पारंपरिक ज्ञानाचा खजिना

- सौ. पौर्णिमा केरकर

प्रतिष्ठा, पैसा, स्पर्धा यांच्या गदारोळात त्याचे मूळचे आत्मतत्त्व हरवणार तर नाही ना ही खंत वाटते. विद्येची, बुद्धीची, कलेची अधिष्ठात्री देवता श्रीगणेश. त्याचा परंपरेने चालत आलेला उत्सव सर्वांनाच डोळस करणारा ठरायला हवा.

अगदी चमत्कारिक, काहीसा ओबडधोबड दिसणारा, तरीही सर्वांगसुंदर अशा कलांचा अधिपती श्रीगणेश हा सर्वसामान्य लोकमानसाच्या थेट काळजापर्यंत पोचलेला देव. चैतन्याचे, सौंदर्याचे, भव्य, सुंदर कलात्मकतेचे रूप म्हणजेच गणपती. कलेचा, बुद्धीचा, नैसर्गिक तत्त्वांचा अधिपती असलेला हा देव पारंपरिक ज्ञानाचा खजिनाच जणूकाही आपल्या उत्सवाच्या दरम्यान समस्तांना उलगडवतो.
मानवी जीवनाच्या रोजच्या धकाधकीच्या वातावरणात त्याला कोठेतरी विरंगुळ्याचे चार निवांत क्षण गरजेचे असतात. ऋतुपरत्वे सृष्टीत होणारे बदल तनामनाला नवचैतन्य प्राप्त करून देणारे. या बदलांशी एकरूप होत मानवी मनाने उत्सवप्रियता बाळगली. चैत्र ते फाल्गुनापर्यंतचा हा प्रवास सर्जकतेचा, सृजनत्वाचा. श्रावणाचे लावण्य तर अभुतपूर्व असेच. श्रावणाचेच भक्तितत्त्व पुढे नेताना भाद्रपदातली चवथ तर सर्वच सणांची अधिष्ठात्री ठरणारी.
चतुर्थीचा सण जवळ येत जातो तसतशी घराघरांत जोरदार तयारी सुरू होते. जागोजागी गणेशमूर्ती विक्रीस ठेवलेल्या दृष्टीस पडतात. आकर्षक रंगात सजवून धजवून ठेवलेल्या या मूर्ती विकत घेऊन आज हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षीच हा उत्सव येतो, पण तरीसुद्धा या उत्सवामागचा अर्थ पुन्हा पुन्हा नव्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आजच्या आधुनिक कालखंडात श्रीगणेश तर पारंपरिक ज्ञानाचा खजिनाच आहे याची जाणीव होते.
पार्वती आंघोळ करण्यासाठी गेली त्यावेळी तिने आपल्या अंगीचा मळ काढून त्याचा एक बाहुला तयार केला. त्याला सजीव करून राखण करण्यासाठी दरवाजावर ठेवले. कोणीही आले तरी आत सोडू नकोस असा तिने हुकूम केला होताच. शंकर त्यावेळी शिकारीला गेले होते. परत आले असता त्या बालकाने त्याची वाट अडवली. मग रागाच्या भरात शंकराने त्याचे मुंडकेच छाटले. पार्वतीचा आकांत. मिळेल त्या प्राण्याचे मुंडके आणून धडाला लावायचे हा शंकराचा आदेश. पहिलाच प्राणी मिळाला गजराज. त्याचेच मुंडके मग धडाला चिकटवले गेले. तोच हा गणराज. ही गोष्ट परंपरेने चालत आलेली. लोकमानसात श्रद्धेने स्थिरावलेली. त्यात सत्य किती, असत्य कोणते ते पडताळून पाहण्याचा प्रयत्न नाही. प्रश्‍न आहे मानवी भावनांचा, लोकश्रद्धेचा. त्यामुळे ही गोष्ट हलत नाही, बदलत नाही. पार्वतीच्या अंगाचा मळ असा अर्थ घेणे म्हणजे पार्वतीने कितीतरी दिवस आंघोळच केली नसावी. परत देवासंदर्भात असा अविश्‍वास दाखवणे हेही श्रद्धेच्या माध्यमातून गैरच. मग गणपती हा ज्ञानाचा खजिनाच आहे या दृष्टीतून बघताना मात्र त्यात वेगळेपणा दिसतो. पर्वत धारण करणारी ती पार्वती. तिच्या अंगीचा मळ म्हणजे माती. ही माती डोंगरावरून शेताभाटांत येऊन स्थिरावली. कष्टकरी लोकांनी तिचीच मूर्ती केली. तिला पुजली, भजली. त्याचाच उत्सव चैतन्यमयी ठरला.
एखादी चमत्कृती अनुभवली, कोणत्या तरी अनाकलनीय गोष्टीचे भय मनात बाळगले की श्रद्धा उफाळून येते. मनाची भाबडी श्रद्धा असते. ज्या गोष्टीचे भय वाटते त्याचीच पूजा करायची, त्यामुळेच सार्‍यांचे रक्षण होईल. कदाचित या अशा वृत्तीतूनही चतुर्थीचा उत्सव जनमानसात रुजला असावा. भाद्रपदातील दिवस कुमेरी शेतीच्या ऐन बहराचे असायचे. मेहनत करून पिकवलेली शेती जंगलातील हत्ती फस्त करायचे. मेहनत फुकट जायची. हातातोंडाशी आलेला घास नाहीसा व्हायचा. त्यामुळे याच हत्तीरूपी देवाची पूजा करण्याची संकल्पना लोकमानसाने रुजवली असावी. आज तिला व्यापक स्वरूप प्राप्त झालेले असले तरी निसर्गाशी प्रामाणिक राहून स्वतःचे कुटुंब, संसार चालवताना त्याची होणारी तारेवरची कसरत आणि मग जो निसर्ग आपल्याला भरभरून सर्वकाही देतो त्याविषयीची कृतज्ञता या उत्सवातून निर्माण झालेली दिसते.
शेतातली माती शाडूची. त्याच मातीची गणेशमूर्ती बनवायची. चवथ येण्यापूर्वी घराची रंगरंगोटी करायची ती ‘रेवो’ घेऊन. रेवो म्हणजे पिवळसर, मऊ, लुसलुशीत माती खणून आणून पाण्यात फुगवायची. मग एखादा चांगला कपडा त्यात भिजवून मातीच्या घराच्या भिंतींना लेप काढायचा. खाली जमीन शेणाने सारवायची. जरासे वर भिंतीला एका रेषेपर्यंत शेणाने सारवायचे. एकंदरीत भिंतीला रेवो व शेण यांची रंगरंगोटी केली जायची. रेवो खणून आणून त्याचा रंग तयार करण्याचे ज्ञान परंपरेने घरातील सर्वच सदस्यांना असायचे अशातला भाग नाही. परंतु ही कृती मोठी माणसे जेव्हा करायची तेव्हा लहानग्यांना त्याचे अप्रूप वाटायचे. सहजच त्यांचेही हात त्या शाडूत माखले जायचे. तपकिरी रंगाच्या दगडातून भिंतीवर नक्षी आकाराला यायची. शेणावर पिठाची रांगोळी. ज्या जागेवर गणपतीची मूर्ती विराजमान केली जाणार आहे त्याच्या मागच्या बाजूला कमळाची कलाकृती नैसर्गिक रंगानेच काढली जायची. ही कला परंपरेने सर्वांच्याच वाट्याला यायची. दारावर तोरण बांधलेले असायचे. त्यातील भरतकाम, वीणकाम घरातील स्त्रियांनीच केलेले असायचे. मोराची, कमळाची, स्वस्तिकाची कलाकुसर त्यात असायची. दारासमोरच्या रांगोळीत सांस्कृतिक संचित अधोरेखित व्हायचे. नवीन लग्न झालेल्यांना ‘वजे’ दिले जायचे. त्या वज्यात तोरण असायचे. घरातील महिलांना, सासवा-सुनांना, लेकीबाळांना ही कला परंपरेने प्राप्त झालेली असायची. चतुर्थीच्या निमित्ताने या कलानिर्मितीला अधिक उजाळा यायचा.
गणेशाच्या आगमनाची तयारी करताना रंगरंगोटीबरोबरच माटोळीचे कामसुद्धा तेवढेच महत्त्वाचे होते. आठवड्यापूर्वी रानावनातील पत्री, फुले, फळे गोळा करून आणण्याचे काम सुरू व्हायचे. त्यात मोठ्या प्रमाणात वैविध्य होते. औषधी गुणधर्म तर यातील कित्येक फुलपत्रीला असल्याने माटोळीची रचना व त्याला बांधलेले नैसर्गिक धन हा तर मोठा ज्ञानाचा खजिनाच असायचा. एरव्ही रानात असताना काही काही वनस्पतींना तेवढेसे महत्त्व दिले जात नसे. माटोळीला बांधल्यानंतर त्याचे वेगळेपण उठून दिसे. भेरलेमाड एरव्ही ओबडधोबड दिसणारा, परंतु त्याच्या फळवेलींचा एवढा कलात्मक उपयोग सजावटीसाठी केला जायचा की जणू काही निरनिराळी फळे गुंफून एक माळाच केलेली आहे असा भास व्हायचा. किती नावे आणि किती औषधी गुणधर्म यांची गणतीच नसे. बोणकीचे फळ, रानकरमळ, सीतेचवरीचे मूळ, धुपाचे फळ, ताडमाड, शिवलिंग, तांबडी चाफी, पांढरी अबोली, घोड्याची पावले, हेरडा, कवचा, पालपणस, गमफळे, काटेकवर, गुंजी, अमृतवेल, आटकी, हळदफुल, ताम्हण, लाजरी, केवडा, वट्‌टेलाव, पितमाडे, रानकेळीचे फुल, चोनचाफ्याची फळे, वीख मोगरी, चवरमांडो, एरंड, खरसंग, धनुकाचो कात्रो, भेकरो, नर्कवाल, कांगला, माडतीची माट्टूला, पावसात जेवढ्या भाज्या घरासभोवताली- एखाद्या कुणग्यात पिकवल्या जातात त्यातील दोडकी, काकडी, भेंडी, तोरींग, दुधी वगैरेचा वापर माटोळीसाठी केला जातो. रानावनात मिळणार्‍या या फळाफुलांची, वेलींची फक्त माहिती होती असेच नव्हे तर त्याविषयीचे औषधी गुणधर्मसुद्धा त्याला ज्ञात होते. त्यामुळे माटोळीतील कोणते फळ-फुल कशावर उपयोगी आहे यावर तो माहिती द्यायचा. त्याबरोबरीनेच त्यामागची एखादी दंतकथाही सांगून टाकाया. त्यातील विषारी घटकसुद्धा अवगत असायचे. ‘नर्कवाल’संदर्भात तर सांगितले जाते की सीतेला रावणाने नजरकैदेत ठेवल्यावर तिला त्रास देण्यासाठी रावणाने आपल्या बहिणीला ही वाल म्हणजेच वेल दिली होती. या वेलीला खूप घाण वास येतो. चवरमांडो कौशीच्या झाडाच्या सालीपासून आकर्षक गोंडे करून माटोळी सजवली जायची.
लांब शेंग असलेले खरसंग पखवाज, मृदंगासाठी जसे उपयोगी तसेच गायीगुरांच्या गुदद्वाराला रोग जडला तर त्यावरही उपयोगी असायचे. भेकरेची फळे फोडून आतील गर गरम करून खाणे व्हायचे. कवचा या वनस्पतीला काटे असतात. याचा काढा करून प्राशन केल्यास मुतखड्यावरील ते जालिम औषध. ‘गणपती देवा करीन तुझी सेवा, नवस करीन रे, पाच फळांनी पाच फुलांनी दूर्वा वाहीन रे’ असे म्हणून आंब्याच्या टाळ्याशिवाय माटोळीला शोभाच नाही असे पदोपदीने वाटायचे. त्यासाठीच-
आंब्या तुजो टाळो
टाळो मोडून रथ घडयिलो
गणपती देवाचा रथ घडयिला
गणपती देवाची ही किमया
गणपती देवाला जाऊ शरणा
अशी श्रद्धा अभिव्यक्त करताना माटोलीला बांधलेल्या फळ-फुल-वेलींतून ज्ञानाचा औषधी गुणधर्माने युक्त असा मोठा खजिनाच तिथे सापडायचा. पारंपरिक वनौषधींचे ज्ञान उपजतच एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे संक्रमित व्हायचे. आज कसलाही आजार झाला तर ऍलोपथीचा वापर होतो. श्रावण-भाद्रपदातील रानफुलांचे लावण्य तर चवथीला अधिक रंगीत करायचे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने हे सारे हितकारकच होते जे आज विस्मृतीत जाताना दिसते.
आरोग्य आणि आहार यांची महत्त्वपूर्ण सांगड याच उत्सवादरम्यान दिसते. दीड, पाच, सात, अकरा दिवस गणपतीचे वास्तव्य कमी-अधिक प्रमाणात घराघरांत आढळते. या दिवसांत शाकाहाराचे व रानभाज्यांचे वैविध्यपूर्ण प्रकार केले जातात. गोडाधोडाच्या पदार्थांची रेलचेल असते. पूर्वी भातशेतीच मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने तांदळाचे पीठ सर्रास वापरले जायचे. पहिल्याच दिवशी तांदळाच्या पीठाच्या नेवर्‍या-करंज्या करताना डाळीचे पीठ व गूळ, नाहीतर नारळाचा चव व गूळ यांचे सारण करून केलेल्या करंज्या मातीच्या मडकीत पाणी घालून, त्यावर स्वच्छ कपडा बांधून, वर केळीचे पान ठेवून त्यावर करंज्या, मोदक उकडले जायचे. खतखते, मणगणे, सातकप्यांचे गोड पोळे, पायस, आमाड्याचा आंबट-तिखट सार हे सारे असायचेच. त्याशिवाय तेरे, तायखळा, आळू, शेगलाची भाजी, कुड्डू, हुर्डूक, वालीच्या पानांची भाजी, तवशी, दोडकी, भेंडी, पडवळ यांनी घराचे अंगण, भितोडी भरलेली असायची. त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात आहारात व्हायचा. या सकस, पोष्टिक आहारामुळेच त्याकाळची पिढी धष्टपुष्ट झालेली होती.
गणपतीचे आगमन होणार याची लगबग घरातील लहानथोर सर्वांनाच असते. तरीही घराची झाडपूस करणे, शेणसारपण, रंगरंगोटी, जेवणाखाणाचे बघणे हे काम घरातील स्त्रियांकडे यायचे. हे सर्व आवरून गणपतीच्या वास्तव्यात दवली-माणीच्या वादनापासून ते फुगड्या, झेमाडो घालीपर्यंत कधीकधी रात्र सरायची. परंतु फुगडीशिवाय एकही दिवस व रात्र सरत नसे. हाताखांद्याशी एखादे लहान मुल असले तरीही त्याला कडेवर घेऊन, प्रसंगी झोपवून, उठले तर त्याला थोपटून फुगडीत रममाण होणे व्हायचे. गणेशावरील असलेल्या निस्सिम श्रद्धेमुळेच हे शक्य होत असे.
वयीले डोंगरी गे बाई
रान कापीले हुस्केचे
देऊळ बांदिले बसकेचे
गणपती देवाचे, ग बाई गणपती देवाचे
श्रावणबाळ, चिलयाबाळ, सत्यवान-सावित्री, हरिश्‍चंद्र-तारामती, कृष्णसखा, गणपती जन्माख्यान, पार्वती, द्रौपदी, सीता, रामायण, महाभारत अशी आख्यानकाव्ये, कथानके, लोकोत्तर पुरुष-स्त्रिया यांचे भावबंध फुगड्यांतून उलगडत जायचे. रामायण, महाभारतासारखी महाकाव्ये अशाच फुगडीगीतातून पिढीपर्यंत पोहोचली. फुगडीगीतांतून ही कथाकाव्ये ऐकतच मनीमानसी संस्कार घडले व ही मौखिकता पुढे पुढे सरकत राहिली. संस्कारसंपन्न ज्ञानसाधनेचा हा मोठा परिपाठच गणेशचतुर्थीच्या निमित्ताने समाजासमोर यायचा. गणेशजन्माची कथा तर कित्येक फुगडीगीतांतून समूर्त होत गेली. प्रत्येक गीतात वेगळेपण-
पार्वतीचा तयेचा एकवाद
उठली फातोडचे पारी गे
गेली ती गायीचे गोठणी
हाडीले गुळीभर शेण गे
सारपले घर आनी दार गे
लायीली माळ्याक निसण
काडीले एकदोन नारळ
आप्रोस पिळून आंगी लावीला
आंगीच्या मळीचा बाळ घडयला...
दवले-माणीच्या गायनाची एक स्वतंत्र परंपराच तत्कालीन पिढीला मुखोद्गत झाली होती. फुगडीचे निमित्त असायचे स्त्रियांना स्वतःचे मन व्यक्त करण्यासाठी. सासरी वावरताना प्रसंगी त्रास सहन करावा लागायचा. कष्ट वाट्याला यायचे तरीसुद्धा हे सारे सहन करावे लागायचे. याची शिकवण माहेरहून आईने मुलीला दिलेलीच असायची. त्या संस्काराची शिदोरी बरोबर घेऊनच संसारात रममाण होणे व्हायचे.
शेत माझे डोंगरी गे, चित्त माझे माहेरी
आई माझी चिंता करी, लेक माझी एकटी
नाही आई एकटी मी, सासू आहे संगती....
असे मनाला समजावणे व्हायचे. हे भक्तीचे सामर्थ्य होते. गणेशावरची अढळ श्रद्धा होती. ती जशी फुगडीतून अधोरेखित व्हायची तशीच भजन, कीर्तन, आरत्यांमधून स्पष्ट जाणवायची. आजही भजन, कीर्तन, आरतीमधून ही परंपरा जिवंत, प्रवाही राहिलेली आहे. काळाप्रमाणे बदल घडला. पूर्वी ध्वनिक्षेपकाचे, फटाक्यांचे मोठे प्रदूषण होत नव्हते जे आज विसर्जनाच्या वेळी आपल्याला दिसते. घुमट, समेळ, झांज, पखवाज या वाद्यांतून साकारणारे संगीत मन बेभान करायचे. पावले थिरकायची. घराघरांत होणार्‍या भजन-आरत्यांमुळे घर पवित्र तर व्हायचेच. एकूणच ते दिवस भारावल्यासारखे. विसर्जनावेळी तर या सर्वांचा उत्कर्षबिंदू असायचा. आजही गणेशोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. प्रतिष्ठा, पैसा, स्पर्धा यांच्या गदारोळात त्याचे मूळचे आत्मतत्त्व हरवणार तर नाही ना ही खंत वाटते. विद्येची, बुद्धीची, कलेची अधिष्ठात्री देवता श्रीगणेश. त्याचा परंपरेने चालत आलेला उत्सव सर्वांनाच डोळस करणारा ठरायला हवा. पताका लावण्यापासून ते खाद्यपदार्थ तयार करण्यापर्यंत औषधी वनस्पतींचा खजिना, कथा-काव्यांचा संस्कारसंपन्न नजराणा पिढ्यान्‌पिढ्या पोचविणारा चवथीचा उत्सव हा पारंपरिक ज्ञानाचा खजिनाच आहे.

No comments: