बालपणीची चवथ

- डॉ. पांडुरंग फळदेसाई 


आमची पिढी वाढली ती एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये. जवळजवळ तीन पिढ्या एकत्र नांदायच्या. बालगोपाळांचे गोकूळच तेथे अवतरलेले असायचे. असे हे बालपण आठवण्याचे कारण म्हणजे उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आमची पारंपरिक ‘चवत’ म्हणजेच गणपतीची परब.



प्रत्येकाला आपल्या बालपणात डोकावणे आवडते. आजच्या मोठेपणीच्या आयुष्याची तुलना स्वाभाविकपणे आपल्याच बालपणाशी होते आणि बालपणातल्या गमती-जमती आठवल्यावर आपण किती रम्य अशा बालपणाला मुकलो याची तीव्रतेने जाणीव होते. कितीही कठीण परिस्थितीत, संघर्षात, गरिबीत आणि कधीकधी दुःखात आपण बालपणातले दिवस घालविलेले असले, तरी आज त्याकडे आम्ही सुखाचे संचित म्हणूनच पाहतो. कारण त्यावेळेला भविष्यकालीन आयुष्याचा विचार मनाला फारसा स्पर्श करीत नसे. त्यामुळे एक निरागस, स्वच्छंदी वृत्तीने सभोवतालचे जग पाहण्याची सवय नकळत लागून जाते. त्यामुळे मिळेल त्या अनुभवातून आनंद मिळवायचा प्रयत्न सातत्याने चालू असतो. आपले कुटुंब, आई-वडील, काका-काकी, भाऊ-बहिणी, मामा-मावश्या, शेजारी-पाजारी, गावातील सवंगडी, शिक्षक, शाळेतील सोबती, मित्र-मैत्रिणी यांच्या गोतावळ्यात गुंग असताना आपण अचानक मोठे झाल्याची जाणीव होते. तेव्हा मात्र आपल्या बालपणातील दिवस पाखरासारखे उडून गेले याची जाणीव अस्वस्थ करून जाते. आता आपली मुले, नातवंडे यांच्या बालपणात आपण नकळत स्वतःला शोधत असतो. तो एक अनावर छंद मनाला भुरळ घालीत असतो. येणार्‍या बहुतेक सर्व प्रसंगांतून आपण आपल्या बालपणाचा वेध घेतो. त्यामागे पुनर्प्रत्ययाचा आनंद घेण्याची ऊर्मी असते. हे प्रसंग मूलतः कौटुंबिक स्वरूपाचे असतात. त्यात सण-उत्सवांचा मोठा वाटा असतो. कारण आमची पिढी वाढली ती एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये. मोठ्या कुटुंबातील जवळजवळ तीन पिढ्या एकत्र नांदायच्या. त्या ‘नांदण्या’तला आनंद वेगळाच होता. बालगोपाळांचे गोकूळच तेथे अवतरलेले असायचे. त्यामुळे क्षणोक्षणी आनंद अनुभवायचा. उत्साहाला उधाण आलेले असायचे. कोणतेही जोखमीचे कामदेखील आव्हान म्हणून स्वीकारण्याचे बळ अंगात यायचे. असे हे बालपण आठवण्याचे कारण म्हणजे उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आमची पारंपरिक ‘चवत’ म्हणजेच गणपतीची परब.
आमच्या बालपणातील चवत म्हणजे एक अविस्मरणीय घरगुती सण. एक पर्वणी. घरात पूजेसाठी आणायची मूर्ती कशी असावी याबद्दल आमच्या खूप कल्पना असायच्या तशाच अपेक्षादेखील असायच्या. परंतु त्याबाबतीत आपण बाल-गोपाल मंडळी फारसे काही करू शकत नव्हतो. परंतु घराची, मखराची सजावट, माटोळी, रांगोळी, आरत्या, फुगड्या, फटाके-दारूकाम याबाबतीत मात्र सर्वत्र आमची मिरासदारी असायची.
माटोळीच्या तयारीसाठी आम्ही मुले चार दिवस अगोदरच कामाला लागायचो. रानात जाऊन मिळेल ती जंगली फळे म्हणजे कुड्या-कात्रे, माट्टीकात्रे, कांगोणां, बेलफळे, फागलां जमवायचो. त्याच्याबरोबरीने मळे व बागायतीतील अनेक फळभाज्या आणि बागायती पिके असायची. त्यात सुपार्‍यांची शिपटीं, वैशिष्ट्यपूर्ण नारळ, केळी, चिकू, पेरू, तोरींग, नीरफणस, कर्मल, बिंबल, काकडी, दोडकी, पडवळ, दुधी, भेंडी असे एक ना अनेक फळभाज्या असायच्या. माटोळी उभारण्यासाठी आमच्याकडे आमचा पारंपरिक गडी रघुनाथ यायचा. आम्ही गोळा केलेल्या सर्व वस्तू तो यथासांग माटोळीला बांधायचा. माटोळी आकर्षक व्हावी म्हणून तिला आंब्याच्या डहाळ्यांची अथवा पानांची किनार असायची.
चतुर्थीच्या आदल्या दिवशी घरात गवर-म्हादेव पुजायचे. त्यासाठी स्वच्छ आणि गुळगुळीत केलेला मोठाला सोललेला नारळ आम्ही तयार ठेवायचो. गौरीसाठी पत्री गोळा करून आणण्याचे काम आमच्यासाठी जसे ठरलेले असायचे, तसेच एका विशिष्ट शेतीवर जाऊन दोन दिवसपर्यंत पूजेसाठी लागणार्‍या दूर्वा आणण्याचे कामही आमचेच असे. बाकी तुळशीपत्रे, फुले वगैरे पूजासाहित्यदेखील तयार ठेवण्याची कामगिरी आम्ही स्वेच्छेने करायचो. गौरीची चुडी वडीलधारी मंडळी तयार करी व गणपतीसाठीची पत्री-पुडी गावच्या मंदिरअर्चकाच्या घरी जाऊन आणण्याची जबाबदारी आम्हा मुलांवर असे. रंगीत पताका लावणे, तुळशीवृंदावनाजवळ छोटी माटोळी बांधल्याची खात्री करणे, रांगोळी घालणे आणि अधूनमधून स्वयंपाकघरातील गोडधोड पदार्थांचा वेध घेणे हे आमचे काम मात्र सातत्याने चालू असे. कधीकधी शेजार्‍यांकडील तयारी कुठवर आली याचाही अंदाज घेत असू. त्यांना काही मदत हवी असल्यास ती देण्यास आम्ही सगळेजण एका पायावर तयार. परंतु ठरलेल्या वेळेत सगळी तयारी पूर्ण व्हायला हवी याकडे आम्हा सगळ्याच मुलांचे लक्ष असे. कारण चवत व पंचम (चतुर्थी आणि पंचमी) या दोन दिवसांत आम्हाला अधिकाधिक कामात व्यस्त राहावे लागे.
चतुर्थीच्या काळात आजोळीची मंडळी, खास करून मामा यायचे. ते यायचे म्हणजे घरातील आम्हा मुलांसाठी खूप काही आणायचे. लाडू, करंज्या, हालवा, पोहे, पेढे, शेव, चिवडा आणि त्यासोबत फटाके आणि चंद्रज्योती. नंतरच्या काळात त्यात आपटगोळ्या आणि मोठ्या बॉंबचीही भर पडली. त्या आपटबॉंबकडे व फटाक्यांकडे पाहिल्यावर कधी एकदा आपण ते फोडू असे व्हायचे. मग मामाच्याच साक्षीने फटाके फोडायचो, नपेक्षा बॉंब तरी फुटायचे. कारण आमच्या दृष्टीने त्या आवाजात गणेशोत्सवाचे वातावरण तयार करण्याची प्रचंड क्षमता होती! फटाक्यांवर आणि बॉंबवर हक्क मुलांचा तर आपटबॉंब आणि चंद्रज्योती पेटविण्याचे काम मुलीबाळींचे असायचे.
चवतीच्या सकाळी गणपतीबाप्पा आमच्या घरी यायचे ते फटाक्यांच्या आवाजात. मूर्ती आवरणाखाली असल्यामुळे आम्हा सर्व मुलांची उत्कंठा शिगेला पोचलेली असायची. आपल्याकडे आणलेले गणपतीबाप्पा कोणत्या वेषात आणि कोणावर म्हणजे उंदीर, आसन, हंस, मोर, सर्प यांवर बसलेले आहेत, शिवाय त्यांचा आकार केवढा आहे हे जाणून घेण्याची ती उत्कंठा असे. गणपतीबाप्पाला मुख्य दरवाजात राठ दाखवून आत घेतले जाई. दुपारी त्याची पूजा व आरत्या होत. त्यावेळी ठेवणीतली घुमटे, शामेळ, झांज, कासाळे वगैरे वाद्ये आरत्यांसाठी तयार असत. ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ची आरती सुरू असे. घुमटांच्या तालावर आरत्या गाण्याचे आणि अनेक पारंपरिक आरत्या निवडून वेगवेगळ्या तालात म्हणण्याचे पहिले धडे आम्ही चवतीच्या परबेतच गिरवले. फटाक्यांचा धूमधडाका सुरू झाला की आम्ही सगळी मुले तेथे घोळक्याने हजर असायचो. एखादी भित्री भागूबाई रडव्या तोंडाने कोपर्‍यात उभी असे. आरत्या झाल्यावर गणपतीला नैवेद्य दाखविला जाई. त्यात लाडू-कापां-करंज्या आणि खास करून पातोळ्या असत. हळदीच्या पानातून उकडलेल्या त्या पातोळ्यांचा घमघमाट अनेक दिवसपर्यंत आमच्या नाकात भरून असायचा. गौरीसाठी खास सासवेची व देठ्याची अळणी भाजी असायची. शिवाय गौरीपुढे सर्व सुवासिनी वायन पुजायच्या.
त्यानंतर मुख्य कार्यक्रम म्हणजे जेवणावळी. पहिल्या पंगतीला मोठ्या पुरुष मंडळीसोबत आम्हा सर्व मुलांचा क्रम लागायचा. नेहमीच्या पदार्थांपेक्षा पानातील पातोळ्या, पायस, मोदक इत्यादी गोडधोड पदार्थांवर आमची नजर असायची. त्यावर यथेच्छ ताव मारला म्हणजे आमची चवत खूपच रंगायची. शिवाय दिवसभर अधूनमधून लाडू, करंज्या, शंकरपाळे, पेढे असल्या खाद्यपदार्थांची रेलचेल असायची.
दुपारच्या भोजनानंतरचा मुख्य कार्यक्रम लगबगीने सुरू व्हायचा, तो म्हणजे गावातील गणपतीबाप्पांचे दर्शन घेणे. आम्ही अगोदरच मनसुबे रचायचो, यावर्षी अमुक एवढे गणपती पाहायचे. म्हणून वाड्यावरील आम्हा मुलांमध्ये अहमहमिका असायची. कोणी किती संख्येने गणपती पाहिले त्याची पुढे वर्णने येत. अमुक अमुक घरातील गणपती का आवडला याचे वर्णन साग्रसंगीत करीत असू. काही ठिकाणी देखावे करीत. स्वयंचलित देखाव्यांची कल्पनाच त्यावेळी आमच्या बालमनाला प्रचंड भावायची. आमच्या बालपणात गावात वीजपुरवठा झालेला नव्हता. त्यामुळे एखादा स्वयंचलित दिवा गणपतीसमोर मखरात दिसणे म्हणजे आम्हाला कोण कौतुक वाटायचे. माझ्या एका बालमित्राने उंचावरून पडणार्‍या पाण्याच्या ओघाखाली डायनामा चालवून थेट गणपतीच्या मखरात दिवा पेटवला. तो ‘चमत्कार’ पाहण्यासाठी आम्ही असंख्य मुले त्या चतुर्थीला माझ्या मित्राच्या घरी गर्दी करून होतो. गणपतीबाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही गावात निघण्याअगोदर आम्हाला सूर्यास्तापूर्वी घरात परतण्याची तंबी दिलेली असायची.
त्यासंदर्भात गणपती आणि चंद्राची कथा आवर्जून सांगितली जायची. लाडू-मोदकांच्या भरपूर मेजवानीचा लाभ घेऊन गणपती उंदरावर बसून चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी परतत होते. त्यावेळी उंदराचा पाय रस्त्यात अडकला व पाठीवर बसलेले गणपतीबाप्पा तोल जाऊन खाली पडले. ते दृश्य पाहून चंद्राला हसू फुटले. तो मोठ्याने हसला. ते पाहून गणपती अपमानीत झाले. त्यांना राग अनावर झाल्याने त्यांनी आपला एक दात मोडून चंद्राकडे भिरकावला व त्याला शाप दिला- ‘चतुर्थीच्या दिवशी कोणीही तुला पाहणार नाहीत. जो पाहील त्याच्यावर भलताच आळ येईल.’ तसा भलता आळ आपणावर येऊ नये म्हणून आम्ही सर्व मुले संध्याकाळच्या आत घरात यायचो. रात्री आरत्या, फटाके, चंद्रज्योती, जमीनचक्रे, फुगड्या चालायच्या.
दुसरा दिवस कधी उजाडला आणि कधी संपला हे आम्हाला कळतच नसे. कारण दिवसभर गोडधोड खाणे, गणपतीच्या मूर्ती पाहणे, आरत्या म्हणण्यात सामील होणे, फटाके फोडणे, फुटलेल्या फटाक्यांच्या कचर्‍यातून न फुटलेले फटाके वेचून फोडणे इत्यादी अनेक उद्योग दिवसभर चालायचे. संध्याकाळ जवळ येता येता मात्र आम्हाला उदास वाटायचे. वर्षभर वाट पाहायला लावून आलेला हा आपल्या घरचा देव गणपतीबाप्पा आता आणखी काही वेळानंतर निघून जाणार या कल्पनेने आम्ही अस्वस्थ व्हायचो. ज्यांच्या घरी पाच-सात दिवसांचा गणपती आहे ते भाग्यवान असे वाटायचे. दीड दिवसानेच गणपती माघारी जाणार म्हणून आमच्यापैकी काही मुले रडायलाच लागायची. त्यांची समजूत काढताना मोठ्यांच्या नाकी नऊ यायचे. शिवाय गणपतीला आमच्या डोळ्यांदेखत पाण्यात बुडवीत ही कल्पनाच आमच्या बालमनाला असह्य वाटे. देव म्हणून घरी आणता, त्याची पूजा करता, खूप आनंद साजरा करता आणि शेवटी त्या देवाला पाण्यात विसर्जित करता. सगळेच अगम्य वाटे. परंतु त्या अस्वस्थतेतदेखील आम्ही सगळेजण मोठ्या आवाजात त्याला विनवणी करायचो, ‘गणपतीबाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!’ रम्य ते दिवस....

No comments: