गोव्याचा गणेशोत्सव

सुधा सुरेश आमोणकर
गोव्यात गणेशोत्सवाला फार मानाचे अन् महत्त्वाचे स्थान आहे. "गणेशोत्सव' हा गोव्यातला मु"य सण. गणेशाच्या आगमनाचा उत्स्फूर्त उत्सव साजरा होतो. प्रत्येक हिंदू परिवारात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने व हर्षोल्हासाने साजरा केला जातो. हिंदू परिवार एकत्र कुटुंब पद्धतीकडून विभक्त कुटुंब पद्धतीकडे वेगाने वाटचाल करीत असताना गणेशचतुर्थी हा सण त्यांना काही दिवसांसाठी का होईना एकत्र आणण्याचे काम करतो.
जादूगार श्रावण येतो आणि सृष्टीला हिरव्या साजात नटवून फुलांच्या मखरात बसवून जातो. सृष्टी हिरवीगार- प्रफुि"त दिसू लागते. तिच्या प्रसन्न दर्शनाने प्रत्येकाचं मन फुलून जातं आणि त्या वेळेलाच गणेशाचं आगमन अगदी सुखदायक आणि विलोभनीय वाटतं.
गणेश हा सर्व देवांमध्ये आद्य देव
ओम नमोजी आद्या
श्री वेद प्रतिपाद्या
जय जय सं संवेदया
आत्मरूपा
देवा तुचि गणेशु
सकलार्थ मति प्रकाशु
म्हणे निवृत्ति दासू
अवधारिजो जी
अशा शब्दांत शब्दप्रभू ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभालाच आदी दैवत श्री गणेशाचे नमन गायले आहे. या नमनात ज्ञानदेव म्हणतात, "गणेशा तूच ओंकार आहेस, तुझ्यात सर्व विश्व सामावलेले आहे. तूच सर्व कलांचा अधिपती आहेस. चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, चौदा विद्या, चौसष्ट कला ही सगळी तुझीच रूपे आहेत.' ज्ञानदेवांनी गणपतीलाच नट, नटेश्वर आणि नटश्रेष्ठही ठरवून टाकले आहे. यात अतिशयोक्ती अजिबात नाही. कारण सर्वच क्षेत्रांत गणरायाचा संचार आहे. विद्वान कितीही शिकलेले असले तरी ते भक्तिक्षेत्रात म्हणा किंवा कलाक्षेत्रात गणाधिपतीलाच आधी वंदन करतात. कोणत्याही धार्मिक समारंभापूर्वी गणेशाचीच पूजा प्रथम केली जाते.
गोव्यात मुक्तीपूर्वीही श्री गणेशपूजन अथवा गणेशचतुर्थी सगळीकडे मोठ्या उमेदीने साजरी केली जात होती. घराघरांत गणेशचतुर्थी साजरी करण्यापूर्वी रंगसफेदी करून घर उमेदीने सजविले जात होते. घरासमोरील अंगणात लहानसा मंडप टाकून आणि तुळशी वृंदावनापाशी शेणाने अंगण सारवून रांगोळी घातली जात होती. गणेशचतुर्थीच्या आदल्या रात्री गणपतीची माटोळी विविध फळाफुलांनी सजवलेली, बहरलेली असायची. घरात ज्या जागी गणपतिपूजन असायचे त्या जागी पताका लावून दिव्याची आरास करून ती जागा शोभिवंत केली जात होती. अशा या सणाला गणेशचतुर्थीच्या दिवशी तर आनंदाला उधाण यायचं. प्रत्येक वाड्यावरील लोक प्रत्येकाच्या घरी आनंदाने मिळून-मिसळून भक्तिभावाने आरत्या, भजन करण्याकरिता जात असत. गणेशचतुर्थीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत लोक यात भाग घेत असत. सर्वप्रथम दीड दिवस असलेला गणपती हळूहळू काहींच्या घरी पाच, सात, नऊ, अकरा दिवसांचा सगासोयरा बनून राहू लागला.
गोव्यातला हा घरगुती उत्सव जरी दीड दिवसाचा असला तरी या उत्सवाची तयारी करताना लोकांच्या उत्साहाला उधाण येते. श्रीमूर्ती घरी आणताना तर त्यांचे चेहरे सात्त्विक आनंदाने फुलून आलेले दिसतात. घरोघर बायकांची पाककला बहरते. मुलांना मखर सजवण्याचं वेड लागतं. मंत्रपुष्पांजलीचे घोष घुमू लागतात. भजनांचे स्वर निनादू लागतात.
गोव्यात घराघरांत गणपती पूजले जात नाहीत. इथले गणपती बहुधा कुटुंबीयांचे असतात. मूळ घराच्या चौकात वा देवळात गणपती पूजला जातो. घर माणसांनी फुलून जाते. हा उत्सव कौटुंबिक एकोपा आणि सामाजिक सलोखा याची ऐट मिरवत दीड वा पाच दिवस आनंदाच्या डोही तरंगत असतो. ही एका कुटुंबातली दूरवरची माणसे एकत्रपणे गणेशचतुर्थी साजरी करतात. दूरवरचे लोक मुंबईहून, दुबईहून, अमेरिकेतून मुद्दाम येतात. आपापल्या घराण्याच्या मूळ जागी जमतात. गणेशमूर्तीचे मनोभावे दर्शन घेतात. आप्तेष्टांना प्रेमानं भेटतात. तीही माणसे प्रफुि"त होतात. कोकण- गोव्याची माणसे जगभर पांगलेली असली तरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ती आपल्या मूळगावी- मूळघरी जमतात. आपल्या पाळामुळांचं, वाडवडिलांचं स्मरण करतात आणि पुन्हा दूरदेशी निघून जातात.
"पैरी'ची परंपरा गोव्यात अजूनही दृष्टीस पडते. "पैरी' म्हणजे कुटुंबातील एका सदस्याला मिळणारी कुलदेवतेची पूजा करण्याची संधी होय. गणपतीचेही सगळे विधी त्यानेच करावे असा रिवाज आहे. घराण्याचं दैवत पूजायला मिळतंय याचा त्यांनाही अभिमान वाटतो. ही "पैरी' कुटुंबात चक"गोलाकार फिरत असते. त्यामुळे सर्वांना देवपूजेची संधी मिळते. सर्वांना पूजेचा लाभ व्हावा म्हणून आळीपाळीने खर्च करण्याची संधी दिली जाते. "पैरी' असते त्यानेच गणपतीची ओवाळणी करून मूर्ती घरात घ्यायची असते. परंपरेनुसार "पैरी'वाल्याने देवळाच्या दारावर उभे राहून शंखनाद करायचा व आरतीसाठी साद घालायचा अशी प्रथा आहे. त्यानंतर सामूहिक आरती होते. गावभरातील बहुतेक लोक आरतीसाठी घराघरांत जातात.
गोव्यात पुराणाबरोबरच (काहींच्या घरात) सद्यस्थितीवर आधारित देखावेही असतात. एकापेक्षा एक देखावा सरस-वरचढ असतो. कुटुंबीय मोठ्या हौसेने देखावे सजवतात. नाचतात, गातात. मग सामूहिक आरती होते. होडीतून गणपती विसर्जनासाठी नेले जातात.
आज जग जवळ आलं आहे, परंतु माणसं एकमेकांपासून दूर गेली आहेत. जीवनस्पर्धा वाढलेली आहे. ताणतणाव वाढलेले आहेत. परस्परांच्या गाठीभेटी दुर्मीळ झाल्या आहेत. अशा काळात या गणेशपूजनाच्या निमित्ताने लोक एकत्र येतात. एकमेकांच्या सुखदुःखाची दखल घेतात, एकमेकांचे भले इच्छितात ही गोष्ट सांस्कृतिकदृष्ट्या किती मोलाची आहे? गणेशाचं धार्मिक महत्त्व लोकांना अजूनही वाटतं. परंतु त्यापेक्षा त्याचं अधिक महत्त्व आहे ते सांस्कृतिकच असं मला प्रांजळपणे वाटतं.
"भारतकार' हेगडे-देसाई यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, "देवांकरिता मनुष्ये नाहीत, मनुष्यांकरिता देव आहेत.' गोव्यातील गणेशपूजनाच्या दीड दिवसाचा सोहळा पाहिला की भारतकारांचे म्हणणे पटू लागते. गजाननाचं अस्तित्व लोकांकरिता आहे. लोकजीवनाला उत्साहित करणे, आनंदित करणे, लोकांच्या पठण कलेला, गायन कलेला प्रोत्साहन देणे, लोकांमधला प्रेमभाव वृद्धिंगत करणे हे फार मोठे सांस्कृतिक कार्य श्री गजाननाच्या कृपेने गोव्यात गावोगाव, घरोघर चालू आहे.
लोकांचं गणपतीदर्शनात समरसून जाणं दिसतं. त्यांचा सात्त्विक भाव, त"ीनता, त्यांची अखंड श्रद्धा, त्यांची अनन्य भाविकता दिसते. आणि ती खरीच मला विलोभनीय वाटते. गणेशाच्या भक्तिभावातून येणारी ही जाग मला फारच मौलिक वाटते. आणि ही भावना माझ्या मनाला प्रफुि"त करते.
आता गोव्यातही गावोगावी सार्वजनिक गणेशोत्सव होऊ लागले आहेत. दीड दिवसाचे घरगुती गणेशपूजन असो किंवा दहा दिवसांचे सार्वजनिक उत्सव असोत, श्रीगणेशाच्या कृपेने गोव्यातल्या सांस्कृतिक जीवनाला उधाण येते. माणसामाणसांतील प्रेमाला भरते येते. गणेशोत्सवाच्या धार्मिक कार्याची ही सांस्कृतिक फलश्रुती लाखमोलाची आहे.
आजच्या काळी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना काही चांगल्या सृजनात्मक आणि परिणामकारक कार्यक"मांची आखणी करता येईल. प्रसन्नचित्त भक्तिभावाच्या वातावरणाची खऱ्या अर्थाने निर्मिती व्हावी असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी भजनाची सुरुवात टाळ, मृदंग, ढोल, झांज, ताशा, पेटी, तबला, घुमटवादनाने करावी. त्यातून नव्या पिढीला नवदर्शन, नवा प्रत्यय येण्याची दाट शक्यता आहे. त्यातूनही त्यांना अलौकिक आनंद मिळू शकतो. त्याचसोबत नव्या पिढीला आकर्षित करणारे पाश्चात्त्य संगीत, नृत्य काहीवेळापुरतं मर्यादित असू शकतं. त्यातून जुन्या-नव्या पिढीतले हे अंतर हळूहळू कमी होऊ शकते. त्याचबरोबर प्रबोधनात्मक उपक"म हाती घेतल्यास समाज, गाव, परिसर साक्षर, व्यसनमुक्त होण्यास मदत होऊ शकते. भौतिक संपन्नतेबरोबर निर्माण झालेल्या सामाजिक, मानसिक, कौटुंबिक, वैयक्तिक अस्वस्थेची कारणे दाखवणाऱ्या अनेकविध कार्यक"मांची आखणी करता येईल. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळू शकते.
आज सार्वजनिक गणेशोत्सवाची अत्यंत गरज आहे ती सामाजिक जनजागृतीसाठी व समाज प्रबोधनासाठी. सार्वजनिक गणेशोत्सव सत्कारणी लागावा म्हणून या उत्सवात मनोरंजनात्मक कार्यक"मांत सामाजिक प्रबोधन करणाऱ्या कार्यक"मांचे आयोजन करता येईल. नाटकांच्या माध्यमाद्वारे दारू, चरस, गांजा यांचे दुष्परिणाम, एड्स रोगाची महाभयानकता, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणप्रसार, स्वच्छता मोहीम यांवर प्रकाशझोत टाकणे अत्यावश्यक आहे. विविध विषयांवर वक्तृत्व स्पर्धा, सामान्यज्ञानावर आधारित चाचण्या, वादविवाद, लेखन, वाचन, कथाकथन इत्यादीमुळे या स्पर्धेच्या अनुषंगाने त्या भागात राहणारी मुले एकत्र येतील व त्यांच्यातील सुप्तगुणांना चालना मिळेल. व्यक्तिमत्त्व विकासालाही प्रेरणा मिळून त्यातून त्यांना अखंड आत्मविश्वास मिळू शकतो तसेच सृजनशीलतेचा प्रभावही त्यांच्यावर पडू शकतो.
गोव्यातला हा गणेशोत्सव, गावागावांमध्ये कुटुंबा-कुटुंबांमध्ये एक वेगळंच अपूर्व वातावरण निर्माण करून जातो. एक प्रभावी परिणामकारक एकोप्याचं संमेलन घडवून आणतो. एकमेकांचं मन फुलवून जातो. सर्वांना आनंदित करून सोडतो. पुढच्या वर्षी असाच उत्साह, उमेद मिळो, असाच आनंद लुटायला मिळो हीच इच्छा गोवेकरांना उत्कट शक्ती देऊन जाते. हाच ना जीवनातला सुखदायी गणेशोत्सव!
भक्तिभावानं गणेशोत्सव साजरा करावा असं गोवेकरांना वाटत असणारच. म्हणून त्यांना आणि इतरांना त्यातील सोज्वळ आनंद मिळवायची एक सुंदर संधी मिळू शकेल. समाजातल्या सर्वधर्मीयांना एकत्र आणणे फार गरजेचे आहे. सर्वांना हा उत्सव आपलाही आहे असे वाटणे नितांत आवश्यक आहे. म्हणून तिथं एक ख्रिस्ती धर्माची प्रार्थना, एखादा इस्लामी नाज, यहुदी प्रार्थना, बौद्ध प्रार्थना आणि तत्सम प्रवचन तथा कीर्तनही ठेवता येतं. गोमंतकीयांनाही इतर धर्मांमध्ये चालणाऱ्या प्रार्थना ऐकायला मिळतील. तसंच इतर धर्मीयांना त्यांना मान्य असलेल्या परमेश्वराचं स्वरूप गणेशात अनुभवायला मिळेल. बंधुभावनेनं एकमेकांना समजून घ्यायची मनात इच्छा बाळगून जर असे कार्यक"म केले तर गणेशोत्सवाचे विशाल उद्दिष्ट प्राप्त झाले असे म्हणता येईल. शेवटी गणेशोत्सव लोकांना एकत्र आणायलाच साजरे केले जातात ना! ते कार्य या धार्मिक सोहळ्याच्या सोज्वळ वातावरणातही सहजपणे केलं जाऊ शकते. हळूहळू का होईना या सर्वधर्मसमभावाच्या लहरी निर्माण होऊन एकत्वाची भावना सर्वांना एकत्रित आणील असं मनापासून वाटतं.
सर्वांनी मिळूनमिसळून साजरा केलेल्या या गोव्याच्या देखण्या उत्सवाला भक्तिमय, भावनाप्रधान, ईश्वरमय स्वरूप येतं व हा सण मोठ्या आनंदाने, उमेदीने, उत्साहाने साजरा केला जातो. सगळीकडे आनंदीआनंदाचे वातावरण गोवेकरांच्या मनाला विलक्षण तेज देऊन जाते.

No comments: