श्रीगणेशस्तवन

- डॉ. सोमनाथ कोमरपंत


श्रीगणेशस्तवनाच्या या मौखिक आविष्काराचा विचार केल्यावर लिखित परंपरेकडे वळल्यानंतर काय दिसते? मौखिक-लिखित परंपरेच्या सीमारेषा येथे पुसट झाल्याचेही जाणवते. क्षितिजविस्तारच नजरेत भरतो. पण या गंगाप्रवाहाचा मूलस्रोत मौखिकच आहे हे उमजून येते.


आदिमकालापासून मानवी मन आपल्या उन्नयनाचा मार्ग शोधत आहे. त्याची निर्मितिशीलता सृष्टीच्या अणु-रेणूंमध्ये नित्यनूतनत्व शोधत आहे. अचेतनत्वामध्ये चैतन्य पाहणे हा मानवी प्रतिभेचा चमत्कार आहे. यातूनच कलासाधनेचा मार्ग तिने अवलंबिला. प्रज्ञा-प्रतिभेच्या विकासक्रमाबरोबरच संस्कृतीची संकल्पना मानवाच्या अंतरंगात रुजली. निसर्ग हा त्याचा प्रेरणास्रोत. त्याच्या सान्त जिवाला अनंतत्वाचा ध्यास लागला. त्याचे तत्त्वचिंतन सुरू झाले. तो निराकारामध्ये आकार शोधायला लागला. अरूपाला रूप देण्याचा प्रयत्न मग सुरू झाला. जीवनाच्या शाश्‍वत सत्याचा, शिवाचा आणि सुंदराचा ध्यास त्याने घेतला. या शोधप्रक्रियेत लहान कोण आणि महान कोण हेदेखील ठरविणे कठीण आहे. स्वतःच्या कुवतीनुसार त्याने विश्‍व निर्मिले. केवढे परमसत्य केशवसुत लिहून गेलेले आहेत!
विश्‍वाचा आकार केवढा
ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा
कुणाला श्रद्धेच्या सामर्थ्याने देवत्व शोधायचे असते; कुणाला प्रज्ञेच्या बळावर प्रतीकरूपाने त्याच्याकडे पाहायचे असते. श्रीगणेशाच्या रूपाची संकल्पना केव्हापासून लोकमानसात रुजली हे सांगणे हा मतभेदाचा विषय होऊ शकतो; पण तो लोकमानसाचा अधिनायक आहे याविषयी कुणाचेच दुमत नाही. भारतीय परंपरेने परमसत्य अधोरेखित केलेले आहे ः
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ|
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
ही मंगलमूर्ती सर्वमंगलासाठी आहे. तिच्या केवळ दर्शनानेदेखील चित्तवृत्ती प्रसन्न होते. समूहमनाला एकत्र आणून विधायकतेकडे प्रेरित करण्याची शक्ती या प्रतीकात आहे. खर्‍या अर्थाने ते लोकदैवत आहे. श्रीगणेश हा विद्या आणि कला यांचा अधिष्ठाता आहे. लोकमान्य टिळकांसारख्या प्रज्ञावंताला राष्ट्र संकटात असताना ते संघटित करण्याची प्रेरणा झाली ती श्रीगणेशाच्या आदिशक्तीमुळेच. त्याचे कुल आणि मूळ शोधण्यात शक्ती वाया घालविण्याऐवजी तो ‘गणनायक’ आहे हे आजच्या जीवनप्रणालीच्या संदर्भात तेवढेच खरे आहे. तो बुद्धिमंतांतील बुद्धिमंत आहे. बलवानांतील बलवान आहे. त्याची बुद्धिमत्ता आणि बल समष्टीच्या कल्याणासाठी आहे. तो विघ्नहर्ता आहे. आपल्या सांस्कृतिक संचिताशी आणि पर्यावरणाशी त्याचा दृढ संबंध आहे.
श्रीगणेशामध्ये प्रेरणा कशी शोधावी?
श्रीगणेशाचे मोठे मस्तक लाभदायक दीर्घ पल्ल्याच्या योजना आखण्याची प्रेरणा देते. मोठे कान शांतपणे ऐकण्यास, नवनवीन कल्पना आणि विचार करण्यास प्रवृत्त करतात. बारीक डोळे एकाग्र व्हायला सांगतात. लांब सोंड चौफेर ज्ञान मिळविण्यासाठी प्रेरित करते.
लोकवाङ्‌मयातून श्रीगणेशाची आराधना करताना म्हटले जाते ः
‘कार्यारंभी प्रथम पुजावे गणनायक गणपती देव हा देवांचा अधिपती...’
जात्यामध्ये धान्याची पहिली ओंजळ टाकताना प्रत्येक माता उद्गारते ः
पहिली माझी ववी गं
गणराया गणपती
पिठाला बरकती
तिथं उभी व्हवी
मंगल कार्याचा प्रारंभ करताना मुळचिठ्ठी गणरायाला जाते. त्याच्याशिवाय कार्यसिद्धी कशी होणार? कारण ‘पाच ग पासुल्याचा दिला मंडप साधूनी देव गणराया उभा कंबर कसुनी...’
पहिली ग मुळचिठ्ठी
माझी नामयाला जाते
देवा गणरायाची
गाडी घुंगराची येते
गोंधळी, आराधी, भोपे, धनगराचे सुंबराज, दशावतारातील त्याचे आद्यनमन, तमाशातील नांदी, शाहिराच्या पोवाड्यातील श्रीगणेशाचे स्तवन यासंदर्भात पुनःपुन्हा आठवावे. त्यातही पुन्हा प्रत्येक परिसराच्या मातीच्या गंधाने भारलेले गाणे नवनिर्मितीचा नवा आनंद देते. सर्वदूर पसरलेल्या भूभागांतील वैविध्याचे किती नमुने साठवावे? ते तर आपले समृद्ध संचित आहे.
आपल्या पारंपरिक लोककला गणेशस्तवनाशिवाय सुरू होत नाहीत. पोतराजाच्या ओव्यांत ‘पहिला नमन गणेश गणपतीला’ हे शब्द आठवावेत. आपल्या गोमंतकातील सुंवारीवादनाच्या घुमटावर थाप पडल्यानंतरची धून आठवावी. आसमंताला मंत्रमुग्ध करण्याचे भावसामर्थ्य त्या नादलयीत असते. या गणगोताच्या संस्कारशीलतेमुळे व्यक्तिमनाच्या जडणघडणीचा आणि समष्टीच्या संस्कृतीचा तलम पोत निर्माण होतो... सर्जनशीलतेची मुळे या सार्‍या संवेदनोर्मीमध्ये दडलेली असतात. फुगड्यांमधून स्त्रीमनाचे सारे हेलकावे कलात्मक ढंगाने प्रकट होतात.
भराडी हे भैरवनाथाचे उपासक. तेदेखील ‘मोरया गणपती गणराजा तुला विनवितो रणराजा, मायेचा निजरूप भराड मांडिला, भराड मांडिला’ या शब्दांत गणेशस्तवन करतात. शाहीरही आपल्या ओजस्वी वाणीत गणेशाला वंदन करतात. होनाजी बाळा, रामजोशी यांनी आपल्या रचनांच्या प्रारंभी गणेशाची प्रार्थना केलेली आहे.
श्रीगणेशस्तवनाच्या या मौखिक आविष्काराचा संक्षेपाचा विचार केल्यावर लिखित परंपरेकडे वळल्यानंतर काय दिसते? मौखिक-लिखित परंपरेच्या सीमारेषा येथे पुसट झाल्याचेही जाणवते. क्षितिजविस्तारच नजरेत भरतो. पण या गंगाप्रवाहाचा मूलस्रोत मौखिकच आहे हे उमजून येते.
श्रीगणपत्यथर्वशीर्ष म्हणते ः
हे मंगलमूर्ती, देवादि गणांचा पालक असलेल्या तुला, गणपतीला नमस्कार असो. तूच साक्षात तत्त्व आहेस. सर्व जगाची उत्पत्ती करणारा केवळ तूच आहेस. जगताचे पालन करणारा तूच आहेस. जगाचा संहार करणाराही केवळ तूच आहेस. जगद्रूपाने भासमान होणारे हे साकार ब्रह्म खरोखर तूच आहेस. चिरंतन राहणारा साक्षात आत्मा तूच आहेस ॥ मी वाचेने सत्य बोलत आहे. मनानेही सत्य सांगत आहे ॥
तू माझे रक्षण कर. तुझे गुणगान करणार्‍या वक्त्यांचे तू रक्षण कर. तुझे गुणगान ऐकणार्‍या श्रोत्यांचेही तू रक्षण कर. योग्य अधिकारी अशा शिष्याला तुझी उपासना देणार्‍या गुरूचे तू रक्षण कर. निरंतर गुरूच्या सान्निध्यात राहून ज्ञान संपादन करणार्‍या शिष्याचे तू रक्षण कर. पश्‍चिम दिशेकडून तू माझे रक्षण कर. पूर्व दिशेने तू माझे रक्षण कर. त्याचप्रमाणे ऊर्ध्वदिशेकडून तू माझे रक्षण कर आणि सर्व ठिकाणी तू माझे रक्षण कर ॥
शब्दरूपाने प्रतिपादित असलेले वेदादि सर्व वाङ्‌मय तूच आहेस. तू ब्रह्ममय आहेस. नामरूपाचा अहंकार धारण करणारा जीव तूच आहेस. ते आनंदमय आहेस. तू ब्रह्ममय आहेस. तू अविनाशी, चैतन्यरूप, आनंदरूप आणि अद्वितीय आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्मच आहेस. तू अध्यात्म ज्ञानमय आहेस आणि तूच भौतिक ज्ञानमय आहेस ॥
हे सर्व जगत तुझ्यापासूनच उत्पन्न होत असते. हे जग तुझ्यामुळे स्थिर राहत प्रसृत झालेले हे सर्व जगत तुझ्या ठिकाणी परत येत असते. पृथ्वी, आप, अग्नी, वायू आणि आकाश तूच आहेस. परा, पश्‍चन्ती, मध्यमा आणि वैखरी या चार प्रकारच्या वाणीची स्वरूपे तूच आहेस ॥
सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांपासून तू दूर आहेस. स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीन देहांपासून तू दूर आहेस. भूत, वर्तमान आणि भविष्य या तीन कालांपासून तू दूर आहेस. मनुष्यदेहातील अधोभागाजवळ असलेल्या मूलाधार नामक स्थानाच्या ठिकाणी तू नित्य राहतोस. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही शक्तींना तू व्यापून राहतोस. योगिजन सदैव तुझे ध्यान करतात. जगाची उत्पत्ती करणारा तू ब्रह्मा, या जगताचे पालन करणारा तू विष्णू, या जगाचा संहार करणारा तूच रुद्र, सर्व देवांचा राजा इंद्र तूच, सर्व देवांचे मुख असलेला यज्ञभोक्ता तूच अग्नी, सर्व ब्रह्मांडात वाहत असलेला वायू तूच, सर्व जगाला प्रकाश देणारा सूर्य तूच आणि सर्व औषधींचे पोषण करणारा व रात्री शीतलतेने प्रकाश देणारा चंद्रही तूच. तूच ब्रह्म, तूच भूलोक, तू अंतरिक्ष, तूच स्वर्गलोक आणि प्रणवमंत्रही तूच आहेस ॥
गणाचा आदिभूत असलेल्या गकाराचा उच्चार करून नंतर वर्णारंभक अशा आकाराचा उच्चार करावा. त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा. तो अनुस्वार अर्ध चंद्राकृतीने विलसित असावा. तो प्रणवाने युक्त असावा. हे गणपते, आता जे वर्णिले हेच तुझ्या मंत्राचे स्वरूप होय. गकार हे त्या मंत्राचे स्वरूप होय. गकार हे त्या मंत्राचे पूर्वरूप, अकार हे मध्यमरूप, अनुस्वार व अर्धचंद्राकार यांचे संधान म्हणजे एकीकरणाचे साधन, तो नाद म्हणजे शब्दध्वनी होय. गकारादि चार अवयवांचे संमीलन किंवा यथानुक्रम उच्चार ही त्या मंत्राची संहिता. गणपतिमंत्र हीच ती ज्ञानप्रद अशी गणेशविद्या. या एकाक्षरी गणपतिमंत्राचा गणक ऋषी हा द्रष्टा. या मंत्राचा निचृद्गायत्री हा छंद होय. या मंत्ररूप विद्येची गणपती ही देवता. प्रणवयुक्त अशा या मंत्राच्या ठिकाणी व्यक्त होणार्‍या गणपतीला नमस्कार असो॥
एकदन्त अशा गणपतीला आम्ही जाणतो आणि म्हणूनच त्या वक्रतुंड देवाचे आम्ही ध्यान करीत आहोत. एकदन्त असा तो गणपती सर्व कार्यासाठी प्रेरणा देऊ दे ॥
एकदन्त आणि चार हातांत अनुक्रमे पाश, अंकुश, दात आणि वरद ही चार आयुधे धारण करणारा, उंदीर या वाहनावर बसणारा, लाल वर्णाचा, लांबट असे उदर असलेला, सुपाच्या आकाराचे कान असलेला, लाल रंगाचे वस्त्र परिधान केलेला, अंगाला रक्तचंदनाची उटी लावलेला, लाल रंगाच्या फुलांनी भक्तजनांकडून पूजन केला गेलेला, भक्तांवर दया करणारा, जगाचे आदिकारण, अविनाशी सृष्टीच्या निर्मितीपूर्वी अवतीर्ण झालेला आणि प्रकृती-पुरुषाहून निराळा अशा या गणपतीचे जो नित्य ध्यान करतो, तो योगी सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय ॥
निरनिराळ्या देवसमूहाचा पालक अशा तुला, नमस्कार असो. ब्रह्मादि देवगणांचा पालक असलेल्या तुला, नमस्कार असो. शंकराच्या पार्षदगणांचा पालक असलेल्या तुला, नमस्कार असो. लंबोदर, एकदन्त, सर्वविघ्नविनाशक आणि शिवपुत्र अशा तुला, नमस्कार असो. वरदमूर्ती असलेल्या तुला, गणपतीला नमस्कार असो.

प्राचीन कालखंडाकडून आपण संतपरंपरेकडे वळतो तेव्हा निरनिराळी विचारप्रणाली आणि दैवते मानणार्‍या संतांनी श्रीगणेशाचे प्रारंभी स्तवन केलेले आढळते. गणेशाकृती प्रणवाकार आहे म्हणून ज्ञानदेवांनी ‘ज्ञानदेवी’च्या प्रारंभी म्हटलेले आहे ः
ॐ नमो जी आद्या| वेद प्रतिपाद्या|
जयजय स्वसंवेद्या| आत्मरूपा॥
देवा तूंचि गणेशु| सकलमतिप्रकाशुु|
म्हणे निवृत्तिदासु| अवधारिजो जी॥
अकार चरणयुगुल| उकार उदर विशाल|
मकार महामंडल| मस्तकाकारें॥
हे तिन्ही एकवटले| तेथ शब्दब्रह्म कवळलें|
ते मियां गुरुकृपा नमिलें| आदिबीज॥
संत एकनाथ म्हणतात ः
नमन एकदन्ता| एकपणे तूंचि आता|
एकी दाविसी अनेकता| परि एकात्मता न मोडे॥
भक्तिभावनेचे नितांत मनोहर रूप नामदेवांच्या आणि तुकारामांच्या रचनेत आढळते. संत नामदेवांनी वर्णन केलेला भक्तवत्सल श्रीगणेश असा आहे ः
लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड| करीतसे खंड दुश्‍चिन्हांचा॥
चतुर्थ आयुधें शोभताती हातीं| भक्ताला रक्षिती निरंतर॥
भव्य रूप तुझें उंदीरवाहना|
संत तुकाराम म्हणतात ः
धरोनिया फरश करीं| भक्तजनांची विघ्नें वारी॥
ऐसा गजानन महाराजा| त्याचे चरणीं लाहो माझा॥
शेंदुर शमी बहु प्रिय त्याला| तुरा दुर्वाचा शोभला|
उंदीर असे जयाचें वाहन| माथां जडित मुगुट पूर्ण॥
नाग यज्ञोपवित रुळें| शुभ्र वस्त्रें शोभित साजिरें॥
समर्थ रामदासांनी गणपतीची जी आरती केलेली आहे ती तर जनमानसात रुळलेली आहे. या आरतीत भाषेची सुलभता आहे. प्रसन्नता, प्रासादिकता आणि समूहमनाची पकड घेण्याचे विलक्षण सामर्थ्य तिच्यात आहे. तीन चरणांची ही रचना. वानगीदाखल प्रथम चरण जरी पाहिला, ऐकला तरी आपल्या अंतःश्रुती तृप्त होतात. घुमट, समेळ, झांज आणि मंत्रमुग्ध करणार्‍या या शब्दकळेने आसमंत भारला जातो. सगुणभक्तीचा परमोच्चबिंदू या रचनेमध्ये गाठला गेलेला आहे. शब्द, अर्थ आणि भाव यांचा त्रिवेणी संगम येथे आढळतो ः
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची|
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची|
सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची|
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती॥
रामदासांच्या ‘दासबोधा’मधील गणेशस्तवनदेखील चित्तवृत्ती प्रसन्न करणारे आहे. त्यांची विनयशील वृत्तीही येथे प्रकट झालेली आहे ः
ॐ नमोजी गणनायका| सर्व सिद्धिफळदायका|
अज्ञान भ्रांतिछेदका| बोधरूपा|
माझिया अंतरी भरावें| सर्वकाळ वास्तव्य करावें|
मज वाक्शून्यास वदवावें| कृपाकटाक्षेंकरुनी॥
रामानंद ‘भूपाळी गणपतीची’मध्ये श्रीगणेशाचे तन्मयतेने वर्णन करतात ः
उठा उठा सकळिक| वाचे स्मरावा गजमुख|
ऋद्धि-सिद्धींचा नायक| सुखदायक भक्तांसी|
अंगीं शेंदुराची उटी| माथां शोभतसे कीरिटी|
केशरकस्तुरी लल्लाटीं| हार कंठी साजिरा॥
पूर्वसूरींची वाट पुसतच आधुनिक कवी-कवयित्रींनी गणेशस्तवन केलेले आहे.

No comments: