चंद्रकांत रामा गावस
भगवान परशुराम निर्मित कोकण भूमीत सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा पिढ्यान्पिढ्या जोपासण्यात आला आहे. या भूमीतील प्रसिद्ध मंदिरे, जत्रा, उत्सव, धार्मिक परंपरा, संतांची शिकवण, सिद्ध पुरूषांचा सत्संग यामुळे कोकणचा धार्मिक व सांस्कृतिक चेहरामोहराच बदलून गेलेला आहे. कोकणी माणसाचे आराध्य दैवत म्हणजे श्री गणपती. गणपती पूजनाला येथे जास्त महत्त्व आहे. जागोजागी विघ्नहर्त्या गणपतीची मंदिरे आढळतात. हजारो गणेशभक्त श्री गणपतीची आराधना करतात. कोकणात हा सण इतर उत्सवांपेक्षा विशेष उत्साहवर्धक मानला जातो. गावात आणि शहरात सुध्दा गणेेशोत्सव साजरा केला जातो. मात्र घरोघरच्या गणपती पूजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. लहानांपासून थोरांपर्यंत जो तो आपल्या परीने या उत्सवाचा आनंद लुटतो. मुंबईत, पुण्यात स्थायिक झालेले कोकणातील बरेच चाकरमानी गावातील गणेशोत्सवासाठी न चुकता येतात. ते मूळ घराण्यातील गणपती उत्सवात आनंदाने भाग घेतात. गणपती उत्सवाला गावी येता यावे म्हणून गाड्या, रेल्वेसाठी त्यांना आगाऊ दोन - तीन महिने आरक्षण करावे लागते. तसेच जादा गाड्या सोडाव्या लागतात.
जय्यत तयारी
अलीकडील 40 ते 50 वर्षांत गणपतीची उपासना करण्याकडे कोकणी लोकांचा कल वाढल्याचे प्रकषार्र्ने जाणवते. लहान थोर मंडळी गणेशोत्सवाची तयारी उत्साहाने करतात. गणपतीच्या आसनाच्यावर "माटी' बांधतात. हिला "माटोळी', "मंडपी' असेही म्हणतात. निसर्गातल्या फलाफुळांनी नटलेली ही माटोळी गणेशमंचाला अधिकच आकर्षक करते. ग"ामीण भागात या माटीला रानात मिळणाऱ्या शेरवडं, हरणे, कांगलां, कवंडाळ, कोकणे, वाघाचे पंजे अशा रानवनस्पती व रानफळांनी सुशोभित केले जाते. या वस्तू गोळा करण्यासाठी लोकांची मोठी धावपळ असते. गणपतीच्या आसनाच्या मागील बाजूच्या भिंतीवर कमळे, निसर्गचित्रे, देवांची चित्रे पाहावयास मिळतात. बायका करंज्या, मोदक, लाडू, शंकरपाळ्या तसेच वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ बनविण्यात गुंग असतात.
कोकणात बहुतेक गणेशमूर्ती चिकणमातीच्या असतात. त्यामुळे त्या आकर्षक असतात. गणेशाच्या आसनाभोवती सुंदर, देखणे मखर व मनमोहक सजावट केली जाते. गणेशोत्सव काळात गावातील महिलांच्या फुगड्यांतील उत्साह अवर्णनीय असतो. फुगडी एक लोककला. या लोककलेला या उत्सवात बराच उजाळा येतो. फुगड्या घालणाऱ्या महिला फुगड्या खेळताना फुगडी म्हणतात, ती अशी -
"गणपती देवा, करीन तुझी सेवा
नवस करीन रे, नवस करीन रे
पाच फुलांनी, पाच फळांनी
दूर्वा वाहीन रे,
कपाळीचो कुंकू जन्मभर
आणखी काय मागीन रे'
अशाप्रकारे गणपतीची स्तुती करतानाच गणपतीकडे अखंड सौभाग्याची प्रार्थनाही फुगडीद्वारे केली जाते. फुगडी ही जणू स्त्री मनाचा आरसाच असतो. लोकमताशी व लोकजीवनाशी नाते सांगणारी फुगडीतील गीते गणेश चतुर्थीच्या फुगड्यांतून म्हटली जातात. त्यामुळे बायकांच्या अंगातील सुप्त गुणांना नकळत उजाळा मिळतो. अशाच प्रकारे काही हास्य गीतेही बायका फुगडीतून सादर करतात, जशी -
"गडबड घोटाळा जाला जाला
बाहेर पावणा आला आला
पावण्याक बसाक दिली शेंदरी
तेनी केली तेची बोंदरी'
आणि
"जावेक जाव शिकयता
घोटयेत भाकर लिपयता
ये गे जावया वाड्यात बसान खावया
वाड्यातली भाकर गोड गे
जावेचो काडलो झोड गे....'
याप्रमाणे झिम्मा फुगड्यांनाही या उत्साहात बराच ऊत येतो. गणेश चतुर्थी म्हटल्यावर अभंग व भजन यांना फुगडी इतकेच महत्त्व आहे. या भजनात ग्यानबा, तुकोबांच्या अभंगांनी आणि गजरांनी बरीच रंगत येते. भजनाची सांगता
देवा - देवींच्या आरत्यांनी होते. तरूणांचा या भजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
मोठ्या कुटुंबांचे गणेशोत्सव
कोकणात काही घरंदाज घराण्यांचा गणेशोत्सव एकत्रित साजरा केला जातो. मोठ्या कुटुंबात विभक्त व्यवहार असले तरी घराण्यांच्या परंपरेनुसार गणेशोत्सव एकत्र साजरा केला जातो. कोकणातील कुडाळ तालुक्यात माड्याची वाडी येथे सर्व गावडे कुटुंबीयांचा 150 ते 200 लोकांचा मिळून एकच गणपती पूजला जातो. सगळे खेळीमेळीने, उत्साहाने हा सण साजरा करतात. एवढ्या लोकांचे सहभोजन गणपतीसमोर होते. कुडाळपासून 12 किलोमीटर अंतरावरील आवळेगावामधील फौजदारवाडीत वास्तव्य करणाऱ्या सावंत यांचा एकत्रित शंभर - दीडशे कुटुंबांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. कोणत्याही प्रकारचा भांडण, तंटा न करता अगदी आनंदाने गणेशोत्सव साजरा केला जातो. हा उत्सव दीड, पाच, सात, नऊ किंवा अकरा दिवसांचा असतो. रात्रभर भजनांनी जागर करण्याचा उत्साह व चण्या - वाटाण्यांच्या खमंग उसळीवर यथेच्छ ताव मारण्यात कोकणी माणूस अत्यंत आनंददायी वातावरणात रमून जातो.
एक गाव एक गणपती
ग"ामस्वच्छता अभियानात कोकणातील मालवण तालुक्यातील आंबडोस गाव अग"ेसर आहे. या गावाला स्वच्छता अभियानचे पहिले पारितोषिक महाराष्ट्र शासनाने प्रदान करून गौरव केला आहे. या गावात "एक गाव एक गणपती' ही संकल्पना साकारण्यात आली आहे. हा उपक"म आदर्शाचे मूर्तिमंत प्रतीक आहे. या संकल्पनेनुसार गावात घरोघरी गणपती पूजनापेक्षा गावच्या सर्व रहिवाशांचा एकच गणपती असल्यास सर्व गावकरी, वृद्ध, तरूण - तरूणी, पुरूष, महिला, मुले एकत्र येतील. त्या अनुषंगाने एकीचे बळ वाढेल. वाया जाणारा वेळ, अनावश्यक खर्च, धावपळ, भांडण, तंटे या गोष्टींना आळा बसेल. गावात शांतता व सुबत्ता नांदेल. आजकाल आजूबाजूच्या गढूळ वातावरणाचा गणेेशोत्सवावर अनिष्ट परिणाम झाला असून धार्मिकतेपेक्षा बाजारूपणाला, दिखाऊपणाला वाव मिळला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकवर्गणी, जाहिराती, लॉटरी याद्वारे जनतेची प"चंड लूट होत आहे. उत्सवातील सांस्कृतिक कार्यक"म म्हणजे रोंबासोंबा नृत्य, कर्णकर्कश आवाजातील वाद्यांचा साज, संस्कृतीची विटंबना करणारी समूहगीते यामुळे पवित्र, संस्कारित, आनंददायी उत्सवाला गालबोट लागते. या गोष्टी समाजातून पूर्णपणे हद्दपार होणे गरजेचे आहे. त्यासाठी आंबडोस गावच्या लोकांची गणपती उत्सवाची आदर्श व मौलिक संकल्पना स्वीकारण्याची गरज आहे.
मनोहारी गणेशमूर्ती घरी आणल्यानंतर आपण तिचे स्तवन करताना म्हणतो,
हे मंगलमूर्ती तूच आमची स्फूर्ती
गणनायक तू, ज्ञानदायक तू
सिध्दनायक तू, बुध्दिदायक तू
यशदायक तू, सुखदायक तू
दे आम्हा वरदान, दे आम्हा वरदान।
शेवटी गणपती बाप्पा स्वगृही जायला निघतात. तेव्हा लहानथोर सगळ्यांनाच का कोणास ठाऊक खूप वाईट वाटते. रोज आरती म्हणून व अभंग गाऊन त्या मूर्तीने घराच्या चराचरात चैतन्य आणलेले असते. सगळे श्री गणपतीला पुन्हा पुन्हा सांगतात,
"गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
गणपती गेले गावाला
चैन पडेना आम्हांला
मोरया रे बाप्पा, मोरया रे'.
----
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा