लोकजीवनातील श्रीगणेश

पु. शि. नार्वेकर

श्रीगणेशाला गोव्याच्या लोकजीवनात जितके महत्त्व आहे तितके अन्य कोणत्याही देवतेला नाही, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. गणपती हा सर्व आबालवृद्धांचा आवडता देव. गणेशचतुर्थी जवळ येताच विशेषतः मुलांमध्ये एक नवचैतन्य संचारते. गणेशचतुर्थीच्या निमित्ताने शाळेला आठ - दहा दिवसांची सुटी असते. गणपती यायला अजून चार दिवस बाकी असले तरी ही मुले फटाके उडविण्यात दंग असतात. फटाक्यांची माळ एकदम लावायची नाही. ती सुटी करायची आणि फटाके खिशात भरून ठेवायचे. हातात एक पेटलेली उदबत्ती. तिला सुट्या फटाक्याची वात लावायची. सुर्रर्र आवाज झाला की ती फटाकी वर उडवायची. ठोऽऽ असा आवाज झाला की बालमंडळी खूष! कधीकधी फटाका हातातच फुटायचा व हात भाजायचा. पण त्याची फारशी चिंता नाही. भाजलेल्या हाताला तेल लावून स्वारी पुन्हा फटाके उडवण्यात दंग. आई ओरडायची, पण तिकडे लक्ष द्यायचे नाही. हा मुलांतील उत्साह पाहिला की वाटते, चतुर्थी हा खरोखरच मुलांचा सण.
देशात अनेक राज्ये आहेत. तेथील लोकजीवनात वेगवेगळ्या सणांना महत्त्व आहे. गणपती सगळीकडे आहे, पण त्याची फारशी अपूर्वाई नाही. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, त्यामुळे घरात पुजल्या जाणाऱ्या गणपतीला फार महत्त्व नाही. बंगालमध्ये दुर्गापूजा महत्त्वाची. महाराष्ट्रात दिवाळीचा सण मोठा. गोव्यातही दिवाळीचा सण साजरा होतोच. अलीकडच्या काळात तर नरकासुराने गावोगावी थैमान मांडले आहे, पण जुन्या काळात हे प्रकार फारसे नव्हते. गोव्यात बहुतेक सण साजरे होतात. पण गणेशचतुर्थीचे महत्त्व त्यांना नाही. शहर असो वा खेडेगाव, तेथील घराघरांतून गणपती मोठ्या भक्तिभावाने पुजला जातो. त्याची पूजा करण्यात, भजन करण्यात, आरत्या म्हणण्यात सारा गाव दंग असतो. शहरांपेक्षा खेडेगावांत गणपतीचा बडेजाव मोठा. आज खेडेगाव पूर्वीसारखा एकमेकांपासून तुटलेला राहिलेला नाही. सगळीकडे पक्के रस्ते झालेले आहेत. त्यावरून बसेस धावताहेत. लोकांचा शहरांशी संपर्क मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जुन्या काळी तो फारसा नव्हता. त्यामुळे खेडेगावांतील लोकांचा गावातील लोकांशीच संपर्क जास्त असायचा. दिवाळीच्या दिवशी तर आपापल्या वाड्यावरील लोकांकडे पोहे खाण्यासाठी जाण्याची प्रथा खेडेगावात होती. आज ती फारशी उरलेली नाही. शहरे महानगरे बनत आहेत, तर खेडेगावातील खेडेपण लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
गोवामुक्तीपूर्व काळात खेडेगाव पूर्णतः मागासलेले होते. अनेक गावांत धड प्राथमिक शाळाही नसायची. एखाद्या खोपटीवजा जागेत एकदोन चहाची हॉटेले दिसायची. गावात भुसारी किरणामालाचे एखादे दुकान असायचे. बहुतेक लोक शेती - व्यवसायात गुंतलेले असायचे. शेती पावसावर अवलंबून असल्याने शेतीउत्पादनही तुटपुंजे असायचे. त्यामुळे गावात गरीबी दिसायची. मजुरीची कामे करू इच्छिणारे लोक पुष्कळ असायचे, पण काम मिळत नव्हते. त्यामुळे लोकांच्या हाती पैसा नसायचा. चतुर्थी जवळ आली की त्यांच्या पोटात धाकधूक सुरू व्हायची. कसा साजरा करणार चतुर्थीचा सण, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहायचा. पण अशावेळी गावात असलेले भुसारी दुकानदार त्यांचा प्रश्न सोडवायचे. चतुर्थीच्या सणासाठी हवे असलेले धान्य, कडधान्य, गूळ, तेल इत्यादी जिन्नस त्यांना उधार द्यायचे. अट एकच - महिन्याभरात त्याने उधारी फेडायची. तोवर शेते पिकून पिवळी व्हायची. गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचमीला शेतातील पिवळट झालेली भाताची कणसे आणून दाराला बांधायची प्रथा आजही खेडेगावात आहे.
जुन्या काळातील खेडेगावातील घरे म्हणजे मातीच्या भिंती व कौलारू छप्परे. आमचे गाव तर फारच मागासलेले. बहुतेक घरांच्या भिंती "कारवां' नामक जंगली काठ्यांच्या. त्यावर मातीचा गिलावा. छप्पर गवताचे व माडाच्या चुडतांचे. घर कसेही का असेना, चतुर्थीच्या दिवशी गणपती येणारच. श्रीगणेश हा असा एक देव आहे की त्याच्याजवळ गरीब-श्रीमंत असा भेदभाव नाही. जातीपातीचाही भेदभाव नाही. हा सर्वांचाच देव. सर्वांना सुख देणारा व दुःख हरण करणारा. त्याचा अभय देणारा वरदहस्त पाहिल्यावर संसारतापाने पिडलेल्या लोकांना केवढा तरी दिलासा मिळायचा.
झोपडीचे प्रवेशद्वार तर इतके बुटके की बुटक्या इसमालाही वाकूनच आत प्रवेश करावा लागायचा. आत पाहिले तर एका मेजावर गणराया आरामात लोडाला किंवा सिंह, मोर, हंस यांना टेकून बसलेला. पिवळा-लाल पीतांबर, खांद्यावर हिरवा-गुलाबी शेला, डोक्यावर सोन्याचा मुकुट, गळ्यात सोन्याचा रत्नजडित हार, हातात-दंडात सोन्याचे अलंकार. असा हा गजानन प्रसन्नपणे भक्तांकडे पाहताना भासायचा. डाव्या हातात बहुधा मोदक असायचा किंवा आणखी काही. पण उजवा हात मात्र वरदहस्त. काही गणपती वेगवेगळी रूपे धारण करणारे. पण कितीही वेषांतर केले तरी भक्त त्याला ओळखतातच. कारण बालपणापासूनच त्यांचा तो सवंगडी!
आज गोव्यातील खेडेगावांतसुद्धा वीज पोचली आहे. चतुर्थीच्या सणात तर घरात विजेचा लखलखाट असतो. दरवाजात गणपतीच्या मागेपुढे, मखरावर विजेच्या रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांची रोषणाई केली जाते. गणपतीच्या डाव्या-उजव्या बाजूला पितळी समया तेवत असतात. विजेच्या झगमगाटात त्यांचा उजेड किती पडणार? पण जुन्या काळी खेडेगावात वीज नसायची. त्या समयांच्या प्रकाशातच गणरायाच्या मुखावरचे तेज झळकायचे. त्या बालपणीच्या काळात आम्ही मित्र गावातील प्रत्येक घरात जाऊन गणपतीचे दर्शन घेत असू. गावाची विभागणी तीन भागांत झाली होती. नदीवर पोर्तुगीजकालीन पूल होता. त्याच्या पलीकडेही काही वाडे होते, पण ते दूर असल्याने आम्ही तेथील गणपती पाहण्यासाठी जात नव्हतो. आमचा वाडा मध्यभागी होता. दक्षिणेकडे रेल्वे स्टेशन होते. त्याच्या पलीकडे काही घरे होती. बहुतेक रेल्वेत काम करणाऱ्या लोकांची. इतरही काही लोकांची होती. आज बहुतेक घरे पक्क्या बांधकामाची झालेली आहेत. पण जुन्या काळी त्या गवती छप्पराच्या झोपड्या होत्या. आम्ही मुले त्या काळी या सगळ्या घरांतील गणपती पाहायचो.
आजही पंचमीच्या दिवशी लहानमोठे सर्वजण गणपती पाहण्यासाठी जातात. उघडीप असली तर एखादेवेळी पाऊसही हजेरी लावतो. त्यावेळी लोक गणपतीदर्शनाला फारसे जात नाहीत. तरीसुद्धा पाच गणपती पाहायला हवेत अशी लोकांची श्रद्धा दिसते.
चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका व"त असते. "तृतीया' या शब्दाचा अपभ"ंश होऊन "तय' शब्द झाला. या दिवशी बायका उपवास करतात. पूर्वी हिमालयकन्या पार्वतीने भगवान श्रीशंकरच आपल्याला पती मिळावा म्हणून तप केला होता, ते हे व"त. सर्वच बायका त्या दिवशी उपवास करतात, पण सगळ्याच घरांत ही "तय' पुजली जात नाही. काही घरांत "देवी' पुजली जाते. हेसुद्धा पार्वतीचेच एक रूप. पण ती आता "गौरी' राहिलेली नसून "दुर्गा' झालेली आहे. महिषासुरमर्दिनी हे तिचे उग" रूप असते. तिच्या या रूपाला बालगणेश भितो म्हणून हे व"त पंचमीच्या रात्री गणपती पोचविल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे षष्ठीला येते. क्वचित ती तिथी तिसऱ्या दिवशी येते. काही घरांत गणपती राहिलेला असतो. आता थोडा वयाने मोठा झालेला असला तरी तो बालगणेशच असतो. ही देवी म्हणजे, घरातील सौभाग्यवतीने विहिरीवर जाऊन (आता नळावर) पाण्याने भरून आणलेला कलश. त्यात एका विशिष्ट जातीच्या झुडपाची फांदी. काही घरांत त्या देवीला मुखवटे घालतात. कलश आणताना त्या स्त्रीच्या तोंडात पाणी असते. पुढे घरातीलच एखादी मुलगी चुना घातलेले पाण्याचे भांडे घेऊन चालत असते. ती ज्याप्रमाणे जमिनीवर ते पाणी टाकीत असते त्याच ठिकाणी त्या स्त्रीने पाऊल ठेवायचे असते. अशा प्रकारे मिरवणुकीने "देवी' पुढील दाराने घरात प्रवेश करते.
गणपती आदल्या रात्री आपल्या गावी गेलेला असला तर प्रश्नच नाही, पण तो राहिलेला असला तर काय करायचे? अशावेळी गणपती आणि ती येणारी देवी यांच्यामध्ये पडदा धरून तिला आत आणायचे. गणपती गेलेला असला तर त्याच्या आसनावरच देवीला ठेवायचे, अन्यथा आत देवघरात. हे व"त तीन दिवसांचे असते. गौरीआवाहन, पूजन आणि विसर्जन. हे व"त स्त्रियांचे असल्याने त्यांनीच पूजाविधी करायचा असतो. पण सगळ्याच कुटुंबांत हे व"त नसते. विशेषतः ज्या घरात हरितालिका पुजतात त्या घरी हे नसते.
वास्तविक पाहता चतुर्थीच्या दिवशी गणपतीबरोबरच शंकर-पार्वतीची स्थापना त्याच्या उजव्या बाजूला झालेली असते. फुलझाडांच्या डहाळ्या असलेल्या जुडीभोवती गौरीचे चित्र असलेला कागद गुंडाळून तिच्या गळ्यात मंगळसूत्राचे काळे मणी असलेली दोरी बांधली जाते. गणपतीबरोबर शिव-पार्वतीचीही यथासांग पूजा केली जाते. चतुर्थीच्या दिवशी गणेश बालक असतो. म्हणून एकाच पानावर मातापुत्राला नैवेद्य असतो. तत्पूर्वी गणेश हा मोदकप्रिय असल्याने त्याला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. गणपतीचे वाहन उंदीर. त्याच्यासाठीही वेगळे पान असते.
गणेशाला सर्वजण बालरुपातच पाहतात. घरातील लहान मुलांवर करावे तसे त्याच्यावर प्रेम करतात. अन्य देवतांच्या मूर्तींचे दर्शन घेताना जशी भयमिश्रित श्रद्धा वाटते तशी चतुर्थीच्या गणपतीविषयी वाटत नाही. हा तर कुटुंबातील सर्वात धाकटा मुलगा. सर्वांचाच लाडका. तो मग लंगोटी लावलेला बालरूपातील असो किंवा लालपिवळा पीतांबर नेसून सिंहासनावर बसलेला प्रौढ गणपती असो, सर्वजण त्याच्याकडे लहान मुलाकडे पाहावे तसे कौतुकाने पाहतात. गणपतीचे हे स्थान शिवविष्णूलाही दुर्मीळ. याबाबतीत त्याच्याशी तुलना करायचीच तर यशोदेच्या मांडीवर बसलेल्या किंवा तिची नजर चुकवून देवाच्या नैवेद्यासाठी बनविलेले लाडू देवाला दाखविण्यापूर्वीच खाणाऱ्या नंदकिशोराशीच करता येईल.
श्रीगणेशाचे आगमन होणार म्हणून घरात केवढा उत्साह, केवढी गडबड. पुरुषमंडळी सजावटीच्या कामात दंग, तर स्त्रीवर्ग करंज्या, मोदक बनविण्याच्या कामात गढलेला. मुलांना उद्योग फटाके उडवण्याचा तर मुली दिवस उजाडण्याआधीच परसबागेत किंवा जेथून मिळतील तिथून पत्री आणण्यासाठी गेलेल्या. जाई, जुई, मोगरा, चमेली, शेरवड, कर्णा, जास्वंदी किती विविध प्रकारच्या फुलझाडांची पत्री. फुलेही किती विविध प्रकारची. त्यातील लाल जास्वंदीचे फूल तर गणरायाला अधिक प्रिय. पत्री आणि फुले खुडून आणण्याची जबाबदारी लहान मुलींची. सोबत दूर्वाही हव्यात. कारण गणेश दूर्वाप्रिय.
इतक्यात गणरायाचे आगमन होते. घरातील सौभाग्यवतीने दारात पाट मांडून ठेवलेला असतो. त्याच्याभोवती घाईघाईने रांगोळी काढलेली. बाजूस समई ठेवलेली. गणपती दारात येताच गृहिणी मूर्ती आणणाऱ्या इसमाच्या पायावर आधी तांब्यातील पाणी ओतते. (अर्थात ते गणेशाचेच पादप्रक्षालन.) नंतर त्या मूर्तीभोवती उदबत्ती ओवाळून त्याचे स्वागत करते. मूर्ती पाटावर ठेवली जाते.
घरातील मुले, मुली, स्त्रिया सगळी मूर्तीभोवती गोळा होतात. कसा असेल गणराया? सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते. वरचे कागदी आच्छादन काढले जाते. "वा! सुंदरच मूर्ती आहे!' मूर्ती कशीही असली तरी घरातील स्त्रिया हेच उद्गार काढतात.
स्वागताचा हा औपचारिक विधी पार पडल्यानंतर स्नान वगैरे करून शुचिर्भूत झालेला घरातील ज्येष्ठ पुरुष मूर्ती मेजावरील चौपाईवर ठेवतो. तेथे मखर वगैरे आधीच तयार असते. गणपतीमहाराज आसनस्थ होतात. त्यानंतर पूजन, आरती, नैवेद्य इत्यादी.
कुठल्याही गावातील कुठलेही घर असो, गणपतीची आरती "सुखकर्ता दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची' याच पारंपरिक आरतीने सुरुवात होते आणि समाप्ती "घालीन लोटांगण वंदीन चरण' या कर्पुर्रातीने होते.
चतुर्थी आणि पंचमीच्या दिवशी घराघरांतून भजन-आरत्यांचे कार्यक"म चालूच असतात. गावात एखादे भजनी मंडळ बहुधा असतेच. त्याचे गट पाडले जातात. कुणी कुणाच्या घरी आरत्या करायच्या ते ठरविले जाते. "सुखकर्ता' ही आरती व "घालीन लोटांगण' कटाक्षाने म्हटले जाते. त्यापेक्षा जास्त काही म्हणणे मंडळाला शक्यच नसते, कारण वेळ थोेडा, घरे जास्त. मु"य भजनाचा कार्यक"म मग पंचमीच्या मध्यरात्री जेव्हा सगळे गावातील गणपती चौकात येऊन रांगेने बसतात तेव्हा साग"संगीत होतो. अर्थात पर्जन्यराजाने सौजन्य दाखविले तरच.
फुगड्या हा स्त्रियांचा खास कलाप्रकार. पूर्वी खेडेगावातील गणपतीसमोर फुगडी ही असायचीच. वाड्यावरील महिलावर्ग प्रत्येक घरात जाऊन एकदोन तरी फुगड्या घालायचा. पण जुन्या काळातील स्त्रियांना जशी फुगड्यांची हौस होती, तशी ती आता शाळा-कॉलेजात जाणाऱ्या मुलींमध्ये दिसत नाही. त्यामुळे एकूणच फुगडी हा कलाप्रकार आता स्पर्धात्मक कार्यक"मांपुरताच उदाहरण बनून राहिला आहे.
काही गावांतून पूर्वापार एक प्रथा चालत आलेली असून ती अजूनही टिकून राहिलेली दिसते. एका वर्षी दीड दिवसाचा गणपती तर त्या पुढच्या वर्षी पाच दिवसांचा. हा नियम सगळ्या गावासाठी, किमान वाड्यांसाठी तरी असतो. इतरत्र दीड दिवसाचा नियमित व स्वेच्छेनुसार किंवा नवसपूर्ती म्हणून पाच, सात, नऊ दिवसांचा गणपती ठेवला जातो. काहीजण गणपती ठेवला तर चौथ्या- पाचव्या दिवशी सत्यनारायण पूजा करतात. पण तसा नियम नाही.
श्रीगणेशचतुर्थीसंबंधात लिहिताना त्या बनविणाऱ्या मूर्तिकारांचा आवर्जून उ"ेख केला पाहिजे. हा केवळ धंदा नसून ते परंपरेने चालत आलेले एक व"त आहे असे ते मानतात. गोव्याची लोकसं"या खूप वाढलेली आहे. तुलनेने गणपतींची सं"याही वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी गोव्याबाहेरून प्लास्टर ऑफ पॅरिसचे आणि मातीचेही गणपती आणले जातात.
जुन्या काळी एकत्र कुटुंबपद्धती होती. नोकरीव्यवसायाच्या निमित्ताने अनेकजण शहरी जात. तिथेच स्थायिक होत. पण चतुर्थीला ते सहकुटुंब मूळ घरात येत. आज परिस्थिती बदललेली आहे. एकाच गावात दोन स""या भावांची दोन वेगळी घरे असली तर गणपतीही दोन असतात. कुणी गावात नवीन घर बांधले की चतुर्थीच्या पहाटे त्याच्या दारात गणपतीची मूर्ती ठेवणारे उत्साहीही असतात.
पंचमीच्या रात्री उत्तरपूजा झाल्यानंतर श्रीगणेश आपल्या जावी जाण्यास निघतो. गावात नदी किंवा ओढा त्यांचे विसर्जनस्थळ असते. पूर्वी पुरुषमंडळीच फक्त गणपती पोचवायला जात. आज घरातील बायकामुलेही उत्साहाने जातात. फटाक्यांचा कडकडाट चालू असतो. टाळमृदंगासह भजनीमंडळ आघाडीवर असते. कधीकधी या मिरवणुकीत सामील होण्यासाठी वरुणदेवही आपल्या सैन्यासह येतो. लोकांचा गजर चालू असतो- "गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...'

No comments: