बाप्पा मोरया रे...

- प्रदीप तळावलीकर


पंचमीच्या संध्याकाळी गणपती पाहायला बाहेर पडण्याचा कार्यक्रम पंधरा-वीस वर्षांपूर्वी ज्या उत्साहाने होत होता तसा उत्साहाने होत असलेला हल्ली दिसत नाही. पाच गणपती पाहिले की झाले अशीच वृत्ती दिसते. पण देखाव्यांच्या संख्येत मात्र प्रतिवर्षी वाढ झालेली दिसते.





‘नेमेचि येतो मग पावसाळा’ असे जे नेमाने आणि नियमाने येत असते किंवा होत असते त्याबाबतीत म्हटले जाते. तद्वत यंदाची गणेशचतुर्थी उंबरठ्यावर आहे. गणेशचतुर्थी म्हटली की बाल असो की वृद्ध, अबला असो की सबला, साधू असो की संत, लेखक असो की वाचक, गरीब असो की श्रीमंत- सार्‍यांनाच प्रिय असते. आमच्यासाररखा वृद्धत्वाच्या सीमेवर लुडबुड करणार्‍यांना मग आपल्या बालपणातील चवथ आठवायला लागते आणि मन तासन्‌तास त्या आठवणीत गुंतून पडते... तेव्हा आज मी तेव्हाची आणि आताची अशा दोन कालखंडांतल्या चतुर्थीची गंमत अनुभवणार आहे.
कालची चवथ...
मला आठवते ती माझी पहिली चवथ. मी जेमतेम साताठ वर्षांचा असेन, तेव्हाची! आम्ही म्हणजे आमचे कुटुंब जरी पणजीला स्थायिक झालेले असले तरी चतुर्थीला आम्ही आमच्या फोंडा तालुक्यातल्या तळावली गावात जायचो. गावातल्या घरी गेल्याबरोबर पहिला प्रोग्राम असायचा तो म्हणजे गणपतीशाळेत जाऊन आमचा तयार होणारा गणपती पाहाण्याचा. आजोबांबरोबर मग आम्ही तळावलीपासून जवळच असलेल्या नागेशी गावी गणपती पाहायला जायचो. तो बघण्याचा कार्यक्रम आटोपल्यावर दुसरा प्रोग्राम असायचा तो फोंड्याला जाऊन माटोळीसाठी आणि एकंदर उत्सवासाठी फळफळावळ आणि भाजी आणण्याचा. या पहिल्या दोन दिवसांत रात्रीच्या वेळी मखर रंगवायचा कार्यक्रम व्हायचा आणि दिवसा माटोळीला फळ-भाज्या बांधण्याचा.
हे सगळे तयार होईपर्यंत मग तृतीया म्हणजेच तय उजेडायची. परंपरेनुसार आमच्याकडे चतुर्थी तीन दिवस साजरी व्हायची. तय, चवथ आणि पंचम. तयेच्या दिवशी पार्वती आणि शंकराची पूजा व्हायची. चवथीच्या दिवशी त्यांच्याबरोबर गणपतीचीही आणि पंचमीच्या दिवशी संध्याकाळी गणपतीची उत्तरपूजा झाल्यावर मग विसर्जनाचा सोहळा व्हायचा. चतुर्थी आणि पंचमीच्या रात्री आरत्यांना फार धमाल यायची. कारण गावातले गावकरी आरत्यांना आमच्या घरी यायचे. ते सगळे घुमट आरत्या करायचे. फारच मजा यायची. त्यामानाने लहानशा असलेल्या त्या गावच्या घराच्या हॉलमध्ये जवळजवळ सत्तर-पंचाहत्तर लोक आरत्यांसाठी जमा व्हायचे. हॉलमध्ये आरत्या आणि आतल्या खोलीत प्रसादाचे द्रोण भरण्याची बायकांची लगबग, तर बाहेर पडवीत अस्मादिक आणि मित्रमंडळी पणजीहून येताना आणलेल्या माकावच्या फोगाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत. पंचमीच्या दिवशीची धावपळ साधारण अशी विभागलेली असायची. आरत्या वगैरे झाल्यानंतर मग पुजारी उत्तरपूजा सांगायचे आणि अचानक आमच्या लहानग्या मनावर बाप्पा आता घरी जाणार म्हणून एकप्रकारची रुखरुख लागून राहायची. विसर्जनासाठी जवळजवळ मैलभर चालून जावे लागायचे. त्यामुळे मूर्ती डोक्यावर घेऊन जायला आमच्या कुळागरांतील एकजण यायचा. त्याच्या मागे मग आमच्या घरातील वडीलधारी मंडळी आणि मग मध्ये मध्ये आम्ही लहानगी मंडळी. त्याकाळात घरातल्या बायकांनी बरोबर यायची प्रथा नव्हती. कारण कदाचित बरेच चालावे लागायचे हे असेल. पण आमची एकुलती एक बहीण मात्र त्यामुळे खट्टू व्हायची.
गावात विसर्जनाचे तळे बरेच दूर असल्यामुळे पायी चालत तिथपर्यंत जायला अर्धा-पाऊण तास तरी लागायचा. बहुतेक वाट शेतातून वा कुळागरांतून असल्याने एक-दोन पेट्रोमॅक्सही बरोबर असायचे. आम्ही मुले माकावच्या फोगांतील मारानाच्या फोगेटी मोकळ्या करून त्यांनी खिसे भरून घ्यायचो. मग उदबत्ती पेटवली की लावली फोगेटी! तळ्याकडे पोचेपर्यंत वाटभर एक-एक अशा त्या फोगेटी आम्ही लावायचो. प्रत्यक्ष विसर्जनाच्या वेळी लावायला एकतरी फटाक्यांचे बॉक्स ठेवावे लागायचे. तळ्याकडे पोचल्यावर तिथे बाप्पाची पुन्हा आरती केली जायची. नारळ फोडला जायचा आणि मग गणपतीची मूर्ती घेऊन तो माणूस हळूहळू तळ्याच्या पाण्यात उतरायचा. छातीपर्यंत पाण्यात गेल्यावर मग तो मूर्ती तीन वेळा पाण्याला स्पर्शून बाप्पा मोरयाच्या गजरात हळूच ती मूर्ती पाण्यात सोडायचा. तीरावर आम्ही सगळे ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देत देत गणपतीला निरोप द्यायचो. परत येताना एकप्रकारच्या निःशब्द शांततेत आम्ही सगळे येत असू.
पंचमीच्या दिवशी संध्याकाळी खिशात मोकळ्या फोगेटी भरून आम्ही मुले गावभर गणपती पाहायला जायचो. त्या काळात देखावे हा प्रकार जवळजवळ नव्हताच. गावातल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन भक्तिभावाने गणपती पाहायचा हेच आम्हाला ठाऊक असायचे.
चवथीच्या तीनही दिवशी जेवणाची चंगळ असायची. तयेच्या दिवशी पार्वतीसाठी खास तिच्या आवडीचे खाद्यपदार्थ केले जात. त्यात तिच्यासाठी केलेली पंचपाल्यांची भाजी आणि पातोळ्या असायच्या. पण त्यात एक पातोळी मात्र नेहमीच अळणी असायची. गणपतीच्या जन्माच्या वेळी पार्वतीला अळणी पातोळ्या खायची जबर इच्छा होत होती म्हणे. चतुर्थीच्या दिवशी मोदक आणि सुकूर उंडे व पंचमीला भाताच्या शेतातील नव्या कणसांची पूजा करण्याची पद्धत गोमंतकात प्रचलित आहे. त्यानुसार त्या नव्यांसाठी खीर आणि जेवणात गोवन इडली म्हणजेच हीट; व ते बुडवून खाण्यासाठी नारळाचे गोड दूध. पंचमीच्या दुपारचे जेवण जेवताना मग दुसर्‍या दिवसाचे म्हणजे सष्टीच्या दिवसाला काय जेवण करावे यावर विचारविनिमय... तसा सर्वसाधारण सष्टीचा मेनू ठरलेला असायचा. मसूरचे मसाल्याचे तोंडाक व त्याबरोबर लावायला फ्राय केलेले हीट. म्हणजेच कालची इडली ही आज ब्रेड बनायची. आणि श्रावणानंतरच्या नॉनव्हेजचा पहिला दिवस असल्याने बरोबर ताजी ताजी मासळी. बहुतेक करून बांगड्यांचे त्रिफळे घालून केलेले तिखट हुमण व तळलेली मासळी.
आजची चवथ....
परंपरेनुसार आजही आमच्याकडे दीड दिवसाची चवथ असते. आता रीतीप्रमाणे आमच्याकडे तयेचा उत्सव असल्याने चवथ ही तशी तीन दिवसांचीच होते. वयोमानानुसार आज आमचे रोल बदललेले आहेत. म्हणजे पूजाअर्चा आता आमच्याकडे आहे, तर मखर रंगवणे, फोग लावणे, गणपती हातात घेणे आदी कामे आता तरुण आणि लहान मंडळी त्यांच्या-त्यांच्या उपस्थितीनुरूप करतात. बहुतेक मुले देशी-परदेशी असल्यामुळे त्यांची अनुपस्थिती असते, पण उपस्थित असतात त्या वर्षाची चवथ ही एखाद्या उत्सवासारखी असते. नाहीतर मग जे आहेत ते आपली चवथ रीतीरिवाज, परंपरा सांभाळून शक्य तितक्या भक्तिभावाने साजरी करतात. आजही आमच्या आरती घुमटा-शामेळानेच होतात. आजही पातोळ्या, पंचपालेभाजी, मोदक, सुकुर उंडे, खीर, हीट हे सगळे होतच असते. आणि हो, सष्टीच्या नॉनव्हेज जेवणाचे प्लॅन्सही तसेच केले जातात. आता काळानुरूप मसूरच्या तोंडाकाऐवजी खिमा किंवा शागुती असे पदार्थही सुचवले जातात. कारण त्यांचेही हीटाबरोबर कॉम्बिनेशन बरे जमते.
विसर्जनाठिकाणी पायी जाण्याऐवजी आता गणपतीला गाडीतून सफर दिली जाते. बाकी सगळे तेच असते. चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या पूजेसाठी हल्ली भटजी मिळणे दुरापास्त झाले आहे असे दिसते. आणि तो मिळालाच तर त्याने वेळेवर येणे हे त्याहूनही दुरापास्त. घराण्याचा पुरोहित असला तर ते काम सोपे होते. पण पूजा चालू असताना भटजींच्या मोबाईलची रिंगटोन एकदोनदा वाजलेली गणपतीसह आपणा सर्वांनाच ऐकावी लागते. आता आता तर त्याची सवय सर्वांना होऊन गेलेली आहे. पंचमीच्या संध्याकाळी गणपती पाहायला बाहेर पडण्याचा कार्यक्रम पंधरा-वीस वर्षांपूर्वी ज्या उत्साहाने होत होता तसा उत्साहाने होत असलेला हल्ली दिसत नाही. पाच गणपती पाहिले की झाले अशीच वृत्ती दिसते. पण देखाव्यांच्या संख्येत मात्र प्रतिवर्षी वाढ झालेली दिसते. आणि देखावे दहा दिवस तरी ठेवीत असल्याने पहाणेही पंचमीचा दिवस सोडूनच होत असते. एकंदरीत तसे सगळे तेच असते, पण भक्तिभावात कुठेतरी कमतरता असल्यासारखे वाटते आणि घराघरांत माणसेही कमी झाल्याचे जाणवते. कालाय तस्मै नमः

No comments: