बालपणातला गणेशोत्सव

डॉ. प्रल्हाद वडेर


माझ्या आठवणीतला गणेशोत्सव म्हणजे 60 - 70 वर्षांपूर्वीचा काळ. माझं गाव पुणे - बेळगाव रस्त्यावरचं कणगले हे एक छोटंसं खेडेगाव. (हातकणंगले हे गाव वेगळं. ते प्रा. म. द. हातकणंगलेकरांचं!) जेमतेम 500 उंबऱ्यांचं आमचं गाव. ब"ाह्मणांची घरं अवघी पाच किंवा सहा. इतर वस्ती मराठे, महार, साळी, माळी, जैन व मारवाडी गुजर यांची. त्यामुळं तिथं गणेशोत्सवाचा आजच्यासारखा थाट नव्हता. त्याचे मार्केटिंगही झालेलं नव्हतं. टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं वारंही आमच्या गावात पोहोचलं नव्हतं. ते मी शिकत असलेल्या सात मैलांवरच्या निपाणी या छोट्याशा शहरात नंतर नंतर सुरू झालं होतं.
माझ्या लहानपणीचा गणेशोत्सव हा पूर्णपणे कौटुंबिक व धार्मिक स्वरूपाचा होता, पारंपरिकतेने आलेला होता. माझे पणजोबा व वडील (आजोबा अकाली गेले होते) यांत गणपतीच्या सणात पणजोबांचाच उत्साह अधिक होता. आमच्या दुमजली घराच्या पुढच्या सोप्यात ठराविक कोनाड्यात गणपतीची प्रतिष्ठापना होत असे. वर्षानुवर्षे ती जागा बदलत नसे. चतुर्थीच्या आधी दोन चार दिवस त्या कोनाड्याला पांढराशुभ" चुन्याचा हात दिला जाई व तांबड्या किंवा हुरमुजी रंगानं थोडीशी पानाफुलांची नक्षी तसेच "श्री गजानन प्रसन्न' अशी अक्षरं गावातला दत्तू पेंटर येऊन काढत असे. बाकी सजावट बिजावट काही नसे. मखर वगैरे किंवा गोव्यातली माटोळी या प्रथा नव्हत्या.
गजाननाची मूर्ती कुंभार ग"ीतून आदले दिवशी संध्याकाळी साधेपणानं (म्हणजे वाजत गाजत नव्हे) आणली जाई. ती आणताना घरातल्या लहान मुलांची कुंची घालण्याची प्रथा होती. मूर्ती आदल्या दिवशी आणण्याचं कारण पणजोबांना पहाटे उठून घरच्या गणपतीची प्रतिष्ठापना, पूजा उरकून इतरांच्या मूर्तींच्या प्रतिष्ठापना करायला जायचं असे. दुपारी आरती वगैरे करून दीडेक वाजता सावकाश नैवेद्य दाखवला जाई. आरत्या सुध्दा पारंपरिक असत. साधा झांजेचा ठेका असे. त्यावेळी आमच्या इथं फटाके उडविणं वगैरे काही नव्हतं. ते फक्त दिवाळीत. तेही लहान मुलं असल्यास, मोठे फटाके न लावता फुलबाज्या, चंद्रज्योती अशा काही निरुपद्रवी फटाक्यांचा वापर केला जाई.
गणपतीची मूर्ती त्याला कुंची घालून पाटावर ठेवून पणजोबाच घरी आणत. त्यावेळी मी त्यांचा एकुलता एक नातू (मला बहीण, भाऊ कोणीच नव्हतं) त्यांच्याबरोबर असे. वडील अशा धार्मिक गोष्टीत, पूजापाठ वगैरेंत लक्ष घालत नसत. ब"ाह्मण म्हणूनही ते कुठे जात नसत. ते प्राथमिक शिक्षक होते आणि त्यांचा भटजी म्हणून जाण्यालाही विरोध असे. श्राध्दपक्षाचे भटजी म्हणून तर ते कोठेच, कधीच जात नसत, चक्क नकार देत. पणजोबांना खरं तर मला गावातला एक उत्तम भटजी बनवायचं होतं. त्यामुळे मी इंग"जी शाळा शिकू नये म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला होता. पण वडील बधले नाहीत आणि मी भटजी व्हायचा वाचलो. नाहीतर मी प्राध्यापकाऐवजी वेदशास्त्रसंपन्न (वे. शा. सं.) भटजी झालो असतो.
आता पुन्हा गणेशोत्सवाकडे वळूया. त्या काळात गणेशोत्सवाला उत्सव म्हणता येणं कठीण होतं. कारण उत्सवाची अशी कोणतीच चिन्हं त्यात सापडली नसती. धर्म हा घरच्या उंबऱ्यातच राहिला पाहिजे, तो बाहेर सार्वजनिक रूपात येता कामा नये हाच जणू त्यावेळचा दंडक होता. तो किती योग्य होता हे आज धर्मानं सगळीकडे पसरलेल्या हातापायांवरून कळून येते. सकाळी यथासांग पूजा, दुपारी आरत्या, नैवेद्य वगैरे झाल्यावर जेवण. आमचा गणपती कोकण किंवा गोव्यासारखा दीड दिवसांचा "मेहमान' कधीच नसे. तो कमीत कमी सहा किंवा सात दिवसही मुक्काम ठोकून असे. पहिल्या दिवसाच्या मोदकांनंतर मग गोड खीर, कधी पुरणपोळ्या असा नैवेद्याचा बदलता "मेनू' असे. गौरीचं आगमन झाल्यावर तिसरे दिवशी चक्क पालेभाजी, ज्वारीची भाकरी, नाचणीचे आंबील असा खास "गावरान' बेत असे. त्याच्या दुसऱ्या दिवशी गौरीसह गणपती विसर्जनाचा दिवस येई. गणपतीच्या मूर्तीचं सोवळं ओवळं कटाक्षाने पाळलं जाई. आज जशी पुण्याच्या दगडूशेट गणपतीची आरती कोणीही, कशीही करतो तसा प्रकार तेव्हा नव्हता. सोवळं नेसूनच पूजा, आरती करावी लागे. त्यासंबंधात आम्हा मुलांना मोठ्यांकडून ओरडून घ्यावे लागे, तर कधी दोन चार धपाटेही खावे लागत. स्त्रियांच्या मासिक पाळीचा तर आम्ही धसकाच घेत असू. इतकं सगळं वातावरण अत्यंत कर्मठ सोवळ्यातलं असे. कुठं कुणा अशा स्त्रीच्या कपड्यावर पाय पडला, हात लागून शिवाशीव झाली की सचैल आंघोळ करण्याशिवाय गत्यंतर नसे. अशा वेळी गणपतीचं सोवळं ओवळं, पावित्र्य कटाक्षानं पाळलं जाई. गणेश चतुर्थीच्या त्या सहा सात दिवसांत एक दिवस संध्याकाळी "मंत्रपुष्पांजली' नावाचा कार्यक"म काही घरांमध्ये होत असे. म्हणजे संध्याकाळ झाल्यावर पाच - सहा ब"ाह्मण घरी येऊन मंत्राची आवर्तने करीत. त्याला "देवे' म्हणत. हे देवे म्हणण्याची एक स्पर्धा असे. "ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानी धर्माणि प्रथमान्यसन' हे मंत्रपुष्प दोन रांगांतल्या ब"ाह्मणांकडून म्हटलं जाई. एका रांगेत दोन ओळी म्हटल्या की दुसऱ्या ओळीतील ब"ाह्मणांचा आवाज चढत असे. पुन्हा पहिल्या ओळीकडं त्यापेक्षा मोठ्या आवाजात मंत्रपुष्पाचा घोष होई. असा गजर एक दीड तास होत असताना घर त्या आवाजात भरून जाई आणि अगदी
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति।।
हे मंत्रपुष्प समाप्त होईपर्यंत चालू राही. आम्हा मुलांना ब"ाह्मणांची ती तारस्वरात मंत्रपुष्प म्हणण्याची स्पर्धा फार मजेशीर वाटे. त्यानंतर प्रत्येक ब"ाह्मणाला बेसन लाडू, दडपे पोहे व मसाल्यांचं दूध भरपूर प्यायला दिलं जाई. हाच कार्यक"म अन्य ब"ाह्मणांच्या घरीही कमीअधिक फरकानं होई. अर्थात हे मंत्रपुष्प दरवर्षी होत असे असं नव्हे, पण ते जेव्हा होई तेव्हा दणक्यात संपन्न होई, "मेनू' मात्र तोच असे. आत्तासारखं फरसाण तेव्हा नव्हतं. चिवडा, चकली दिवाळीतच होत असत. म्हणून त्यात नावीन्य वाटे. आता हे पदार्थ नेहमीच मिळत असल्याने त्यातील मजाच गेलीय.
शेवटच्या दिवसाचा कार्यक"मही असाच एकत्रितपणे होई. आमच्या गावाला समुद्र सोडाच, पण तरही नव्हती. होता तो उथळ वाहणारा ओढा. त्याकाळी गणेश विसर्जन तेथे होत नसे, ते होई आमच्या घराच्या खालील बाजूस असलेल्या विहिरीत. तिथलंच पाणी आम्ही इतर वापरासाठी, तर पिण्याचं पाणी ओढ्यावरील छोट्याशा डोहातून आणलं जाई. एरवी स्वच्छ घासलेल्या कळशांतून व उन्हाळ्यात माठातून त्याचा वापर होई.
संध्याकाळी चारच्या सुमारास गणपतीची उत्तरपूजा सुरू होई. नेहमीच्या पूजेप्रमाणेच सोवळं नेसून गंध, अक्षता, फुले वाहून नैवेद्य दाखवून आरती सुरू होई. ते झाल्यावर सर्वांनी नमस्कार घालून आशीर्वाद घेतल्यावर मग पाटावरील गणेशमूर्ती किंचित हलवून "पुनरागमनायच' ची प्रार्थना होई. घरापासून जवळच असलेल्या विहिरीकडं गणेशमूर्ती पाटावरून नेली जाई. तेथे सर्व मंडळी जमत आणि दोर बांधलेल्या बादलीत मूर्ती बसवून दोन तीन वेळा वर घेऊन शेवटी पाण्यात सोडली जाई. तेव्हा आम्हा मुलांना खूप वाईट वाटे. पहिल्यांदा तर ही मोठी मंडळी एवढी सुंदर मूर्ती विहिरीत का सोडतात असं वाटून त्यांचा खूप राग येई. गणपतीला निरोप देऊन आम्ही जड मनानं सर्वजण घरी येत असू. गणपतीच्या रिकाम्या पाटावर एखादं भरलेलं भांडं ठेवलं जाई. निर्माल्य, फुलं, कापसाची वस्त्रंं वगैरे सर्व गोळा करून गणपतीबरोबरच त्याचं विसर्जन झाल्यामुळे तो संबंध कोनाडा अगदी सुनासुना वाटे. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' ही घोषणा नंतर कित्येक दिवस कानांत घुमतच असते. रात्री जेवण सुध्दा धड जात नसे, इतका त्या मूर्तीवर आमचा जीव जडायचा. तो विरह आम्हाला खायला येई. गणपतीबरोबर घरातील गौरीचंही विहिरीत विसर्जन होई. गणपती आधी येई, मग गौरी. मात्र दोघं मिळून आम्हाला विरहात टाकून निघून जात.
असा हा गणपती उत्सवाचा घरगुती मामला होता. त्यात थाटमाट, दिखाऊवृत्ती, डामडौल नव्हता. त्यात खरी श्रद्धा होती, भक्तीचा जिव्हाळा होता, प्रेमाचा ओलावा होता. गणेश उत्सवाचं मार्केटिंग नंतर झालं. मी निपाणी शहरात हायस्कूलमध्ये शिकायला गेलो, तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव प्रथम पाहिला. रोज व्या"यान, कीर्तन, चर्चा दहा दिवस प्रथमच ऐकली. मुंबईत गेल्यावर तर तेथील प्रचंड मंडप, रोषणाई, नृत्य, नाट्य, गायन आदी कार्यक"म पाहिले. गणपतीच्या प्रचंड मूर्ती, हालते देखावे, यांत्रिक करामती, आकर्षक रोषणाई डोळे दिपवणारी होती. मोठ्या माणसांनी तसेच अगदी नटांपासून पुढाऱ्यांपर्यंत लोकांनी केलेल्या आरत्या पाहिल्या.
पण माझ्या मनात आहे तो माझ्या बालपणातील गणेशोत्सव नव्हे तर सण. पिवळा किंवा लाल पीतांबर नेसलेली, दागिने, हार घातलेली, एका हातात लाडू, इतर हातात शस्त्रे व एक हात आशीर्वाद देण्यासाठी उचललेली अशी, प्रसन्न चेहऱ्याची गणपतीची मूर्तीच आजही माझ्या डोळ्यांसमोर येते. आज गणपती "ग्लोबल' झालाय, पण त्याच्यात मी लहानपणी जे पाहिलं "ते' नाही असंच मला वाटतं. कारण त्यावेळी "ते' प्रत्येकात आतून होतं, आज "ते' कुठंही दिसत नाही...

No comments: