गोंयची चवथ

डॉ. सुभाष भेण्डे

चवथ जवळ आली की गोंयकारांची झोप उडते. यावर्षी चवथ कशी साजरी करायची याचे बेत आखले जातात. मुंबईला व्यापार उदीमात रमलेले, नोकऱ्या सांभाळणारे गोंयकार दोन दोन महिने आधी बसून गाड्यांचे आरक्षण करू लागतात. यावर्षी कोण जाणार आणि कोण राहणार याविषयी कडाक्याची चर्चा होते आणि अखेरीस "सर्वांनीच जायचं!' असा नामी तोडगा काढला जातो. मुंबईहून काय काय आणायला हवं याची पुन्हा पुन्हा विचारणा केली जाते आणि हळुहळू मुंबईहून आणायच्या सामानाची यादी वाढत जाते. अगदी शेवटच्या घटकेलासुद्धा चार दोन पदार्थांची त्यात भर पडते.
पोटभर पाणी पिऊन शेतं तृप्त झालेली असतात. भाताची रोपं हातभर वर सरकलेली असतात. श्रावणातले उदंड सण उत्साहात साजरे होतात. श्रावणी रविवारी फुलांच्या झाडावरली पत्री गोळा करून सूर्यपूजा केली जाते. मग रात्री उपवास. श्रावणी सोमवाराचं महात्म्यही तसंच. दुपारी गोडधोड, रात्री उपवास. नव्या युगातल्या सुना सुधारलेल्या. तरीपण जुन्या रूढींविषयी जिव्हाळा बाळगणाऱ्या. श्रावणात अळम्याचं तोणाक खायला मिळणार म्हणून घरात लहानथोर आतुरलेली.
हां हा म्हणता श्रावण सरतो. चवथ येऊन ठेपते. आगरातली कामं थोपवून धरली जातात. श्रीगजाननाच्या आगमनासाठी स्वागताची जय्यत तयारी सुरू होते. चार दिवस खपून सोनेरी वर्खाचं सुबक मखर तयार केलं जातं. मखरामागे मोठा आरसा. मखराच्या पुढल्या भागाला कमळाची, मोराची चित्रं डकवलेली. (चित्रविचित्र चित्रं डकवण्याचं काम अपार उत्साहात चालूच असतं. उत्तरपूजा होऊन श्रीची मूर्ती विसर्जित करण्याची वेळ आली तरी घरातला छोटा बाबुश "राव रे पाच मिन्टां.. हे हत्तीचे चित्र लायता' अशी विनवणी करत असतोच!) पडवीवर श्रीच्या बैठकीची व्यवस्था होते. मग छताला चांगली लांबरूंद माटोळी बांधायची. असोला नारळ, सुपारीचे पिवळे बेडे, पपनस, तवशी, केळीचे घड माटोळीला गच्च लटकतात. घरातल्या बायका तांब्या - पितळेची भांडी चिंचेनं ल"ख घासून पुसून चकचकीत करतात. चंदनाचं गंध उगाळायची सहाण धुवून ठेवतात. तांब्याचा पडगा केंद्रस्थानी ठेवला जातो. कामं करून थकल्यावर बसल्याबसल्या कापसाच्या वाती वळायच्या. समयांची स्थापना होते. दोन दिवस वाती अखंड पेटायला हव्यात. त्यासाठी भरपूर तेलाची पूर्वतयारी.
मग अन्नासाठी दाहीदिशा फिरणारी सोयरे मंडळी तृतियेला दिवसभर, चवथीच्या पहाटे हळुहळू थडकू लागतात. त्यांचं चहापाणी, फराळ, भोजन आटोपता आटोपता मध्यरात्र होते. प्रवासानं थकलेली मंडळी गप्पा मारत झोपेच्या आधीन होतात तोच फटाक्यांच्या धाड्धाड आवाजानं दचकून जागी होतात. चवथीच्या दोन दिवसांत झोपेचं कसलं कौतुक? उरलेले तीनशे त्रेसष्ट दिवस झोपायचं आहेच की!
पहाटे मुलं मुली आगरातली, बागेतली फुलं वेचून आणतात. फुलांची मखराभोवतीची आरास रंगीबेरंगी दिव्यांच्या आराशीहून अधिक शोभिवंत दिसते. बाहेरून आलेले सोयरे-धायरे श्रींच्या सेवेत आपलाही सहभाग या भावनेने कुठे मखरावर चित्र चिकटव, कुठे माटोळीला फळं बांध, मुंबईहून आणलेल्या फटाक्यांची सामग"ी मुलांच्या हवाली कर, यात मग्न होतात. बायका मंडळी भाज्या चिरून ठेवणं, सोलकढीसाठी नारळाचा रस काढणं, नारळ खवणं अशी कामं करताना भूतकालीन चवथीच्या गमतीजमती एकमेकींना सांगण्यात रंगून जातात.
मग अनादी गणपती स्वामी वाजत गाजत येतो. त्याची मूर्ती घरातला कर्ता पुरूष पाटावर बसवून सावधपणे घेऊन येतो. पोरंटोरं भोवती गर्दी करतात. फोगोट्या वाजू लागतात. श्रीगजानन आसनाला टेकून येत्या जात्याला हात उंचावून आशीर्वाद देतो. घरातलं वातावरण एकाएकी मंगलमय होऊन जातं. धुपाचा, उदबत्त्यांचा सुगंध चौफेर दरवळू लागतो.
मग पूजेसाठी भटजीबुवांचा शोध सुरू होतो. भटाला कितीतरी दिवस आगाऊ नोटीस दिलेली असते. पण मागणी प्रचंड. भटांची सं"या मर्यादित. "भट त्या वाड्यार पावला. आत्ता शिरवैंकरांकडे आयलां, हेगडे देसायांकडले लोक ताची वाट पळैतात' अशा "ब"ेकिंग न्यूज' स्वयंभू वार्ताहर अधूनमधून आणत असतात. एरवी भटाला कोणी विचारत नाही. पोटापाण्यासाठी बिचारा अन्य कामं करत असतो. चवथीच्या काळात त्याला प्रचंड भाव! धावीस बिऱ्हाडं त्याची चातकासारखी वाट पाहात असतात. इतक्या घरांतील मंगलमूर्तींची पूजा करून त्याच्या तोंडाला फेस येतो. थकवा येतो. श्रीगजानन सगळं काही निभावून नेतो.
एकदा पूजा पार पडली की भोजनासाठी पानं पडतात. डायनिंग टेबलवर बसायची सवय झालेली मुंबईची व्ही.आय.पी. मंडळी कशीबशी मांडी घालून जमिनीवर बसतात आणि शिवराक जेवणाचा जमेल तसा व जमेल तितका आस्वाद घेऊ लागतात. मुगाच्या गाठी, पातोळ्या, खतखते, आंबाड्याची उडदमेथी, नीरफणसाची कापा ऊर्फ फोडी, तांदळाचा पायस, जिरं घातलेलं वरण असा नामी बेत असतो. एकमेकांना आग"ह करून समस्त जन "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' मोठ्या उत्साहाने व ताकदीने तडीस नेतात. जेवण उरकेपर्यंत अडीच तीन वाजतात. त्यानंतर बायकांची पानं. बायका जेवून उठेपर्यंत पुरुष मंडळी डाराडूर झोपलेली.
संध्याकाळी पुरुषमंडळी पाच घरी जाऊन गणेशमूर्तींचं दर्शन घेतात. त्यासाठी कुणी निमंत्रणाची वाट नाही पाहात. उघड्या दरवाजातून आत शिरायचं, नमस्कार करायचा आणि प्रसाद घेऊन पुढचं घर गाठायचं. कुणी भेटलं तर थोडावेळ गजाली, मुंबईला गर्दी कशी वाढते आहे, महागाई कशी गगनाना भिडते आहे. मॉलचं न मल्टीप्लेक्सचं प्रस्थ कसं पसरतंय याच्या वार्ता गोंयकारांना देऊन पुढे सटकायचं. तोंडओळख असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या "कसो आसा?' प्रश्नाला "घट!' असं उत्तर देऊन मोकळं व्हायचं. स्वतःच्या घरी गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्यांसाठी वृद्ध पिढी उपस्थित असतेच. रात्री परतताना चंद्र दिसणार नाही याची खास काळजी घ्यायची असते. चुकून चंद्राचं दर्शन झालं तर चोरीचा आळ येऊ नये म्हणून शेजाऱ्यापाजाऱ्याच्या कौलावर दगड फेकायचे. घरातून शिव्यांचा आवाज आल्यावर चोरीचा आळ टळला म्हणून समाधानानं परतायचं. (अलीकडे ही भाबडी मंडळी फारशी दिसत नाहीत!)
रात्रीचे दोन प्रहर उलटले की आरत्यांचा धडाका. मग हार्मोनियमवरची धूळ झाडायची. कुणा शेजाऱ्याचा पखवाज, तर कुणाचा तबला. "सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची', "लवथवती विक"ाळा' यासार"या मराठी आरत्यांबरोबरच "शेंदुर लाल चढायो' ही रुचीपालट म्हणून राष्ट्रभाषेतली आरती दणक्यात म्हटली जाते. रात्री पुरुष मंडळींना उपवास. थोडंसं काही तोंडात टाकून भजनाची बैठक सुरू होते. आसपासची मंडळी गोळा होतात. खड्या आवाजातल्या गायकांना प्रचंड मागणी. तुकाराम, एकनाथांपासून सोहिरोबानाथांच्या रसाळ भजनांपर्यंत निवडक भजनांची उजळणी होते. पोरंटोरं भजनांवर ताल धरतात. बायका मागं बसून भजनांचा मनमुराद आस्वाद घेतात.
भजन संपतं तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली असते. झांजा वाजत राहतात. फटाक्यांचे आवाज शांत वातावरणात घुमू लागतात. निजलेली पाखरं त्या आवाजानं पंख फडफडवित उठतात आणि डोळे मिटून अंधारात झेप घेतात. भजन करून थकलेल्या मंडळींना केळीच्या पानावर पंचखाद्य दिली जाते. जिभेवर ठेवली की विरघळणारी ती चविष्ट पंचखाद्य कितीही खा"ी तरी आणखी खावीशी वाटते. भाजलेल्या मुगाचे कण हाताखाली आले की पोटात कसं "गोविंद गोविंद' होतं. प्रसाद अपुरा पडतो. मग पपनसं कापावी लागतात. तवशी चिरणं भाग पडतं. पिकलेल्या केळ्यांचे घड शोधून काढावे लागतात.
दुसरे दिवशी संध्याकाळी श्रींची उत्तरपूजा होईपर्यंत घरात नुसता हैदौस चालू असतो. "शित रोस' हा दुपारच्या जेवणातला महत्त्वाचा पदार्थ. शिवराक जेवणातला सर्वांत "एक्सायटिंग' पदार्थ म्हणजे भजी. बटाट्याची, वांग्याची, मिरचीची. केवढाही ढीग पडो, तात्काळ त्याचा फन्ना. गृहिणी कपाळावरचा घाम पुशीत घाण्यावर घाणा काढत असतात. हास्यविनोदाला ऊत येतो. गेल्या अनेक चवथींच्या आठवणी निघतात. "त्यावेळची मजा आता नाही उरली' अशी नेहमीची तक"ार करता करता ताव मारणं सुरूच असतं.
उत्तरपूजा सुरू असतानाच मागीलदारातून मासळीची आयात होत असते, असा गोंयकारांविषयी प्रवाद आहे. तो कितपत खरा आहे याची कल्पना नाही. गोंयकारांचं मत्स्यावताराविषयीचं आकर्षण अधोरेखित करण्यासाठी तसा आरोप केला जात असावा.
उत्तरपूजा झाली की विसर्जनाची तयारी सुरू होते. संधीप्रकाशात मंगलमूर्तींची मिरवणूक वाजतगाजत खाजणाच्या दिशेने जाऊ लागते. पाऊस नसेल गॅसबत्त्या बाहेर काढल्या जातात. पोरंटोरं उरलेसुरले फटाके बाहेर काढतात. पुढल्या वर्षी लवकर येण्याची विनंती करून गजाननाला जड अंतःकरणाने निरोप दिला जातो.
मंडळी परततात. कुणीच फारसं बोलत नाही. मनं उदास झालेली. काहीतरी महत्त्वाचं हरपल्याची भावना. गजाली सरतात. काहीच नकोसं वाटतं. लवकर निजानिज होते. सगळीकडे शांत शांत होतं.
पुढचा दिवस उजाडतो. मुंबईला, गोव्यातल्या गोव्यात चाकरीच्या गावी जायचे वेध लागतात. बांधाबांध सुरू होते. मात्र, बाजारात आलेल्या बांगुडल्यांचं त्रिफळाचं सुकं दुपारी पानात पडलंच पाहिजे असा पुरुषमंडळींचा कटाक्ष असतो. जमलं तर विस्वणाची पॉस्ता! दबलेल्या आवाजात गप्पा सुरू होतात. निरोपाची बोलणी, पुढल्या वर्षी तीन चार दिवस आधीच येण्याचं अभिवचन.
संध्याकाळी पाखरं आपापल्या घरट्याकडे उडून जातात. मखरापुढची रोषणाई सुन्न होते. कोपऱ्याकोपऱ्यात शुकशुकाट पसरतो. "चवथ बरेबशेन जाली' म्हणत मंडळी आपापल्या कामाला लागतात...

2 comments:

Anonymous said...

बेडे म्हणजे काय?

WEBMASTER said...

बेडे म्हणजे न सोललेली सुपारी