आमचा गणेशोत्सव

डॉ. विठ्ठल ठाकूर
एके दिवशी मी महाराष्ट्रात गणेशचतुर्थीच्या दरम्यान पोचलो होतो. कोणीतरी म्हणाले, "चतुर्थीला इथेच राहा. नाही तरी गोव्यात चतुर्थी असतेच कुठे?'.
मला हसूच आलं. महाराष्ट्रासंबंधी जसे गोव्यात गैरसमज आहेत तसेच किंवा त्यापेक्षाही जास्त गोव्याबद्दल महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी भाषा ही शुद्ध असते, हा त्यापैकी एक. मराठी भाषा तेथे वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. तेथील लोकप्रतिनिधीसुध्दा भाषणात "आनी', "पानी' शब्द वापरतात, तेव्हा ते गोड वाटतात. त्यांना भाषेबद्दल न्यूनगंड नसतो. गोवेकर मात्र मराठी भाषा बोलताना न्यूनगंड बाळगतात किंवा तो जाणीवपूर्वक रुजवला असावा. गोव्यात ख्रिश्चन लोक बहुसं"येने आहेत, कोकणी भाषेचाच उपयोग केला जातो आदी गैरसमजांबरोबरच आमच्या चतुर्थी उत्सवाबद्दलही महाराष्ट्रात गैरसमज आहे. गोव्यातील चतुर्थी म्हणजे काय? तेथील लोकांना पटवून देणं तसं कठीणच!
पोर्तुगिजकालीन चतुर्थी कशी होती मला माहीत नाही, पण माझ्या आठवणीतील चतुर्थी मात्र नि:संशय "आठवणीतीलच' आहे. आठवणीतच राहणारी आहे. गोंयकारांना चतुर्थी "चढत' असते. महाराष्ट्रात चतुर्थी प्रामु"याने सार्वजनिक. गोव्यात ती वैयक्तिक! वैयक्तिक म्हणजे स्वतःच्या घरापुरती असा अर्थ नाही घ्यायचा. गणपती येतोच मुळी पाहुण्यासारखा आणि राहतो घरच्यासारखा. इथं तो सर्वांच्या सुख दुःखांचा साक्षीदार. पण त्या दिवसांत सुखच जास्त, तर दु:ख उगीच आपलं गणपती विसर्जनाच्या वेळी "नुस्तं' मागच्या दारानं पडवीत येतं, तसं मागच्या बाजूला किंवा गाऱ्हाण्याच्या वेळी. गणपतीचा दीड दिवस मु"यतः आनंद सोहळा!
आमच्या घरी गणपती आणणे म्हणजे एक आनंद सोहळाच असायचा. दोन - तीन महिने आधीपासूनच त्याचेे ग"हणासारखे वेध लागायचे. घर मोठं म्हणण्यापेक्षा प्रचंड म्हणावं असं. भिंतींमध्ये दोन्ही बाजूंनी कपाटं खोदूनही मध्ये दोन फूट भिंत उरायचीच. आणि या घरात विविध ठिकाणं ही डंपिंग स्टेशनं असायची. एखादी वस्तू शोधणे म्हणजे सर्व घर पालथे घालणे. मिळेलच याची शाश्र्वती नाही. एकदा असाच एक गॅस सिलिंडर आणला होता, तो कोपऱ्यात उभा केला, तासाभरात सर्व घर सिलिंडरच्या शोधात. कारण त्या एका तासात त्यावर कपड्यांचा ढिग पडला होता अन् त्याच्यात तो बुडून गेला होता. हे सर्व सांगण्याचे कारण इतकेच की, चतुर्थीची आमची सुरुवात ही घराची साफसफाईपासून सुरू व्हायची. चतुर्थीपूर्वीचे तीन चार शनिवार - रविवार या कामात जायचे, माणसं गोळा व्हायची, एक एक साल (साल म्हणजे लांबलचक खोली. येथे जेवणावळ बसत असे. प्रत्येक सालाला जोडून एक एक खोली. असा एकंदर घराचा प्लॅन.) सफाईसाठी हातात घ्यायचं. संपूर्ण सामान हलवून सफाई झाल्यानंतर पुन्हा त्या सामानाची मांडणी करायची. साफसफाई चालू असताना कित्येक जुन्या हरवलेल्या वस्तू मिळायच्या. मग त्या वस्तूंच्या कहाण्या एकमेकांना सांगितल्या जायच्या. मग तिथं पंचतंत्रातील गोष्टींप्रमाणे, गोष्टीतून गोष्ट निघायची. काम करता करता मन भूतकाळात फिरून यायचं, प्रफुि"त व्हायचं.
घर साफ होताना पाहण्यात एक वेगळीच मजा होती. साफ झाल्यावर ते वेगळंच दिसू लागायचं. ते हसू लागायचं, गणपतीच्या स्वागताला सिद्ध व्हायचं. ते एकदम ओळखायला यायचं नाही. मग लक्षात यायचं - असंही घर असू शकतं आणि हे तसं ठेवणं काही फारसं कठीण नाही. अर्थातच ते तसंच असणं शक्य नव्हतं आणि ते तसं कधीच झालं नाही, राहिलं नाही. म्हणून दरवर्षी, दर चतुर्थीला ही साफसफाई अशीच होत गेली आणि माझ्या गणेशचतुर्थीचा संबंध असा साफसफाईशी जोडला गेला.

साफसफाईनंतर पूर्वतयारीशी संबंधित दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे गणेशमूर्तीकडील सजावट व दुसरे म्हणजे नेवऱ्या - मोदक. आमच्या घरात चित्रकलेचा टिपूस सुध्दा कुणाकडे सापडणार नाही. माझा कावळा सुद्धा "काळ्या रंगाचा पक्षी' अशा घाऊक स्वरूपात मी खपवत असे आणि शिक्षक दयाबुद्धीने तो 30 टक्के मार्कांत स्वीकारत असे. पण गणेशमूर्तीकडील व समोरील सजावट मात्र मस्त व्हायची. असं"य हात या सजावटीला लागत असत म्हणून बहुधा.
सुरवातीलाच गणेशमूर्ती ठेवण्याचा मध्य शोधण्यात बराच वेळ जात असे. फुटपट्टीने मोजल्यास तो मध्यभागी दिसत नसे, ही त्यातली मु"य अडचण. बहुतेक भिंतीतच काही चुका असतील. सर्वांच्या नजरेखालून तो पुढे, मागे, बाजूला होत असे. शेवटी कोणीतरी विशेषाधिकार वापरून त्याला स्थिर करीत असे. मग कागद कापणे, त्याला आकार देणे, खळ (घरगुती डिंक) लावणेे, ठराविक क"माने चिकटवणे आदी गोष्टी क"माक"माने आणि चढत्या रात्रीला साक्ष ठेवून होत असत. ही सजावट आम्हांला फारच सुंदर वाटायची, कारण त्यामागे कष्ट असायचे. त्या जागरणात घरात वासाच्या रूपात दरवळणारी कॉफी पेल्यातून बाहेर यायची अन् एक वेगळीच मजा देऊन जायची.

नेवऱ्या - मोदकांची सर्व जय्यत तयारी माझी आई ठेवत असे. बायका मंडळींची कामे लाटणे, सारण करणे वगैरे असायची. पुरुष मंडळीही लाटण्याचा प्रयत्न करत, पण पिठाचे विविध नकाशेच बहुधा तयार होत. लहान मुलांची कामे तयार नेवऱ्या, तळण्याच्या जागेपर्यंत नेणे व तळून आलेल्या नेवऱ्या डब्यात ठेवणे. यात त्यांची भांडणे होत, मग त्यांचा तेच स्वतःचा क"म ठरवत. मुलं मोठी होत जात तशी त्यांना पदोन्नती मिळत जाई. नेवऱ्यात सारण भरण्यापासून ते नेवऱ्या लाटण्यापर्यंत हा प्रवास होत असे. कुठच्याही कंपनीने शिकावे असा हा धडा होता. इथे पदोन्नती जमेल तितकी लवकर दिली जात असे. कंपन्यांत ती जमेल तितकी पुढे ढकलली जाते एवढाच फरक. योग्य वेळी दिलेली पदोन्नती माणसाची क"यशक्ती वाढवते व पर्यायाने कंपनीचे उत्पादनही वाढते एवढाच धडा शिकला गेला तरी कितीतरी कंपन्या आहे त्याहून जास्त प्रगती साधतील. किती नेवऱ्या कराव्यात याबद्दल माझ्या आईचे काही गणित असे, त्याप्रमाणात ती पीठ तयार करायची. तेवढे पिढ संपवणे हे आम्हा साऱ्यांचे कर्तव्य असायचे. हा तिचा अंदाज आजपर्यंत कधी एका नेवरीने चुकला नाही किंवा कदाचित नेवऱ्या झाल्यावर त्यांची सं"या बघून त्यांच्या वाटणीच्या सं"येमध्ये ती फेरफार करत असावी.
चतुर्थी आणि ओझे याचा संबंध गोव्यात फार आहे. गोवेकरांना ओझ्याचं "ओझं' होतं असं गृहीत धरून लिहिले गेलेले लेख मी वाचले आहेत. माझ्या घरात ओझ्याची पद्धत नव्हती. ना आम्ही ओझं दिलं, ना आम्ही घेतलं. त्यामुळे या प्रकाराबाबत आम्ही अनभिज्ञ. पण ह"ीच लग्न करून आलेल्या सुनांनी जेव्हा माझ्या वडिलांना विचारलं होतं की, ओझं म्हणून काय पाहिजे, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला ओझं नकोय. इथं ती पद्धत नाही. तू ती सुरूही करू नकोस, पण तिकडून काहीतरी यायचंच. मग आम्ही त्याच पाटल्यातून तेवढंच सामान त्याच माणसाकडून पाठवत होतो. त्यामुळे गोव्यात तरी ओझ्याचं ओझं असत नाही अन् हा व्यवहार प्रेमापोटीच होतो अशी माझी तरी समजूत आहे. पण आता जाणीव होते की जुने असूनही माझे वडील किंवा चुलते खरोखरच नवमतवादी होते अन् आपल्या पातळीवर, जमेल तेवढी समाजसुधारणा आपण करत होते. ना त्यांना कधी प्रसिद्धीची हाव होती अन् ना त्यांनी लेख लिहून ती मिळवायची आस धरली. न पेक्षा स्वतः सत्यनारायणाची पूजा करायची अन् अंधश्रद्धेविरुद्ध लेखांचा रतीब घालायची प्रवृत्ती असणारी माणसे समाजात असतातच की!
आमचं घर ब"ाह्मणाचं. हा तसा खूपच सोज्वळ शब्द झाला. लोकांच्या भाषेत भटाचं. मग गावच्या पूजा करणे हा आमच्या ड्यूटीचा भाग होता. गावात पाच - सहा वाडे असायचे आणि या वाड्यावर आम्ही सर्व भावंडे व चुलते पूजेसाठी जायचो. चतुर्थीची सकाळ आणि विसर्जनाची संध्याकाळ असा हा कार्यक"म असायचा. दुसऱ्या दिवशीची सकाळ गावातील सत्यनारायण पूजा करण्यात जायची. आमच्या घरात कनवाळूपणाची एक धारा कधीपासून तरी वाहात आहे असं मला वाटतं. प्रत्येक जण दुसऱ्याला कसली तरी (विशेषतः पैशांची) मदत करत असायचा, दुसऱ्यांच्या अडचणी समजून घेत असायचा. नंतर त्या माणसांची कृतघ्नता (पैसे परत न देणे, "नाही देत, काय करतोस ते कर' असं उलट विचारणं वगैरे) अनुभवली की चडफडायचा. माझ्या वडिलांची, चुलत्यांची पण दयावृत्ती चतुर्थीच्या दिवसांत वाहात जायची. एखाद्या वाड्यावरचे शिष्टमंडळ यायचे. "यंदा पूजेला आम्ही एक रुपया देऊ. परिस्थिती बिकट आहे. दोन्हीवेळचा मिळून गणेशपूजेचा एक नारळ देऊ' वगैरे मागण्या ते करायचे आणि वडील, चुलते ते कर्णाच्या औदार्याने मान्य करून टाकायचे. एका वर्षी तर मी तुळशीच्या पूजा, चार आणे प्रत्येकी दक्षिणा घेत केलेल्या आहेत. तीस एक पूजा करून नारळानं जड झालेली पिशवी खांद्यावर, डोक्यावर घेत, खिशात वट्ट साडेसात - आठ रुपये घेऊन रात्री एक वाजता उपाशीपोटी, अनवाण्या पावलांनी घरी पोचलो आहे.
अंधश्रद्धा विरोधक कधी कधी या पूजा, भटाचं उदरभरण करण्यासाठी निर्मिलेल्या आहेत, असलं काही तरी उथळ लिहितात, तेव्हा वाटतं, यांना एकदा तरी भर चौकात उभं करावं. 10 - 20 मिनिटे चालणारी तुळशीपूजा (त्याच्यात दोन मंगलाष्टके, आवाजाची अट नाही, कारण आमचा आवाजसुद्धा पूजा म्हणता म्हणता बसून जायचा आणि शेवटी सुजायचा. चार आण्याचं विकतचं दुखणं.) 30 वेळा तरी म्हणायला लावायची आणि चार चार आण्यांचे आठ रुपये करून, 30 नारळ डोक्यावर ठेवून घरापर्यंत अनवाणी चालत पाठवायचं. नाही यांनी लेखन थांबवलं तर नाव बदलेन. प्रत्येक चतुर्थीला आम्ही हा विनोद करून भरपूर हसलो आहोत.
अजूनही माझे भाऊ कुणाची तरी अडचण सांभाळायला वगैरे पूजेला जातात आणि मिळालेल्या पैशांत आपले पैसे घालून कुठल्या तरी संस्थेला निनावी दान देतात.
अशा रीतीने आमची चतुर्थी कष्टमय होती. पण हे सारे कष्ट हरितालिका व गणपती पूजा पाहताना - करताना वितळून जायचे. पैकी हरितालिका हे पार्वतीने शंकरप्राप्तीसाठी केलेले व"त - वटपौर्णिमा या तिच्याच दुसऱ्या व"त वा पूजनाप्रमाणे. त्या दिवसांची घरातल्या बायकांची चालणारी लगबग जशी मी लहानपणी अनुभवली, तोच अनुभव दरवर्षी अगदी तसाच येतो. किंबहुना गणेशपूजेचे रंग बदलले असतील, हरतालिकेचे रंग मात्र तसेच राहिले. कधीतरी नवीन मुलगी या व"ताबद्दल बोलते, "कशाला पार्वतीने एवढा खटाटोप केला वगैरे'. त्यावेळी एक लक्षात येते. नियतीचे स्वतःचेच काही खेळ असतात. देवालाही ते चुकत नाहीत. शंकराचा भडकपणा जखडून ठेवायला, बंधनात ठेवायला पार्वतीचा सात्विकपणाच आवश्यक असावा आणि म्हणून शंकरप्राप्ती ही पार्वतीवरील एक जबाबदारी असावी. काहीही असले तरी असली व"तवैकल्ये परंपरेप्रमाणे चालत राहिली आहेत आणि याच आधाराने कुटुंबसंस्थाही टिकवत आलेली आहेत.
गणेशमूर्ती आधल्या दिवशी आणली जायची. तिची स्थापना दुसऱ्या दिवशी विधीवत व्हायची. आमचे एक चुलते पूजा करण्यात एकदम निष्णात. मंत्रांचे ते उच्चार, त्यासोबत त्या सर्व चराचरसृष्टीचे आधिपत्य असणाऱ्या विघ्नहर्त्याला त्याच सृष्टीतील फुले अर्पण करत असताना, पावित्र्याचे मंगल वातावरण भारून टाकायचे. गावच्या पूजेला जायचे असल्यामुळे, पूजा सकाळी सकाळीच व्हायची. काहीवेळा तर त्या मंत्रोच्चारानेच जाग यायची. साखरझोपेत ते मंत्र ऐकताना कुठल्यातरी आश्रमात वा जंगलातल्या गुहेत असल्यासारखा भास व्हायचा. मखरात बसलेला तो दीड दिवसांचा राजा आमच्या अडचणी समजून घेत असणार अशी भावना प्रत्येक चतुर्थीप्रमाणे अजूनही दाटून येत असते. समर्पित झाल्यावर मनात दाटून येणारी ती शून्याची पवित्र भावना आताशा मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये वेगळ्या नावाने शिकवतात. आमच्या हजारो वर्षांच्या परंपरेत त्याचं शिक्षण असं घरबसल्या दिलं गेलं आहे. मॅनेजमेंटमधले टीमवर्क, डेलिगेशन वगैरे सर्व शब्द या व अशा असं"य सणांमध्ये गुंतले गेले होते अन् हे ट्रेनिंग कसल्याही हजारो रुपयांच्या फीशिवाय घरोघरी लोकांकडे सुपूर्द केले गेले होते. ती ट्रेनिंग्स संपल्यावर, सुटकेची भावना निर्माण होते. इथं गणेश विसर्जनाच्या वेळी मनं गदगदून जायची. केवढा प्रचंड विचार पूर्वजांनी करून ठेवला होता याची जाण आल्यावर त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचं की हे सगळं फालतू, वेळकाढू म्हणत त्याच्यावर टीका करायची हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा, कुवतीचा अन् मर्यादेचाही प्रश्न आहे. पण किमान चतुर्थीच्या निमित्ताने भारून जाणारे, हसणारे, कात बदलणारे घर तरी खरे आहे ना?

No comments: