. तेथील लोकजीवनात वेगवेगळ्या सणांना महत्त्व आहे. गणपती सगळीकडे आहे, पण त्याची फारशी अपूर्वाई नाही. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, त्यामुळे घरात पुजल्या जाणाऱ्या गणपतीला फार महत्त्व नाही. बंगालमध्ये दुर्गापूजा महत्त्वाची. महाराष्ट्रात दिवाळीचा सण मोठा. गोव्यातही दिवाळीचा सण साजरा होतोच. अलीकडच्या काळात तर नरकासुराने गावोगावी थैमान मांडले आहे, पण जुन्या काळात हे प्रकार फारसे नव्हते. गोव्यात बहुतेक सण साजरे होतात. पण गणेशचतुर्थीचे महत्त्व त्यांना नाही. शहर असो वा खेडेगाव, तेथील घराघरांतून गणपती मोठ्या भक्तिभावाने पुजला जातो. त्याची पूजा करण्यात, भजन करण्यात, आरत्या म्हणण्यात सारा गाव दंग असतो. शहरांपेक्षा खेडेगावांत गणपतीचा बडेजाव मोठा. आज खेडेगाव पूर्वीसारखा एकमेकांपासून तुटलेला राहिलेला नाही. सगळीकडे पक्के रस्ते झालेले आहेत. त्यावरून बसेस धावताहेत. लोकांचा शहरांशी संपर्क मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जुन्या काळी तो फारसा नव्हता. त्यामुळे खेडेगावांतील लोकांचा गावातील लोकांशीच संपर्क जास्त असायचा. दिवाळीच्या दिवशी तर आपापल्या वाड्यावरील लोकांकडे पोहे खाण्यासाठी जाण्याची प्रथा खेडेगावात होती. आज ती फारशी उरलेली नाही. शहरे महानगरे बनत आहेत, तर खेडेगावातील खेडेपण लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
गोवामुक्तीपूर्व काळात खेडेगाव पूर्णतः मागासलेले होते. अनेक गावांत धड प्राथमिक शाळाही नसायची. एखाद्या खोपटीवजा जागेत एकदोन चहाची हॉटेले दिसायची. गावात भुसारी किरणामालाचे एखादे दुकान असायचे. बहुतेक लोक शेती - व्यवसायात गुंतलेले असायचे. शेती पावसावर अवलंबून असल्याने शेतीउत्पादनही तुटपुंजे असायचे. त्यामुळे गावात गरीबी दिसायची. मजुरीची कामे करू इच्छिणारे लोक पुष्कळ असायचे, पण काम मिळत नव्हते. त्यामुळे लोकांच्या हाती पैसा नसायचा. चतुर्थी जवळ आली की त्यांच्या पोटात धाकधूक सुरू व्हायची. कसा साजरा करणार चतुर्थीचा सण, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहायचा. पण अशावेळी गावात असलेले भुसारी दुकानदार त्यांचा प्रश्न सोडवायचे. चतुर्थीच्या सणासाठी हवे असलेले धान्य, कडधान्य, गूळ, तेल इत्यादी जिन्नस त्यांना उधार द्यायचे. अट एकच - महिन्याभरात त्याने उधारी फेडायची. तोवर शेते पिकून पिवळी व्हायची. गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचमीला शेतातील पिवळट झालेली भाताची कणसे आणून दाराला बांधायची प्रथा आजही खेडेगावात आहे.
जुन्या काळातील खेडेगावातील घरे म्हणजे मातीच्या भिंती व कौलारू छप्परे. आमचे गाव तर फारच मागासलेले. बहुतेक घरांच्या भिंती "कारवां' नामक जंगली काठ्यांच्या. त्यावर मातीचा गिलावा. छप्पर गवताचे व माडाच्या चुडतांचे. घर कसेही का असेना, चतुर्थीच्या दिवशी गणपती येणारच. श्रीगणेश हा असा एक देव आहे की त्याच्याजवळ गरीब-श्रीमंत असा भेदभाव नाही. जातीपातीचाही भेदभाव नाही. हा सर्वांचाच देव. सर्वांना सुख देणारा व दुःख हरण करणारा. त्याचा अभय देणारा वरदहस्त पाहिल्यावर संसारतापाने पिडलेल्या लोकांना केवढा तरी दिलासा मिळायचा.
झोपडीचे प्रवेशद्वार तर इतके बुटके की बुटक्या इसमालाही वाकूनच आत प्रवेश करावा लागायचा. आत पाहिले तर एका मेजावर गणराया आरामात लोडाला किंवा सिंह, मोर, हंस यांना टेकून बसलेला. पिवळा-लाल पीतांबर, खांद्यावर हिरवा-गुलाबी शेला, डोक्यावर सोन्याचा मुकुट, गळ्यात सोन्याचा रत्नजडित हार, हातात-दंडात सोन्याचे अलंकार. असा हा गजानन प्रसन्नपणे भक्तांकडे पाहताना भासायचा. डाव्या हातात बहुधा मोदक असायचा किंवा आणखी काही. पण उजवा हात मात्र वरदहस्त. काही गणपती वेगवेगळी रूपे धारण करणारे. पण कितीही वेषांतर केले तरी भक्त त्याला ओळखतातच. कारण बालपणापासूनच त्यांचा तो सवंगडी!
आज गोव्यातील खेडेगावांतसुद्धा वीज पोचली आहे. चतुर्थीच्या सणात तर घरात विजेचा लखलखाट असतो. दरवाजात गणपतीच्या मागेपुढे, मखरावर विजेच्या रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांची रोषणाई केली जाते. गणपतीच्या डाव्या-उजव्या बाजूला पितळी समया तेवत असतात. विजेच्या झगमगाटात त्यांचा उजेड किती पडणार? पण जुन्या काळी खेडेगावात वीज नसायची. त्या समयांच्या प्रकाशातच गणरायाच्या मुखावरचे तेज झळकायचे. त्या बालपणीच्या काळात आम्ही मित्र गावातील प्रत्येक घरात जाऊन गणपतीचे दर्शन घेत असू. गावाची विभागणी तीन भागांत झाली होती. नदीवर पोर्तुगीजकालीन पूल होता. त्याच्या पलीकडेही काही वाडे होते, पण ते दूर असल्याने आम्ही तेथील गणपती पाहण्यासाठी जात नव्हतो. आमचा वाडा मध्यभागी होता. दक्षिणेकडे रेल्वे स्टेशन होते. त्याच्या पलीकडे काही घरे होती. बहुतेक रेल्वेत काम करणाऱ्या लोकांची. इतरही काही लोकांची होती. आज बहुतेक घरे पक्क्या बांधकामाची झालेली आहेत. पण जुन्या काळी त्या गवती छप्पराच्या झोपड्या होत्या. आम्ही मुले त्या काळी या सगळ्या घरांतील गणपती पाहायचो.
आजही पंचमीच्या दिवशी लहानमोठे सर्वजण गणपती पाहण्यासाठी जातात. उघडीप असली तर एखादेवेळी पाऊसही हजेरी लावतो. त्यावेळी लोक गणपतीदर्शनाला फारसे जात नाहीत. तरीसुद्धा पाच गणपती पाहायला हवेत अशी लोकांची श्रद्धा दिसते.
चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका व"त असते. "तृतीया' या शब्दाचा अपभ"ंश होऊन "तय' शब्द झाला. या दिवशी बायका उपवास करतात. पूर्वी हिमालयकन्या पार्वतीने भगवान श्रीशंकरच आपल्याला पती मिळावा म्हणून तप केला होता, ते हे व"त. सर्वच बायका त्या दिवशी उपवास करतात, पण सगळ्याच घरांत ही "तय' पुजली जात नाही. काही घरांत "देवी' पुजली जाते. हेसुद्धा पार्वतीचेच एक रूप. पण ती आता "गौरी' राहिलेली नसून "दुर्गा' झालेली आहे. महिषासुरमर्दिनी हे तिचे उग" रूप असते. तिच्या या रूपाला बालगणेश भितो म्हणून हे व"त पंचमीच्या रात्री गणपती पोचविल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे षष्ठीला येते. क्वचित ती तिथी तिसऱ्या दिवशी येते. काही घरांत गणपती राहिलेला असतो. आता थोडा वयाने मोठा झालेला असला तरी तो बालगणेशच असतो. ही देवी म्हणजे, घरातील सौभाग्यवतीने विहिरीवर जाऊन (आता नळावर) पाण्याने भरून आणलेला कलश. त्यात एका विशिष्ट जातीच्या झुडपाची फांदी. काही घरांत त्या देवीला मुखवटे घालतात. कलश आणताना त्या स्त्रीच्या तोंडात पाणी असते. पुढे घरातीलच एखादी मुलगी चुना घातलेले पाण्याचे भांडे घेऊन चालत असते. ती ज्याप्रमाणे जमिनीवर ते पाणी टाकीत असते त्याच ठिकाणी त्या स्त्रीने पाऊल ठेवायचे असते. अशा प्रकारे मिरवणुकीने "देवी' पुढील दाराने घरात प्रवेश करते.
गणपती आदल्या रात्री आपल्या गावी गेलेला असला तर प्रश्नच नाही, पण तो राहिलेला असला तर काय करायचे? अशावेळी गणपती आणि ती येणारी देवी यांच्यामध्ये पडदा धरून तिला आत आणायचे. गणपती गेलेला असला तर त्याच्या आसनावरच देवीला ठेवायचे, अन्यथा आत देवघरात. हे व"त तीन दिवसांचे असते. गौरीआवाहन, पूजन आणि विसर्जन. हे व"त स्त्रियांचे असल्याने त्यांनीच पूजाविधी करायचा असतो. पण सगळ्याच कुटुंबांत हे व"त नसते. विशेषतः ज्या घरात हरितालिका पुजतात त्या घरी हे नसते.
वास्तविक पाहता चतुर्थीच्या दिवशी गणपतीबरोबरच शंकर-पार्वतीची स्थापना त्याच्या उजव्या बाजूला झालेली असते. फुलझाडांच्या डहाळ्या असलेल्या जुडीभोवती गौरीचे चित्र असलेला कागद गुंडाळून तिच्या गळ्यात मंगळसूत्राचे काळे मणी असलेली दोरी बांधली जाते. गणपतीबरोबर शिव-पार्वतीचीही यथासांग पूजा केली जाते. चतुर्थीच्या दिवशी गणेश बालक असतो. म्हणून एकाच पानावर मातापुत्राला नैवेद्य असतो. तत्पूर्वी गणेश हा मोदकप्रिय असल्याने त्याला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. गणपतीचे वाहन उंदीर. त्याच्यासाठीही वेगळे पान असते.
गणेशाला सर्वजण बालरुपातच पाहतात. घरातील लहान मुलांवर करावे तसे त्याच्यावर प्रेम करतात. अन्य देवतांच्या मूर्तींचे दर्शन घेताना जशी भयमिश्रित श्रद्धा वाटते तशी चतुर्थीच्या गणपतीविषयी वाटत नाही. हा तर कुटुंबातील सर्वात धाकटा मुलगा. सर्वांचाच लाडका. तो मग लंगोटी लावलेला बालरूपातील असो किंवा लालपिवळा पीतांबर नेसून सिंहासनावर बसलेला प्रौढ गणपती असो, सर्वजण त्याच्याकडे लहान मुलाकडे पाहावे तसे कौतुकाने पाहतात. गणपतीचे हे स्थान शिवविष्णूलाही दुर्मीळ. याबाबतीत त्याच्याशी तुलना करायचीच तर यशोदेच्या मांडीवर बसलेल्या किंवा तिची नजर चुकवून देवाच्या नैवेद्यासाठी बनविलेले लाडू देवाला दाखविण्यापूर्वीच खाणाऱ्या नंदकिशोराशीच करता येईल.
श्रीगणेशाचे आगमन होणार म्हणून घरात केवढा उत्साह, केवढी गडबड. पुरुषमंडळी सजावटीच्या कामात दंग, तर स्त्रीवर्ग करंज्या, मोदक बनविण्याच्या कामात गढलेला. मुलांना उद्योग फटाके उडवण्याचा तर मुली दिवस उजाडण्याआधीच परसबागेत किंवा जेथून मिळतील तिथून पत्री आणण्यासाठी गेलेल्या. जाई, जुई, मोगरा, चमेली, शेरवड, कर्णा, जास्वंदी किती विविध प्रकारच्या फुलझाडांची पत्री. फुलेही किती विविध प्रकारची. त्यातील लाल जास्वंदीचे फूल तर गणरायाला अधिक प्रिय. पत्री आणि फुले खुडून आणण्याची जबाबदारी लहान मुलींची. सोबत दूर्वाही हव्यात. कारण गणेश दूर्वाप्रिय.
इतक्यात गणरायाचे आगमन होते. घरातील सौभाग्यवतीने दारात पाट मांडून ठेवलेला असतो. त्याच्याभोवती घाईघाईने रांगोळी काढलेली. बाजूस समई ठेवलेली. गणपती दारात येताच गृहिणी मूर्ती आणणाऱ्या इसमाच्या पायावर आधी तांब्यातील पाणी ओतते. (अर्थात ते गणेशाचेच पादप्रक्षालन.) नंतर त्या मूर्तीभोवती उदबत्ती ओवाळून त्याचे स्वागत करते. मूर्ती पाटावर ठेवली जाते.
घरातील मुले, मुली, स्त्रिया सगळी मूर्तीभोवती गोळा होतात. कसा असेल गणराया? सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते. वरचे कागदी आच्छादन काढले जाते. "वा! सुंदरच मूर्ती आहे!' मूर्ती कशीही असली तरी घरातील स्त्रिया हेच उद्गार काढतात.
स्वागताचा हा औपचारिक विधी पार पडल्यानंतर स्नान वगैरे करून शुचिर्भूत झालेला घरातील ज्येष्ठ पुरुष मूर्ती मेजावरील चौपाईवर ठेवतो. तेथे मखर वगैरे आधीच तयार असते. गणपतीमहाराज आसनस्थ होतात. त्यानंतर पूजन, आरती, नैवेद्य इत्यादी.
कुठल्याही गावातील कुठलेही घर असो, गणपतीची आरती "सुखकर्ता दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची' याच पारंपरिक आरतीने सुरुवात होते आणि समाप्ती "घालीन लोटांगण वंदीन चरण' या कर्पुर्रातीने होते.
चतुर्थी आणि पंचमीच्या दिवशी घराघरांतून भजन-आरत्यांचे कार्यक"म चालूच असतात. गावात एखादे भजनी मंडळ बहुधा असतेच. त्याचे गट पाडले जातात. कुणी कुणाच्या घरी आरत्या करायच्या ते ठरविले जाते. "सुखकर्ता' ही आरती व "घालीन लोटांगण' कटाक्षाने म्हटले जाते. त्यापेक्षा जास्त काही म्हणणे मंडळाला शक्यच नसते, कारण वेळ थोेडा, घरे जास्त. मु"य भजनाचा कार्यक"म मग पंचमीच्या मध्यरात्री जेव्हा सगळे गावातील गणपती चौकात येऊन रांगेने बसतात तेव्हा साग"संगीत होतो. अर्थात पर्जन्यराजाने सौजन्य दाखविले तरच.
फुगड्या हा स्त्रियांचा खास कलाप्रकार. पूर्वी खेडेगावातील गणपतीसमोर फुगडी ही असायचीच. वाड्यावरील महिलावर्ग प्रत्येक घरात जाऊन एकदोन तरी फुगड्या घालायचा. पण जुन्या काळातील स्त्रियांना जशी फुगड्यांची हौस होती, तशी ती आता शाळा-कॉलेजात जाणाऱ्या मुलींमध्ये दिसत नाही. त्यामुळे एकूणच फुगडी हा कलाप्रकार आता स्पर्धात्मक कार्यक"मांपुरताच उदाहरण बनून राहिला आहे.
काही गावांतून पूर्वापार एक प्रथा चालत आलेली असून ती अजूनही टिकून राहिलेली दिसते. एका वर्षी दीड दिवसाचा गणपती तर त्या पुढच्या वर्षी पाच दिवसांचा. हा नियम सगळ्या गावासाठी, किमान वाड्यांसाठी तरी असतो. इतरत्र दीड दिवसाचा नियमित व स्वेच्छेनुसार किंवा नवसपूर्ती म्हणून पाच, सात, नऊ दिवसांचा गणपती ठेवला जातो. काहीजण गणपती ठेवला तर चौथ्या- पाचव्या दिवशी सत्यनारायण पूजा करतात. पण तसा नियम नाही.
श्रीगणेशचतुर्थीसंबंधात लिहिताना त्या बनविणाऱ्या मूर्तिकारांचा आवर्जून उ"ेख केला पाहिजे. हा केवळ धंदा नसून ते परंपरेने चालत आलेले एक व"त आहे असे ते मानतात. गोव्याची लोकसं"या खूप वाढलेली आहे. तुलनेने गणपतींची सं"याही वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी गोव्याबाहेरून प्लास्टर ऑफ पॅरिसचे आणि मातीचेही गणपती आणले जातात.
जुन्या काळी एकत्र कुटुंबपद्धती होती. नोकरीव्यवसायाच्या निमित्ताने अनेकजण शहरी जात. तिथेच स्थायिक होत. पण चतुर्थीला ते सहकुटुंब मूळ घरात येत. आज परिस्थिती बदललेली आहे. एकाच गावात दोन स""या भावांची दोन वेगळी घरे असली तर गणपतीही दोन असतात. कुणी गावात नवीन घर बांधले की चतुर्थीच्या पहाटे त्याच्या दारात गणपतीची मूर्ती ठेवणारे उत्साहीही असतात.
पंचमीच्या रात्री उत्तरपूजा झाल्यानंतर श्रीगणेश आपल्या जावी जाण्यास निघतो. गावात नदी किंवा ओढा त्यांचे विसर्जनस्थळ असते. पूर्वी पुरुषमंडळीच फक्त गणपती पोचवायला जात. आज घरातील बायकामुलेही उत्साहाने जातात. फटाक्यांचा कडकडाट चालू असतो. टाळमृदंगासह भजनीमंडळ आघाडीवर असते. कधीकधी या मिरवणुकीत सामील होण्यासाठी वरुणदेवही आपल्या सैन्यासह येतो. लोकांचा गजर चालू असतो- "गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...'

आमचा गणेशोत्सव

डॉ. विठ्ठल ठाकूर
एके दिवशी मी महाराष्ट्रात गणेशचतुर्थीच्या दरम्यान पोचलो होतो. कोणीतरी म्हणाले, "चतुर्थीला इथेच राहा. नाही तरी गोव्यात चतुर्थी असतेच कुठे?'.
मला हसूच आलं. महाराष्ट्रासंबंधी जसे गोव्यात गैरसमज आहेत तसेच किंवा त्यापेक्षाही जास्त गोव्याबद्दल महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी भाषा ही शुद्ध असते, हा त्यापैकी एक. मराठी भाषा तेथे वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. तेथील लोकप्रतिनिधीसुध्दा भाषणात "आनी', "पानी' शब्द वापरतात, तेव्हा ते गोड वाटतात. त्यांना भाषेबद्दल न्यूनगंड नसतो. गोवेकर मात्र मराठी भाषा बोलताना न्यूनगंड बाळगतात किंवा तो जाणीवपूर्वक रुजवला असावा. गोव्यात ख्रिश्चन लोक बहुसं"येने आहेत, कोकणी भाषेचाच उपयोग केला जातो आदी गैरसमजांबरोबरच आमच्या चतुर्थी उत्सवाबद्दलही महाराष्ट्रात गैरसमज आहे. गोव्यातील चतुर्थी म्हणजे काय? तेथील लोकांना पटवून देणं तसं कठीणच!
पोर्तुगिजकालीन चतुर्थी कशी होती मला माहीत नाही, पण माझ्या आठवणीतील चतुर्थी मात्र नि:संशय "आठवणीतीलच' आहे. आठवणीतच राहणारी आहे. गोंयकारांना चतुर्थी "चढत' असते. महाराष्ट्रात चतुर्थी प्रामु"याने सार्वजनिक. गोव्यात ती वैयक्तिक! वैयक्तिक म्हणजे स्वतःच्या घरापुरती असा अर्थ नाही घ्यायचा. गणपती येतोच मुळी पाहुण्यासारखा आणि राहतो घरच्यासारखा. इथं तो सर्वांच्या सुख दुःखांचा साक्षीदार. पण त्या दिवसांत सुखच जास्त, तर दु:ख उगीच आपलं गणपती विसर्जनाच्या वेळी "नुस्तं' मागच्या दारानं पडवीत येतं, तसं मागच्या बाजूला किंवा गाऱ्हाण्याच्या वेळी. गणपतीचा दीड दिवस मु"यतः आनंद सोहळा!
आमच्या घरी गणपती आणणे म्हणजे एक आनंद सोहळाच असायचा. दोन - तीन महिने आधीपासूनच त्याचेे ग"हणासारखे वेध लागायचे. घर मोठं म्हणण्यापेक्षा प्रचंड म्हणावं असं. भिंतींमध्ये दोन्ही बाजूंनी कपाटं खोदूनही मध्ये दोन फूट भिंत उरायचीच. आणि या घरात विविध ठिकाणं ही डंपिंग स्टेशनं असायची. एखादी वस्तू शोधणे म्हणजे सर्व घर पालथे घालणे. मिळेलच याची शाश्र्वती नाही. एकदा असाच एक गॅस सिलिंडर आणला होता, तो कोपऱ्यात उभा केला, तासाभरात सर्व घर सिलिंडरच्या शोधात. कारण त्या एका तासात त्यावर कपड्यांचा ढिग पडला होता अन् त्याच्यात तो बुडून गेला होता. हे सर्व सांगण्याचे कारण इतकेच की, चतुर्थीची आमची सुरुवात ही घराची साफसफाईपासून सुरू व्हायची. चतुर्थीपूर्वीचे तीन चार शनिवार - रविवार या कामात जायचे, माणसं गोळा व्हायची, एक एक साल (साल म्हणजे लांबलचक खोली. येथे जेवणावळ बसत असे. प्रत्येक सालाला जोडून एक एक खोली. असा एकंदर घराचा प्लॅन.) सफाईसाठी हातात घ्यायचं. संपूर्ण सामान हलवून सफाई झाल्यानंतर पुन्हा त्या सामानाची मांडणी करायची. साफसफाई चालू असताना कित्येक जुन्या हरवलेल्या वस्तू मिळायच्या. मग त्या वस्तूंच्या कहाण्या एकमेकांना सांगितल्या जायच्या. मग तिथं पंचतंत्रातील गोष्टींप्रमाणे, गोष्टीतून गोष्ट निघायची. काम करता करता मन भूतकाळात फिरून यायचं, प्रफुि"त व्हायचं.
घर साफ होताना पाहण्यात एक वेगळीच मजा होती. साफ झाल्यावर ते वेगळंच दिसू लागायचं. ते हसू लागायचं, गणपतीच्या स्वागताला सिद्ध व्हायचं. ते एकदम ओळखायला यायचं नाही. मग लक्षात यायचं - असंही घर असू शकतं आणि हे तसं ठेवणं काही फारसं कठीण नाही. अर्थातच ते तसंच असणं शक्य नव्हतं आणि ते तसं कधीच झालं नाही, राहिलं नाही. म्हणून दरवर्षी, दर चतुर्थीला ही साफसफाई अशीच होत गेली आणि माझ्या गणेशचतुर्थीचा संबंध असा साफसफाईशी जोडला गेला.

साफसफाईनंतर पूर्वतयारीशी संबंधित दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे गणेशमूर्तीकडील सजावट व दुसरे म्हणजे नेवऱ्या - मोदक. आमच्या घरात चित्रकलेचा टिपूस सुध्दा कुणाकडे सापडणार नाही. माझा कावळा सुद्धा "काळ्या रंगाचा पक्षी' अशा घाऊक स्वरूपात मी खपवत असे आणि शिक्षक दयाबुद्धीने तो 30 टक्के मार्कांत स्वीकारत असे. पण गणेशमूर्तीकडील व समोरील सजावट मात्र मस्त व्हायची. असं"य हात या सजावटीला लागत असत म्हणून बहुधा.
सुरवातीलाच गणेशमूर्ती ठेवण्याचा मध्य शोधण्यात बराच वेळ जात असे. फुटपट्टीने मोजल्यास तो मध्यभागी दिसत नसे, ही त्यातली मु"य अडचण. बहुतेक भिंतीतच काही चुका असतील. सर्वांच्या नजरेखालून तो पुढे, मागे, बाजूला होत असे. शेवटी कोणीतरी विशेषाधिकार वापरून त्याला स्थिर करीत असे. मग कागद कापणे, त्याला आकार देणे, खळ (घरगुती डिंक) लावणेे, ठराविक क"माने चिकटवणे आदी गोष्टी क"माक"माने आणि चढत्या रात्रीला साक्ष ठेवून होत असत. ही सजावट आम्हांला फारच सुंदर वाटायची, कारण त्यामागे कष्ट असायचे. त्या जागरणात घरात वासाच्या रूपात दरवळणारी कॉफी पेल्यातून बाहेर यायची अन् एक वेगळीच मजा देऊन जायची.

नेवऱ्या - मोदकांची सर्व जय्यत तयारी माझी आई ठेवत असे. बायका मंडळींची कामे लाटणे, सारण करणे वगैरे असायची. पुरुष मंडळीही लाटण्याचा प्रयत्न करत, पण पिठाचे विविध नकाशेच बहुधा तयार होत. लहान मुलांची कामे तयार नेवऱ्या, तळण्याच्या जागेपर्यंत नेणे व तळून आलेल्या नेवऱ्या डब्यात ठेवणे. यात त्यांची भांडणे होत, मग त्यांचा तेच स्वतःचा क"म ठरवत. मुलं मोठी होत जात तशी त्यांना पदोन्नती मिळत जाई. नेवऱ्यात सारण भरण्यापासून ते नेवऱ्या लाटण्यापर्यंत हा प्रवास होत असे. कुठच्याही कंपनीने शिकावे असा हा धडा होता. इथे पदोन्नती जमेल तितकी लवकर दिली जात असे. कंपन्यांत ती जमेल तितकी पुढे ढकलली जाते एवढाच फरक. योग्य वेळी दिलेली पदोन्नती माणसाची क"यशक्ती वाढवते व पर्यायाने कंपनीचे उत्पादनही वाढते एवढाच धडा शिकला गेला तरी कितीतरी कंपन्या आहे त्याहून जास्त प्रगती साधतील. किती नेवऱ्या कराव्यात याबद्दल माझ्या आईचे काही गणित असे, त्याप्रमाणात ती पीठ तयार करायची. तेवढे पिढ संपवणे हे आम्हा साऱ्यांचे कर्तव्य असायचे. हा तिचा अंदाज आजपर्यंत कधी एका नेवरीने चुकला नाही किंवा कदाचित नेवऱ्या झाल्यावर त्यांची सं"या बघून त्यांच्या वाटणीच्या सं"येमध्ये ती फेरफार करत असावी.
चतुर्थी आणि ओझे याचा संबंध गोव्यात फार आहे. गोवेकरांना ओझ्याचं "ओझं' होतं असं गृहीत धरून लिहिले गेलेले लेख मी वाचले आहेत. माझ्या घरात ओझ्याची पद्धत नव्हती. ना आम्ही ओझं दिलं, ना आम्ही घेतलं. त्यामुळे या प्रकाराबाबत आम्ही अनभिज्ञ. पण ह"ीच लग्न करून आलेल्या सुनांनी जेव्हा माझ्या वडिलांना विचारलं होतं की, ओझं म्हणून काय पाहिजे, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला ओझं नकोय. इथं ती पद्धत नाही. तू ती सुरूही करू नकोस, पण तिकडून काहीतरी यायचंच. मग आम्ही त्याच पाटल्यातून तेवढंच सामान त्याच माणसाकडून पाठवत होतो. त्यामुळे गोव्यात तरी ओझ्याचं ओझं असत नाही अन् हा व्यवहार प्रेमापोटीच होतो अशी माझी तरी समजूत आहे. पण आता जाणीव होते की जुने असूनही माझे वडील किंवा चुलते खरोखरच नवमतवादी होते अन् आपल्या पातळीवर, जमेल तेवढी समाजसुधारणा आपण करत होते. ना त्यांना कधी प्रसिद्धीची हाव होती अन् ना त्यांनी लेख लिहून ती मिळवायची आस धरली. न पेक्षा स्वतः सत्यनारायणाची पूजा करायची अन् अंधश्रद्धेविरुद्ध लेखांचा रतीब घालायची प्रवृत्ती असणारी माणसे समाजात असतातच की!
आमचं घर ब"ाह्मणाचं. हा तसा खूपच सोज्वळ शब्द झाला. लोकांच्या भाषेत भटाचं. मग गावच्या पूजा करणे हा आमच्या ड्यूटीचा भाग होता. गावात पाच - सहा वाडे असायचे आणि या वाड्यावर आम्ही सर्व भावंडे व चुलते पूजेसाठी जायचो. चतुर्थीची सकाळ आणि विसर्जनाची संध्याकाळ असा हा कार्यक"म असायचा. दुसऱ्या दिवशीची सकाळ गावातील सत्यनारायण पूजा करण्यात जायची. आमच्या घरात कनवाळूपणाची एक धारा कधीपासून तरी वाहात आहे असं मला वाटतं. प्रत्येक जण दुसऱ्याला कसली तरी (विशेषतः पैशांची) मदत करत असायचा, दुसऱ्यांच्या अडचणी समजून घेत असायचा. नंतर त्या माणसांची कृतघ्नता (पैसे परत न देणे, "नाही देत, काय करतोस ते कर' असं उलट विचारणं वगैरे) अनुभवली की चडफडायचा. माझ्या वडिलांची, चुलत्यांची पण दयावृत्ती चतुर्थीच्या दिवसांत वाहात जायची. एखाद्या वाड्यावरचे शिष्टमंडळ यायचे. "यंदा पूजेला आम्ही एक रुपया देऊ. परिस्थिती बिकट आहे. दोन्हीवेळचा मिळून गणेशपूजेचा एक नारळ देऊ' वगैरे मागण्या ते करायचे आणि वडील, चुलते ते कर्णाच्या औदार्याने मान्य करून टाकायचे. एका वर्षी तर मी तुळशीच्या पूजा, चार आणे प्रत्येकी दक्षिणा घेत केलेल्या आहेत. तीस एक पूजा करून नारळानं जड झालेली पिशवी खांद्यावर, डोक्यावर घेत, खिशात वट्ट साडेसात - आठ रुपये घेऊन रात्री एक वाजता उपाशीपोटी, अनवाण्या पावलांनी घरी पोचलो आहे.
अंधश्रद्धा विरोधक कधी कधी या पूजा, भटाचं उदरभरण करण्यासाठी निर्मिलेल्या आहेत, असलं काही तरी उथळ लिहितात, तेव्हा वाटतं, यांना एकदा तरी भर चौकात उभं करावं. 10 - 20 मिनिटे चालणारी तुळशीपूजा (त्याच्यात दोन मंगलाष्टके, आवाजाची अट नाही, कारण आमचा आवाजसुद्धा पूजा म्हणता म्हणता बसून जायचा आणि शेवटी सुजायचा. चार आण्याचं विकतचं दुखणं.) 30 वेळा तरी म्हणायला लावायची आणि चार चार आण्यांचे आठ रुपये करून, 30 नारळ डोक्यावर ठेवून घरापर्यंत अनवाणी चालत पाठवायचं. नाही यांनी लेखन थांबवलं तर नाव बदलेन. प्रत्येक चतुर्थीला आम्ही हा विनोद करून भरपूर हसलो आहोत.
अजूनही माझे भाऊ कुणाची तरी अडचण सांभाळायला वगैरे पूजेला जातात आणि मिळालेल्या पैशांत आपले पैसे घालून कुठल्या तरी संस्थेला निनावी दान देतात.
अशा रीतीने आमची चतुर्थी कष्टमय होती. पण हे सारे कष्ट हरितालिका व गणपती पूजा पाहताना - करताना वितळून जायचे. पैकी हरितालिका हे पार्वतीने शंकरप्राप्तीसाठी केलेले व"त - वटपौर्णिमा या तिच्याच दुसऱ्या व"त वा पूजनाप्रमाणे. त्या दिवसांची घरातल्या बायकांची चालणारी लगबग जशी मी लहानपणी अनुभवली, तोच अनुभव दरवर्षी अगदी तसाच येतो. किंबहुना गणेशपूजेचे रंग बदलले असतील, हरतालिकेचे रंग मात्र तसेच राहिले. कधीतरी नवीन मुलगी या व"ताबद्दल बोलते, "कशाला पार्वतीने एवढा खटाटोप केला वगैरे'. त्यावेळी एक लक्षात येते. नियतीचे स्वतःचेच काही खेळ असतात. देवालाही ते चुकत नाहीत. शंकराचा भडकपणा जखडून ठेवायला, बंधनात ठेवायला पार्वतीचा सात्विकपणाच आवश्यक असावा आणि म्हणून शंकरप्राप्ती ही पार्वतीवरील एक जबाबदारी असावी. काहीही असले तरी असली व"तवैकल्ये परंपरेप्रमाणे चालत राहिली आहेत आणि याच आधाराने कुटुंबसंस्थाही टिकवत आलेली आहेत.
गणेशमूर्ती आधल्या दिवशी आणली जायची. तिची स्थापना दुसऱ्या दिवशी विधीवत व्हायची. आमचे एक चुलते पूजा करण्यात एकदम निष्णात. मंत्रांचे ते उच्चार, त्यासोबत त्या सर्व चराचरसृष्टीचे आधिपत्य असणाऱ्या विघ्नहर्त्याला त्याच सृष्टीतील फुले अर्पण करत असताना, पावित्र्याचे मंगल वातावरण भारून टाकायचे. गावच्या पूजेला जायचे असल्यामुळे, पूजा सकाळी सकाळीच व्हायची. काहीवेळा तर त्या मंत्रोच्चारानेच जाग यायची. साखरझोपेत ते मंत्र ऐकताना कुठल्यातरी आश्रमात वा जंगलातल्या गुहेत असल्यासारखा भास व्हायचा. मखरात बसलेला तो दीड दिवसांचा राजा आमच्या अडचणी समजून घेत असणार अशी भावना प्रत्येक चतुर्थीप्रमाणे अजूनही दाटून येत असते. समर्पित झाल्यावर मनात दाटून येणारी ती शून्याची पवित्र भावना आताशा मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये वेगळ्या नावाने शिकवतात. आमच्या हजारो वर्षांच्या परंपरेत त्याचं शिक्षण असं घरबसल्या दिलं गेलं आहे. मॅनेजमेंटमधले टीमवर्क, डेलिगेशन वगैरे सर्व शब्द या व अशा असं"य सणांमध्ये गुंतले गेले होते अन् हे ट्रेनिंग कसल्याही हजारो रुपयांच्या फीशिवाय घरोघरी लोकांकडे सुपूर्द केले गेले होते. ती ट्रेनिंग्स संपल्यावर, सुटकेची भावना निर्माण होते. इथं गणेश विसर्जनाच्या वेळी मनं गदगदून जायची. केवढा प्रचंड विचार पूर्वजांनी करून ठेवला होता याची जाण आल्यावर त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचं की हे सगळं फालतू, वेळकाढू म्हणत त्याच्यावर टीका करायची हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा, कुवतीचा अन् मर्यादेचाही प्रश्न आहे. पण किमान चतुर्थीच्या निमित्ताने भारून जाणारे, हसणारे, कात बदलणारे घर तरी खरे आहे ना?